धर्मेंद्र, अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, सिकंदर खेर आणि सिमर भाटिया यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला चित्रपट ‘इक्कीस’ बॉक्स ऑफिसवर आपली उपस्थिती ठामपणे नोंदवत आहे. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाला रणवीर सिंगच्या बहुचर्चित ‘धुरंधर’शी थेट स्पर्धा करावी लागत असतानाही, ‘इक्कीस’ने पहिल्या तीन दिवसांत समाधानकारक कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, ‘इक्कीस’ने (ikkis)आतापर्यंत भारतात 15.16 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 7 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी—पहिल्या शनिवारी—सुमारे 4.6 कोटी रुपये कमावले. शनिवारी हिंदी ऑक्युपन्सी सरासरी 18.18 टक्के नोंदवली गेली, जी वर्ड-ऑफ-माउथसाठी आशादायक मानली जात आहे.
हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धातील बसंतरच्या लढाईत शहीद झालेल्या कॅप्टन अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. अवघ्या 21 व्या वर्षी देशासाठी बलिदान देणाऱ्या अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारे ते त्या काळातील सर्वात तरुण शूरवीर ठरले.
चित्रपटात अरुण खेत्रपाल यांची भूमिका अगस्त्य नंदा यांनी साकारली असून, दिग्दर्शनाची धुरा श्रीराम राघवन यांनी सांभाळली आहे. पटकथा श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास आणि पूजा लाधा सुरती यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. धर्मेंद्र यांच्यासोबत सिमर भाटिया, विवान शाह, सिकंदर खेर आणि जयदीप अहलावत यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे, अक्षय कुमार यांची भाची सिमर भाटिया हिचा हा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट आहे.
दरम्यान, हॉलीवूडची बहुप्रतीक्षित ‘अवतार: फायर अँड ऐश’ (अवतार 3) देखील बॉक्स ऑफिसवर फारशी झेप घेऊ शकलेली नाही. 16 व्या दिवशी, म्हणजे तिसऱ्या शनिवारी, जेम्स कॅमरन यांच्या या चित्रपटाने 4.50 कोटी रुपयांची कमाई केली असून, भारतातील एकूण कलेक्शन 168.10 कोटी रुपये इतके झाले आहे.
एकीकडे इतिहासाची शौर्यगाथा सांगणारा ‘इक्कीस’ आणि दुसरीकडे भव्य कल्पनाविश्व मांडणारा ‘अवतार’—बॉक्स ऑफिसवर सध्या दोन वेगळ्या विश्वांची शांत पण तीव्र लढाई सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










