बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात अनेक अभिनेते होऊन गेले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर निरंतर राज्य केले. यातले काही अभिनेते आज या जगात नसले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या कामाने प्रेक्षकांच्या मनात आपले नाव आणि स्थान अजरामर केले आहे. चित्रपट इतिहासातील अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयासोबतच गुड लुक्सने तरुणींना घायाळ केले. बॉलिवूडमधील आतापर्यंत सर्वात हँडसम, चार्मिंग, आकर्षक असे अभिनेते कोण? असे जर कोणी विचारले तर सर्वात आधी सगळ्यांच्या डोक्यात एकच नाव येईल आणि ते म्हणजे ‘विनोद खन्ना.’ विनोद खन्ना यांनी त्यांच्या गुड लुक्सने, त्यांच्या लक्षवेधी चालीने आणि दमदार अभिनयाने सर्वांनाच त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. विनोद खन्ना यांनी 70, 80, 90 हे दशकं त्यांच्या अभिनयाने अक्षरशः गाजवले. जेव्हा जेव्हा बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल चर्चा होतील तेव्हा विनोद खन्ना यांच्या नावाशिवाय बॉलिवूड अपूर्णच राहील. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावरमध्ये झाला. मात्र 1947 साली झालेल्या विभाजनानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि इथे स्थायिक झाले. विनोद खन्ना यांनी त्यांचे शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी हायस्कुल मधून पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचा कापडाचा आणि केमिकलचा व्ययसाय होता. पुढे ते दिल्लीला गेले, तिथे त्यांनी दिल्ली पब्लिक स्कुलमधून शिक्षण पूर्ण केले. पुन्हा ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी सीडनेहम कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केली.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच्या त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना ‘मन का मीत’ हा सिनेमा मिळाला. या सिनेमात सुनील दत्त हिरो आणि विनोद खन्ना खलनायक होते. पहिलीच सिनेमात खलनायक साकारून त्यांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयाची छाप प्रेक्षक आणि समीक्षकांवर सोडली. या चित्रपटानंतर त्यांनी सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी मुख्य भूमिका करत अभिनेता म्हणून स्वतःला यशस्वी सिद्ध केले. 1971 मध्ये त्यांनी ‘हम तूम और वो’ चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
पुढे त्यांनी त्यांची कॉलेज मैत्रीण असलेल्या गीतांजली यांच्याशी लग्न केले. त्यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही दोन मुलं झाली. मोठे अभिनेते असूनही त्यांना झगमगाटापेक्षा शांतता जास्त महत्वाची होती. त्यांना काही काळाने त्यांच्या जीवनात पोकळी जाणवू लागली आणि याच दरम्यान ते ओशो या अध्यात्मिक गुरूंकडे आकर्षित झाले. पुढे त्यांनी घर पत्नी मुलांना सर्व सोडून ओशोंच्या अमेरिकेतील आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथे गेले. त्या आश्रमात त्यांनी अतिशय साधे जीवन जगत लहानसहान कामांमध्ये स्वतःला व्यस्त केले. जवळपास पाच वर्ष ते त्या आश्रमात होते.
1990साली ते पुन्हा भारतात आले. तेव्हा तात्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला. मग त्यांनी कविता यांच्याशी दुसरे लग्न केले त्यांना साक्षी खन्ना आणि श्रद्धा खन्ना ही दोन मुलं झाली. परत आल्यानंतर त्यांनी काही काळ मुख्य भूमिका साकारल्या मात्र नंतर ते चरित्र भूमिकांकडे वळाले. त्यांनी 150 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ‘हेराफेरी’, ‘खून पसीना’, ‘अमर अकबर एंथोनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘आन मिलो सजना’, ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी खलनायक, नायकापासून ते विनोदी, ऍक्शन, चरित्र अशा सर्वच भूमिका साकारल्या.
अभिनयासोबतच ते राजकारणातही बरेच सक्रिय होते. 1997पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पंजाबमधील गुरुदासपुर भागात भाजपतर्फे निवडणूक लढवत ते खासदार पदावर निवडून आले होते. राजकारणामध्ये यश मिळवल्यानंतरही ते अभिनयात सक्रिय होते.
त्यांना पडद्यावर अभिनय करता पाहणे म्हणजे सर्वच प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असायची. या अष्टपैलू अभिनेत्याने २७ एप्रिल 2017 रोजी सर्वांचा कायमचा निरोप घेतला. त्यांना कॅन्सर झाल्यानं त्यांचे निधन झाले. आजही विनोद खन्ना त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून फॅन्सच्या आठवणीत कायम आहे.
हेही वाचा-
–पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राने तोडले मौन, म्हणाला, ‘वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा…’
–राडाच ना! सोनम कपूरने शेअर केला हॉट फोटो