Friday, July 5, 2024

भारतीला ‘कपिल शर्मा शो’मधून मिळणार नारळ? ‘त्या’ एका चुकीने कॉमेडी क्विनच्या करिअरवर प्रश्नचिन्ह!

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स विभागाकडून अटक झाली होती. यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टिका होत आहे. तिचे काही सहकारी मात्र तिच्या समर्थनार्थ उभे राहिल्याचे दिसून आले. मात्र, अशातच आता ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून भारतीची हकालपट्टी होऊ शकते, असं बोललं जात आहे.

भारती सिंह ही कपिल शर्मा शोमध्ये प्रमुख कॉमेडियन पैकी एक आहे. तसेच तिचे चाहते देखील खूप आहेत. मात्र, ड्रग्ज (गांजा) प्रकरणात अटक आणि जामीन नंतर कपील शर्मा शो मेकर्स भारतीला शो मधून काढून टाकण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचं बोलले जात आहे. परंतू, भारतीचा मित्र, सहकारी असलेला कपिल शर्मा हाच मेकर्सच्या निर्णयाविरोधात आणि भारतीच्या समर्थनार्थ उभा असल्याची माहिती समोर येत आहे.

ड्रग्जप्रकरणामुळे भारतीच्या करियरवर प्रश्नचिन्ह

भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरी ८५.५ ग्रॅम अवैध गांजा आढळल्याप्रकरणी नार्कोटिक्स विभागाने त्यांना अटक केली होती. मागच्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने या दाम्पत्याला सदर प्रकरणात जामीन देखील मंजूर केला होता. परंतु आता मात्र बॉलिवूड मधील भारतीचं करियर धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कपिल शर्मा शो च्या मेकर्सच्या म्हणण्यानुसार द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमावर कोणत्याही वादाचा नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी भारतीला या शो मधून काढून टाकण्याचा विचार सुरू असल्याची ‘बी’टाऊन मध्ये चर्चा आहे. परंतु या कार्यक्रमाचा दिग्दर्शक तसेच तिचा सहकारी कपिल शर्मा ह्याचा मेकर्सच्या या निर्णयाला विरोध आहे असे समजते. अधिकृतपणे मेकर्सने अशाप्रकारची भूमिका अजूनतरी समाजमाध्यमांवर मांडलेली नाही.

यालाच कार्यक्रमातील आणखीन दोन कलाकार देखील दुजोरा देताना पाहायला मिळाले. भारतीचा या शो मधील सहकलाकार किकू शारदा एका वेब पोर्टल शी बोलताना व्यक्त झाला की “भारती ही दर वेळी काही आमच्या सोबत शुटींगला सेटवर हजर राहत नसे, त्यामुळे आम्हाला तिच्या गैरहजर राहण्याबद्दल फारसं काही नवल वाटलं नाही आणि मेकर्सबद्दल म्हणाल तर त्यासंदर्भात अजून तरी आमच्या कानावर काहीच आलेलं नाही.”

भारतीचा जिवलग मित्र तसेच सह कलाकार कृष्णा अभिषेक हा सुद्धा भारतीच्या समर्थनार्थ उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत भारतीला काढून टाकण्याच्या चर्चेबद्दल कृष्णा म्हणाला,”असं काहीही नाहीये, मी अजुन तरी चॅनलची अशी कोणतीही चर्चा ऐकली नाहीये. मी कायम भारतीच्या सोबत असेन! तिने कामावर परतायला हवं… जे झालं ते झालं परंतु मी आणि कपिल भारतीच्या सोबत आहोत. आम्ही सगळे एक कुटुंब आहोत.” कृष्णा पुढे म्हणतो,”भारती कायम माझ्या चांगल्या तसेच वाईट काळात माझ्या सोबत होती. जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा भारतीच पाहिली व्यक्ती होती जिने माझी भेट घेतली होती. मला मुलं झाली तेव्हा सर्वात पहिला फोन कॉल मला भारतीचाच आला होता. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान मी जेव्हा आजारी होतो तेव्हा भारतीने पापणी सुद्धा न लवता माझी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. अशी घट्ट मैत्री आहे आमची! दुनियेचं माहीत नाही परंतु मी भारतीच्या सोबत आहे.”

भारती द कपिल शर्मा शो मध्ये आपल्याला पाहायला मिळते की नाही हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच. तोपर्यंत सिनेसृष्टीतील अशा विविध बातम्या वाचण्यासाठी दैनिक बोंबाबोंब या संकेतस्थळाला आवर्जून भेट देत राहा.

हे देखील वाचा