Monday, July 1, 2024

‘काश्मीरी पंडित-मॉब लिंचिंग’वरून साई पल्लवीला मिळतायेत धमक्या, तर बजरंग दलानेही दाखल केला खटला

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या खूप चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साई पल्लवीच्या चर्चा रंगल्या आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे देशातील हिंदू-मुस्लिम समाजामध्ये पुन्हा एकदा तलवारी उडाल्या आहेत. किंबहुना, तिच्या वक्तव्यात तिने काश्मिरी पंडितांच्या पलायनाची तुलना गोरक्षणाशी केली होती, त्यामुळे नुपूर शर्मानंतर साई पल्लवीसाठी चिथावणीखोर ट्वीट आणि कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही, तर या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती सोशल मीडिया यूजर्ससह बजरंग दलासह निशाण्यावर आली आहे. नुकतेच बजरंग दलाने दाक्षिणात्य अभिनेत्रीवर खटला दाखल केला आहे.

काय म्हणाली होती साई?
दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवर दाखविण्यात आलेल्या अत्याचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “काश्मिरी पंडितांना त्यावेळी कसे मारले गेले, हे काश्मीर फाइल्स दाखवते. जर तुम्ही हा मुद्दा धार्मिक संघर्ष म्हणून घेत असाल, तर अलीकडेच एका मुस्लिमावर हल्ला झाला होता. तो गाडी चालवत असताना हा हल्ला झाला होता, जेव्हा तो गायी घेऊन जाणारे वाहन नेत होता आणि लोकांनी जय श्री रामचा जयघोष केला. मग तेव्हा जे झाले आणि आता जे होत आहे, यात फरक काय?” तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युजर्स दोन भागात विभागलेले आहेत. एकीकडे काही लोक साई पल्लवीला सपोर्ट करत असताना, दुसरीकडे काही यूजर्स तिच्यावर भडकले आहेत. (bajrang dal files case against sai pallavi)

बजरंग दलाने साधला निशाणा
अभिनेत्री साईच्या याच वक्तव्याबाबत बजरंग दल भाग्यनगरच्या वतीने हैदराबादमध्ये अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचे तक्रार पत्र शेअर करत त्यांनी लिहिले की, “बजरंगदल विद्यानगर जिल्हा संयोजक अखिल सिंदोले जी आणि बालोपासना केंद्राचे प्रमुख अभिषेक कुर्मा यांनी सुलतान बाजार पीएसमध्ये साईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.” अभिनेत्रीच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल, साई पल्लवीने संपूर्ण देशाची, विशेषत: काश्मिरी हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. तिने असे केले नाही, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, असेही ते म्हणाले. आता यावर अभिनेत्री काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘या’ चित्रपटात काम करतेय अभिनेत्री
साई पल्लवी सध्या दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीसोबत (Rana Daggubati) तिच्या ‘विराट पर्वम’ या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. चित्रपटात अभिनेत्री तेलंगणातील एका नक्षलवादी नेत्याच्या प्रेमात पडते. या नक्षलवादी नेत्याची भूमिका राणाने साकारली आहे. या दोन स्टार्ससोबत या चित्रपटात नंदिता दास, प्रियामणी, ईश्वरी राव, निवेथा पेथुराज, राहुल रामकृष्ण आणि नवीन चंद्र यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा