आसाममधील लोकप्रिय संगीतकार आणि बासरी वादक ‘प्रभात शर्मा’ यांच्याबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. 2 मार्च म्हणजेच आज सकाळी प्रभात शर्मा यांचे आकस्मित निधन झाले आहे. गुवाहाटी येथे वयाच्या 85 व्या वर्षी त्यानी अखेरचा श्वास घेतला आहे.
त्यांची मुलगी ताराली शर्मा हिने सांगितले की, “ते आज सकाळी 4:30 वाजता उठले होते. उठल्यानंतर ते त्यांच्या पत्नीशीही बोलले. त्यानंतर ते पुन्हा जाऊन झोपले. परंतु जेव्हा त्या त्यांना पुन्हा उठवायला गेलो, त्यावेळी त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. त्यांनी गुवाहाटी मधील अंबिकागिरी नगर येथील घरी श्वास सोडला.”
प्रभात शर्मा यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत. त्यांच्या या आकस्मित निधनानंतर त्यांच्या सगळ्या परिवारावर शोककळा पसरली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी प्रभात यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यानी असे म्हटले आहे की, “प्रभातजी यांचे जाणे म्हणजे राज्यातील संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे.”
अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी देखील प्रभात यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या या संगीतकाराला 2003 मध्ये आसामच्या पारंपारिक संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी या पुस्कराने गौरवण्यात आले होते. त्यांच्याकडे अनेक संगीत वाद्यांचा संग्रह आहे. जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
त्यानी एक छोटेसे संग्रहालय देखील उभारले होते. वेळेनुसार ते त्या गोष्टींचा उपयोगदेखील करत होते. ते टीव्ही दिग्दर्शकाच्या भूमिकेत अनेक चित्रपटांशी जोडले होते.
शर्मा यांचे अंत्यसंस्कार संध्याकाळी नभाग्रह स्मशान भूमीमध्ये केले गेले. या आधी त्यांचा मृतदेह ‘श्रीमंत शंकर देव कलाक्षेत्र’ येथे नेण्यात आला होता. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी खूपच गर्दी झाली होती.