Monday, July 1, 2024

मुसेवालाच नाही, या 5 कलाकारांचीही झाली होती हत्या, एक होता धर्मेंद्रचा भाऊ

दिनांक २९ मे २०२२ रोजी सर्वांनाच धक्का देणारी घटना घडली. पंजबाचा २८ वर्षीय गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने सर्वच भारत हादरला होता. पण मनोरंजन क्षेत्रातील अशा सेलिब्रेटीची हत्या होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असाच भरदिवसा काही कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांचाही असाच घात करण्यात आला आहे. कोण होते असे कलाकार चला जाणून घेऊ.

मुसेवालाच्या हत्येनंतर सर्वांना आधी आठवतात ते म्हणजे अमर सिंग चमकिला हत्या प्रकरण. अगदी मुसेवाला प्रमाणेच चमकिला यांचीही २८ व्या वर्षी हत्या झाली होती. ते देखील पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. ते त्यांची पत्नी अमरजोत कौरबरोबर गायचे. असे म्हटले जाते की, त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून त्यांना जीवेमारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. अखेर ८ मार्च १९८८ साली दुपारी चमकिला पंजाबमधील मेहसांपूर गावात परफॉर्म करण्यासाठी आले असता मारले गेले. ते गाडीतून उतरताच त्यांच्यावर फायरिंग करण्यात आली. या गोळीबारात त्यांची आणि त्यांच्या पत्नीची हत्या झाली. पण त्यांना कोणी मारले, का मारले याबद्दल अजूनही गुढ आहे.

हत्या झालेल्या कलाकारांमध्ये टी सिरिजचे फाउंडर गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचेही नाव येते. त्यांना रोज मुंबईतील अंधेरी येथील शिव मंदीरात जाऊन दर्शन घेण्याची सवय होती. पण, १२ ऑगस्ट १९९७ मध्ये त्यांचे शिव मंदीरातील दर्शन अखेरचे ठरले, कारण दर्शन घेऊन ते गाडीजवळ आले आणि त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करणारे तीन लोक असल्याची माहिती समोर आली होती. या हत्येत संगीत दिग्दर्शक नदीम सैफीचा हात असल्याचे म्हटले गेले होते. पण त्याचे नाव यातून सहिसलामत बाहेर आले. या हत्येमधील गुन्हेगार अब्दुल रौउफला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दुसरा गुन्हेगार म्हणून अब्दुल राशिदचे नाव समोर आले होते. दरम्यान या हत्येत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अबू सलेम यांचा हात असल्याचे म्हटले जाते.

या यादीतील तिसरे नाव म्हणजेच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा चुलत भाऊ विरेंद्र सिंग देवोल. पंजाबी सिनेजगतात विंरेंद्र सिंग देवोल यांची चलती होती. त्यांनी तेरी मेरी एक जिंदडी या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याबरोबर कामही केले होते. विरेंद्र सिंग देवोल केवळ चांगले अभिनेतेच नाही, तर दिग्दर्शक आणि प्रोड्यूसरही होते. पण १९८८ साली जट्ट ते जमीन चित्रपटाच्या शूटिंगवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याच गोळीबारात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्यांच्या हत्येमागे खरा सुत्रधार कोण होतं याबद्दल खुलासा झाला नाही.

केवळ अभिनेतेच नाही, तर अभिनेत्रींच्याही हत्या झाल्या आहेत यात प्रामुख्याने नाव येते ते म्हणजे प्रिया राजवंश (Priya Rajvansh) यांचे. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या प्रिया काही काळासाठी लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. पण त्यांच्या तेथील एका फोटोने दिग्दर्शक चेतन आनंद यांना प्रभावित केले. त्यांनी प्रियाला हकिकत चित्रपटात काम दिले. यानंतरही प्रियाने चेतन आनंद यांच्यासह काही चित्रपट केले. यादरम्यान चेतन आनंद आणि प्रिया जवळ आले होते. पण चेतन आनंद यांचे आधीच लग्न झालेले. पण जेव्हा १९९७ साली चेतन आनंद यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्य मृत्यूपत्रात त्यांच्या दोन मुलांची केतन आणि विविक यांच्यासह प्रिया राजवंशचेही नाव होते. या तिघांच्या नावावर जुहूतील बंगला होता. पण हा बंगला प्रिया यांना विकायचे असल्याचे अनेक रिपोर्ट्सनुसार म्हटले जाते. याच कारणास्तव त्यांची २७ मार्च २००० रोजी याच बंगल्यात हत्या झाली. या हत्येनंतर बंगल्यात काम करणाऱ्या अशोक चिन्नास्वामी आणि माला चौधरी यांना दोषी ठरवण्यात आले, तसेच चेतन आनंद यांच्या दोन्ही मुलांवर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला, पण या सर्वांना २०११ मध्ये आरोपांमधून मुक्त केले गेले.

या यादीतील पाचवे नाव म्हणजे मिनाक्षी थापा. १० वर्षांपूर्वीचीच गोष्ट २०१२ साली मिनाक्षीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला होता. नेपाळहून सिनेजगतात काम करण्यासाठी आलेल्या मिनाक्षीला किडनॅप प्रकरणातून जीव गमवावा लागला होता. ती हिरोईन चित्रपटाचे शूट करत होती, अनेक रिपोर्ट्सनुसार त्यावेळी तिने सांगितले होते की, ती नेपाळमधील एका मोठ्या घरातून आली आहे, तिचे हे बोलणे एकून त्या चित्रपटात कोऑर्डिनेटर मॉडेल म्हणून काम करणाऱ्या अमित जैसवाल आणि प्रीती सुरीन यांना मोह झाला आणि त्यांनी युपीतील एका प्रोड्यूसरला हिरोईनची गरज असल्याचे सांगत मिनाक्षीला किडनॅप केले, आणि दिडलाखांची खंडणी मागितली. पण तिच्या कुटुंबाकडे एवढे पैसे नव्हते. त्यांनी कसेबसे ६० हजारांच्या आसपास पैसे दिले. पण ते कधीच परत मिनाक्षीला पाहू शकले नाहीत. यानंतर मुंबईत अमित आणि प्रीती यांना एटीएममधून मिनाक्षीचे कार्ड वापरत असताना पोलिसांनी अटक केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

परिणीती आणि राघव चड्ढा यांनी घेतला आयपीएल सामन्याचा आनंद; स्टेडियममध्ये घुमला ‘परिणीती भाभी’चा नाद, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा