Friday, July 5, 2024

सर्वांना खळखळून हसवणाऱ्या भारतीने व्यक्त केले दुःख; म्हणाली, ‘कधीच नाही मिळाले वडील अन् भावाचे प्रेम’

‘मी नेहमी पावसात चालतो, कारण तेव्हा माझे अश्रू कोणी पाहू शकत नाही.’ या जगातील सर्वात मोठे कॉमेडियन असलेल्या चार्ली चॅप्लिन यांचे हे वाक्य आज नक्कीच प्रत्येक विनोदवीरासाठी योग्य ठरणारे आहे. जो सर्वांना जास्त हसवतो, त्यालाच सर्वात जास्त दुःख असते, असे नेहमी म्हटले जाते. मात्र, हे खरे की खोटे यावर अनेक चर्चा झाल्या असतील, पण जेव्हा आपले आवडते कॉमेडियन त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागील खरे दुःख सांगतात, तेव्हा या वाक्यावर नक्कीच सर्वांचा विश्वास बसेल.

आपल्या सर्वांची आवडती कॉमेडीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती नेहमी तिच्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसवते. मात्र, तिच्या या हसणाऱ्या चेहऱ्यामागे मोठे दुःख आहे, जे ती खूप कमी वेळा मीडियासमोर, फॅन्ससमोर व्यक्त करते. सध्या भारतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती तिच्या वडिलांबद्दल आणि भावाबद्दल बोलत आहे.

भारतीला आपण अनेकदा तिच्या आईबद्दल भरपूर बोलताना ऐकले असेल. मात्र, कदाचित पहिल्यांदाच ती तिच्या वडील आणि भावाबद्दल बोलताना आपल्याला दिसत आहे. भारतीला तिची आई जन्म देऊ इच्छित नव्हती. ती पोटात असतानाच तिच्या आईला गर्भपात करायचे होते. मात्र, नशिबाने भारतीचा जन्म झाला. ही गोष्ट आपण अनेकदा ऐकली आहे. मात्र, भारतीने मनीष पॉलच्या शोमध्ये तिच्या वडिलांबद्दल आणि भावाबद्दल पहिल्यांदा काही गोष्टी जगासमोर वक्त केल्या आहेत. याचा एक व्हिडिओ मनीष पॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारती सांगते की, तिने ती दोन वर्षाची असताना वडिलांना गमावले. त्यानंतर आईनेच तिचा आणि तिच्या भावंडांचा सांभाळ केला. पुढे ती म्हणते, “जेव्हा माझे वडील गेले, तेव्हा मी इतकी छोटी होती, ते मला आठवत देखील नाही. मी त्यांना पाहिलेसुद्धा नाहीये. माझ्या घरात माझ्या वडिलांचा एकही फोटो नाही. मी तो कधी लावू देखील देत नाही. माझ्या बहिणीने आणि भावाने वडिलांचे प्रेम मिळवले आहे, पण मी नाही. मला माझ्या भावाचे देखील प्रेम नाही मिळाले. कारण सर्व त्यांच्या कामात व्यस्त होते.”

नवऱ्याबद्दल भारती म्हणाली, “आता मला माझ्या नवऱ्याकडून भरभरून प्रेम मिळते. यावरून मला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे, जेव्हा एखादा मुलगा आपली काळजी घेतो, तेव्हा कसे वाटते.”

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघं सात वर्ष नात्यात होते. त्यानंतर त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. हे दोघे आता नेहमी सोबत बघायला मिळतात. त्यांनी अनेक शोमध्ये सोबतच सहभाग घेतला आहे. या दोघांची जोडी फॅन्समध्ये खूपच लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा