बॉलिवूडमध्ये आपण नेहमीच कलाकारांचे स्टारडम, त्यांचा पैसा, त्यांची लक्झरी जीवनशैली बघतो. मात्र यामागे त्यांचे खडतर प्रयत्न, मेहनत याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. कलाकार आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांची कठीण तपश्चर्या त्यांना यशस्वी बनवते. या मेहनतीला, प्रयत्नांना अपवाद कोणीच ठरत नाही. अशाच एक दिग्गज अभिनेत्रींनी तर भारताबाहेरून येऊन या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान तर निर्माण केलेच सोबतच कधीही न पुसली जाणारी अशी अजरामर ओळख देखील कमावली आहे. या अभिनेत्री आहेत, हेलन.
हेलन हे नाव ६०/७०/८० च्या दशकातले अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव. या नावाशिवाय या तीन दशकातला हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास निव्वळ अपूर्ण आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मोठ्या कष्टाने आणि हिंमतीने हेलन यांनी त्यांचे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले. केवळ आयटम सॉंग्स, छोट्या भूमिका, पाहुण्या कलाकाराच्या भूमिका, सहायक भूमिका करूनही हेलन यांची फॅन फॉलोविंग बड्या अभिनेत्रीला देखील नशिबात नव्हती. बुरखा घालून हेलन घराबाहेर पडायच्या. त्यांना मिळालेले चाहत्यांचे प्रेम कोणत्याही डान्सरला कधीही मिळाले नव्हते. स्टार झाल्यानंतरचा त्यांचा प्रवास सर्वश्रुत आहे, मात्र त्या इथपर्यंत कशा पोहचल्या ते आपण जाणून घेऊया.
हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३८ रोजी रंगून बर्मामध्ये झाला. त्यांचे वडील फ्रेंच तर आई बातमी होत्या. मात्र त्यांच्या आईने काही काळानंतर नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढे ब्रिटिश वंशाच्या रिचर्डसन यांच्यासोबत हेलन यांच्या आईने दुसरे लग्न केले. मात्र दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या दुसऱ्या पतीचे निधन झाले. या युद्धात जपानने बर्मा काबीज केले आणि त्या देशातील लोकांना देशातून बाहेर काढले. जीव वाचवण्यासाठी हेलन यांच्या गर्भवती आईने तीन मुलांना घेऊन तो देश सोडला आणि भारताच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. या प्रवासात त्यांनी अनेक जंगल आणि भयावह मार्ग पार केले. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी हेलन या बर्मा या देशातून भारतात जवळपास ८०० किलोमीटर अंतर पायी चालत आल्या होत्या. भुकेमुळे त्यांचे शरीर हे एक हाडांचा सापळा बनले होते.
View this post on Instagram
त्यांच्याजवळ नाही अन्न होते नाही कपडे. अशा परिस्थितीमुळे त्यांच्या आईचे पोटातले बाळ देखील मृत झाले. हेलन यांचा भाऊ देखील या अवस्थेमुळे मरण पावला. आसाममध्ये पोहचल्यावर ब्रिटिश सैनिकांनी त्यांची मदत केली. काही दिवसांनी परिस्थिती सुधारल्यावर त्या कुटुंबासोबत कलकत्ता आणि नंतर मुंबईला आल्या आणि तिथे स्थायिक झाल्या. गरिबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले. त्यांच्या कुटुंबाचा मित्र आणि डान्सर असणाऱ्या कुकूने त्यांना डान्सचे प्रशिक्षण दिले आणि चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक देखील दिला. १९५१ साली शाबिस्तान आणि आवारा या चित्रपटांमध्ये त्यांना कोरसमध्ये डान्स करण्याची संधी मिळाली. पुढे वयाच्या १९ वर्षी त्यांना ‘हावडा ब्रिज’ सिनेमातून मोठा ब्रेक मिळाला आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यांच्या प्रवास असंख्य हिट गाणी दिली. प्रत्येक दशकातील आघाडीच्या अभिनेते आणि अभिनेत्रींनसोबत त्यांनी काम केले. त्यांचे या क्षेत्रातील योगदान पाहून २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मोठा पुरस्कार देखील बहाल केला. पुढे त्यांनी लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील असणाऱ्या सलीम खान यांच्याशी लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी