अभिनेत्री विद्या बालन सध्या मध्यप्रदेशातील गोंदिया भागात तिच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे चर्चिले जात आहे की, शूटिंग दरम्यान आमदार विजय शहा यांनी विद्याला जेवणाचे निमंत्रण दिले होते. मात्र, विद्या बालनने ते आमंत्रण नाकारल्यामुळे चित्रपटाच्या टीमला चित्रपटाचे शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली.
सध्या विद्याच्या ‘शेरनी’ चित्रपटाचे मध्यप्रदेशातील गोंदिया भागात असलेल्या बालाघाटच्या व्याघ्रप्रकल्पात चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व परवानग्या टीमने काढल्या असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता देखील केली.

या दरम्यान, आमदार विजय शहा यांनी विद्याला भेण्यासाठी वेळ मागितला होता. तसा त्यांना सकाळी ११ ते १२ हा वेळ दिला होता. मात्र, आमदार साहेब विद्याला भेटायला संध्याकाळी ५ वाजता आले. गप्पांदरम्यान आमदारांनी विद्याला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले. मात्र, विद्याचा आधीच एक कार्यक्रम ठरला असल्याने ऐनवेळी आलेल्या या निमंत्रणाला तिने नकार दिला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रपटाचे युनिट चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. सर्व परवानग्या असूनही या सिनेमाच्या टीमला आत जाण्यापासून रोखण्यात आले. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून सरतेशेवटी शूटिंग पुन्हा सुरु झाले.
या संपूर्ण घटनेवर आमदार विजय शहा यांनी सांगितले की, “चित्रपटाच्या सेटवर फक्त दोन जनरेटर नेण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या दिवशी दोन पेक्षा जास्त जनरेटर सेटवर नेले जात होते. त्यामुळेच या टीमला रोखले गेले होते”.
एकंदरीत सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल, मात्र सध्या आमदार महोदयांवर हा आरोप होत आहे, हे मात्र नक्की.










