Tuesday, July 9, 2024

सुपरस्टार अभिनेत्री ते शक्तिशाली महिला राजकारणी, अम्मा.! मृत्यूनंतर शेकडो चाहत्यांनी केल्या आत्महत्या

दक्षिण भारतातील एक प्रमुख राज्य असलेल्या तमिळनाडू राज्याच्या राजकारणावर एकहाती अमंल ठेवणाऱ्या आणि केंद्रातील सत्तेची चावी आपल्या खिशात ठेवलेल्या राजकारणी म्हणून जयललिता यांच्या ताकदीच्या कथा आजही चर्चिल्या जातात. 

भारतीय राजकारणातील एक शक्तिशाली आणि प्रभावी स्त्री नेतृत्व म्हणून जयललिता यांच्याकडे पाहिले जाते. दाक्षिणात्य चित्रपटांची सुपरस्टार ते एक प्रबळ राजनेता हा अवघड प्रवास अगदी लीलया पार करणाऱ्या, जयललिता यांनी सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर आपले नाव कोरले. ‘अम्मा’ या नावाने तामिळनाडूमध्ये जयललिता प्रसिद्ध होत्या.

दिनांक २४ फेब्रुवारी १९४८ रोजी कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये एका ब्राह्मण परिवारात जयललिता यांचा जन्म झाला. त्यांनी १९५६ साली सीवी श्रीधर दिग्दर्शित ‘वेननीरा अदाई’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकले. इथूनच एक बालकलाकार ते सुपरस्टार अभिनेत्री होण्याचा प्रवास त्यांनी यशस्वीरीत्या केला.

चित्रपटातील प्रवेशानंतर जयललिता यांची त्या काळातील लोकप्रिय अभिनेता एम जी रामचंद्रन यांच्यासोबत असलेली जोडी खूप गाजली. सन १९६५ ते १९७२ या काळात त्यांनी सर्वात जास्त सिनेमे एमजी रामचंद्रन यांच्यासोबतच केले. जयललिता यांना राजकारणात रामचंद्रन यांनीच आणले. सुरुवातीला जयललिता यांनी राजकारणाला नकारच दिला होता. तोवर जयललिता यांनी तामिळ, तेलगू, कन्नड आणि एक हिंदी चित्रपट मिळून त्यांनी एकूण ३०० चित्रपटांमध्ये काम केले.

सुरुवातीला त्यांनी १९८४ ते १९८९ याकाळात राज्यसभेत काम केले. सन १९८७ मध्ये एमजी रामचंद्रन यांचे निधन झाल्यावर त्यांनी स्वतःला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. तिथूनच त्याचा खऱ्या अर्थाने राजकारणाचा प्रवास सुरु झाला.

यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून न पाहाता २९ वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात सहा वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

सन १९९६ साली उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्यामुळे त्यांच्यावर ४८ गुन्हे दाखल केले गेले. एवढेच नाही तर सी.बी.आय.ने त्याच्या घरावर छापा मारला तेव्हा त्यांच्या घरातून अनेक साड्या, सोने आणि अजून काही महागड्या गोष्टी सापडल्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटकाही झाली.

पुरात्ची थलाइवी म्हणजेच क्रांतिकारी नेता म्हणून त्यांना ओळखले जायच्या. त्यांच्या याच व्यक्तिमत्वावर आधारित ‘थलाइवी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कंगना राणावत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

हे देखील वाचा