Friday, June 20, 2025
Home कॅलेंडर संवादाचा ‘बेताज बादशाह’ म्हणजे अभिनेता राजकुमार उर्फ जानी…!

संवादाचा ‘बेताज बादशाह’ म्हणजे अभिनेता राजकुमार उर्फ जानी…!

सिनेमात ज्यांच्या नुसत्या एन्ट्रीच्या सीनलाच आख्खं थिएटर टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून जायचं, हातात पाईप धरुन बुटांचा आवाज करत जेव्हा हा रुबाबदार अभिनेता पडद्यावर यायचा, तेव्हा प्रेक्षक अगदी हरखून जायचे. देहबोलीतील अदब, रुबाबदार राहणीमान अन् आपल्या वजनदार आवाजानं त्यांनी त्यांचा प्रत्येक डायलॉग अजरामर करुन टाकला. फक्त सिनेमातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही ते स्वत:च्या नियमांनुसारच जगले. हा अवलिया म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून, हिंदी सिनेसृष्टीतील कुलभूषण पंडित तथा अभिनेते राजकुमार उर्फ ‘जानी’ होय. 8 ऑक्टोबर हा राजकुमार यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण पाहणार आहोत, या अजरामर कलाकाराची सिनेगाथा. चला तर मग सुरुवात करूया…

बुलंदी सिनेमात राजकुमार यांचा एक डायलॉग आहे, ज्यात ते बोलतात, “खुदी को कर बुलंद इतना, की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खूद पुछें, बता तेरी रजा क्या है.” अभिनेते राजकुमार यांनी त्यांचं सगळं जीवन या शेर सारखंच जगलं. ना कुणाची भिती बाळगली, ना कधी नुकसानीची पर्वा केली.

राजकुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये साधारण 60 हून अधिक चित्रपटात एकापेक्षा एक अजरामर भुमिका साकारल्या. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर, 1926 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात झाला. ते एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मले होते. राजकुमार यांचे खरे नाव कुलभुषण पंडित, परंतु जवळील लोक त्यांना लाडाने ‘जानी’ असे म्हणत.

सन 1940 साली ते मुंबईत आले. मुंबई पोलीस दलात ते उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. पुढे त्यांची भेट ‘जेनिफर’ यांच्याशी झाली. त्या एका विमान कंपनीत काम करत होत्या. पुढे या दोघांनीही विवाह केला. जेनिफर यांनी लग्नानंतर स्वतःचं नाव ‘गायत्री’ ठेवलं. कुलभुषण आणि गायत्री यांना 3 अपत्य झाली, 2 मुलं आणि एक मुलगी.

साल 1952 मध्ये राजकुमार यांनी सिनेसृष्टीत एन्ट्री मारली. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘रंगिली.’ त्यानंतर त्यांनी ‘आबशार’, ‘घमंड’, ‘लाखों में एक’ या चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 1957 साली आलेल्या ‘नौशेरवा-ए-आदिल’ या चित्रपटामुळे. यानंतर मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटामुळे राजकुमार अक्षरशः घराघरात पोहोचले. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री नर्गिस यांचा पती ‘शामू’ची भूमिका साकारली होती. त्यापुढेही राजकुमार यांनी ‘हमराज’, ‘नीलकमल’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं.

या ठिकाणी तुम्हाला एका गोष्टीचं नक्कीच आश्चर्य वाटेल, ते म्हणजे सिनेसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी राजकुमार यांना साधा चित्रपट पाहायलाही आवडत नव्हता. इतकंच नव्हे, तर अभिनेता बनल्यानंतरही त्यांना कधी चित्रपट पाहावेत, असं वाटत नसायचं. याबद्दल बोलताना एका मुलाखतीत स्वतः राजकुमार यांनी सांगितलं होतं, ‘माझे चित्रपट चालत नव्हते, तरीही माझी फी 1 लाखाने वाढत होती, आणि मी माझ्या सेक्रेटरीला म्हटलो होतो की, माझे चित्रपट चालो न चालो पण मी फेल होत नाहीये.’ असे होते राजकुमार, अगदी बिंधास्त आणि बेधडक.

राजकुमार यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘पाकिझा’, ‘वक्त’, ‘सौदागर’, ‘तिरंगा’ या चित्रपटांचा समावेश होतो. राजकुमार यांच्या बिनधास्तपणाचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये सांगितले जातात. असं म्हटलं जातं की, आज ज्यांना दिग्गज म्हटलं जातं, अशा अनेक कलाकारांचा राजकुमार यांनी तोंडावर अपमान केला होता, तर कित्येकांना राजकुमार यांच्यामुळे रात्र-रात्र झोपही लागत नव्हती. असा हा सिनेजगतातील राजा माणूस 1996 साली हे जग सोडून गेला.

घशाच्या कँसरमुळे दिनांक 3 जुलै, 1996 रोजी राजकुमार यांचा अंत झाला. वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी हा अवलिया जगाला कायमचा सोडून गेला. परंतु त्यांच्या संवादांमुळे ते आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत! अभिनेते राजकुमार यांना टीम दैनिक बोंबाबोंबकडून विनम्र अभिवादन!

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमारांनी अनेक दशकं केलंय चित्रपटसृष्टीवर राज्य, स्वत: च्या मृत्यूबद्दल मुलाला सांगितली होती ‘ही’ गोष्ट

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केलाय ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाच्या शर्टचा बनवला होता रुमाल

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

हे देखील वाचा