Monday, July 1, 2024

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाने १९७७ मध्ये केलेली ७ कोटी २५ लाखांची कमाई, वाचा मजेशीर किस्से

शहंशाह, महानायक, बिग बी, अँग्री यंग मॅन, या नावाने कोणत्या दिग्गज अभिनेत्याला ओळखलं जातं? असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर तुम्ही एका सेकंदात त्याचं उत्तर द्याल यात तीळमात्र शंकाच नाही मंडळी. अर्थातच अमिताभ बच्चन. काय तो अभिनय, काय ते डायलॉग्ज.! त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेक्षक फिदा होते. कामचं तसं होतं ना. अमिताभ यांचा चित्रपट आला रे आला प्रेक्षक थिएटरकडं धावत होती. त्यांच्या अनेक सिनेमातील डायलॉग्ज आणि सीन आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. मात्र, त्यांच्या काही सिनेमातील किस्से अनेकांना कदाचित माहितीही नसतील. असाच एक सिनेमा म्हणजे ‘अमर अकबर अँथनी.’ या सिनेमातील किस्से ऐकून तुम्हीही म्हणाल, आई शप्पथ. हे तर माहितीच नव्हतं की.

तो दिवस होता २७ मे, १९७३. या दिवशी रिलीझ झाला होता अमिताभ यांचा सिनेमा ‘अमर अकबर अँथनी.’ याचं दिग्दर्शन केलं होतं, ते म्हणजे मनमोहन देसाईंनी. जर हा सिनेमा आजच्या काळात बनला असता, तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नक्कीच पटकावला असता. पण हरकत नाही. जेव्हा हा सिनेमा रिलीझ झाला होता, तेव्हाही हा सिनेमा जबरदस्त गाजला होता. हाच तो सिनेमा, ज्यासाठी अमिताभ यांना करिअरचा पहिला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. तसेच लक्ष्मीकांत- प्यारेलालला सर्वोत्तम संगीतकाराचा. या सिनेमानं १९७७ साली सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून टॉप केला होता. तब्बल ७ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. किती ७ कोटी २५ लाख. आजच्या काळात ही रक्कम किती असेल, याची कल्पनाच केलेली बरी. या सिनेमातील कॅची गाणे आणि वन लायनरने भारतीय सिनेमांसाठी एक ट्रेंडच सेट करून दिला होता.

असं म्हटलं जातं की, हा सिनेमा भारतापेक्षाही अधिक वेस्ट इंडिजमध्ये हिट झाला होता. पण सिनेमा बनण्याची प्रोसेस अशी होती की, सिनेमा तर बनलाय, पण डिरेक्टरलाच माहिती नव्हते, पण नंतर मुलाने सांगितल्यानंतर त्यांना समजलं.

हा सिनेमा लिहिताना त्यातील अमिताभ यांच्या कॅरेक्टरचं नाव होतं अँथना फर्नांडिस. मनमोहन देसाईं म्युझिकसाठी संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल आणि आनंद बक्षी यांच्यासोबत बसले होते. टायटल साँग तयार झाले. माय नेम इज अँथनी फर्नांडिस. मैं दुनिया में अकेला हूँ. हे गाणे ऐकताना खटकत होते. गाण्याचा फ्लो खराब होत होता. त्यावेळी नाव बदलण्याबाबत चर्चा झाली, पण प्रश्न हा होता की, नाव ठेवायचं तरी काय. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी सांगितले की, ते १९३० च्या दशकात एक म्युझिक अरेंजर होते. त्यांचं नाव अँथनी गोन्साल्विस. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हिरोचे नाव बदलून अँथनी गोन्साल्विस ठेवण्यात आले. त्यानंतर मग गाण्याचेही नाव हेच ठेवण्यात आले.

मनमोहन देसाई हे एक शानदार व्यक्ती होते. ज्याच्यासोबतही सिनेमा करायचे, त्याला सांगायचे की, कोणत्याही तयारीशिवाय सेटवर या. हा काय सत्यजित रे यांचा सिनेमा नाहीये. त्यांना सिनेमाच्या आयडियाही अशाच यायच्या. एकदा स्क्रीनप्ले रायटर प्रयागराज त्यांच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी त्यांच्या फार्म हाऊसची चावी मागण्यासाठी आले. ते बाहेर बसून न्यूजपेपर वाचत होते. त्यांनी वाचलं की, जॅक्सन नावाचा एक दारूडा आपल्या ३ मुलांना पार्कमध्ये सोडून निघून गेला आहे. या बातमीने ते जरा जास्तच उत्साहित झाले, आणि ते सिनेमा बनवण्याबद्दल विचार करू लागले. त्यांनी प्रयाग यांना घेतलं आणि दिवसभर सिनेमाच्या कहाणीबद्दल चर्चा केली. प्रयाग यांची सुट्टी रद्द करत पुढच्या तीनच दिवसात त्यांनी सिनेमाची कहाणी पूर्ण करून घेतली. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात विनोद खन्नांच्या अपोझिट कोणतीही अभिनेत्री ठेवली नव्हती. मनमोहन यांना वाटलं की, विनोदचा कॅरेक्टर जरा जास्तच सीरियस आहे, त्यामुळे अभिनेत्रीला ठेवणे योग्य वाटणार नाही.

पण विनोद खन्नांना याबद्दल जसं समजलं, तसं ते तडाककन मनमोहन यांच्याकडे पोहोचले. ते म्हणाले, अमिताभ आणि ऋषी यांच्याकडेतर अभिनेत्री आहे, मलाही पाहिजे. डिरेक्टरने खूप समजावलं पण त्यांनी एकही ऐकलं नाही. त्यानंतर विनोद खन्नांसोबत शबाना आझमींना कास्ट करण्यात आलं, आणि त्यांच्यासाठी वेगळा रोल लिहिण्यात आला.

मनमोहन देसाई ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘परवरिश’ या दोन सिनेमांची शूटिंग एकाच वेळी, एकाच स्टुडिओत करत होते. दोन्ही सिनेमांच्या कास्टही जवळपास सारख्याच. त्यांची इच्छा होती की, दोन्ही सिनेमे लवकरात लवकर रिलीझ व्हावे. आधी ते परवरिश सिनेमाचा एक सीन शूट करायचे, त्यानंतर अमर अकबर अँथनीचा. या सर्व तयारींना फुलस्टॉप लागला. कारण, १९७५ साली आणीबाणी लागली होती. मनमोहन यांचे सिनेमे अडकून पडले. त्यामुळेच त्यांचे १९७७ साली एकापाठोपाठ असे ४ सिनेमे रिलीझ झाले. हे सिनेमे होते, ‘धरमवीर’, ‘चाचा भतीजा’, ‘परवरिश’ आणि ‘अमर अकबर अँथनी.’ हे चारही सिनेमे सुपरहिट ठरले.

सुप्रसिद्ध सलीम- जावेद या लेखक जोडीने अमिताभ यांना मनमोहन देसाईंची भेट करून दिली होती. ते अमिताभ यांच्यावर जास्त खुश नव्हते. ते म्हणाले होते, मी याला फक्त एकच रोल देऊ शकतो. तो म्हणजे चिकन रोल. यानंतर काही वर्षांनीच ते अमिताभ यांच्यासोबत ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात काम करत होते. सेटवर अमिताभ यांना सांगण्यात आलं की, सिनेमात त्यांचा एक मिरर सीन आहे. जिथे त्यांना आरशात पाहून डायलॉग बोलायचाय. मनमोहन यांनी अमिताभ यांना सिनेमाची स्क्रिप्ट दिली आणि दुसरा सिनेमा शूट करण्यासाठी गेले. डिरेक्टरची वाट पाहता पाहता खूपच वेळ झाला. असिस्टंट डिरेक्टर म्हणाला की, सर, सर्व सेटअप तयार आहे, तुम्ही सीन शूट करून घ्या. यावेळी अमिताभ यांनी डायलॉग पाठ करण्याऐवजी सीनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला, आणि डिरेक्टरशिवायच हा सीन शूट करून घेतला.

हेही पाहा- अमर अकबर अँथनी चित्रपट शूट झाला पण निर्मात्यालाच माहित नाही

मनमोहन यांना एक सवय होती. ते प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी त्यांच्यासोबत थिएटरमध्ये जाऊन बसायचे. जसा कुणी मध्येच उठला, तर त्याला ते अडवायचे. अनेकदा ही गोष्ट हातापायीपर्यंत आली होती. ‘अमर अकबर अँथनी’चा प्रीमिअर सुरू होता. सिनेमाची स्टार कास्ट आणि प्रसिद्ध लोकं हा सिनेमा पाहत होते. जसा तो आरशाचा सीन संपला, मनमोहन स्वत:च उठून बाहेर जाऊ लागले. त्यावेळी अमिताभ यांनी विचार केला की, कुठे गडबड झाली. धावत-पळत ते त्यांच्याकडे पोहोचले, त्यांनी विचारलं की, काय झालं? त्यावेळी ते म्हणाले की, आतापासून माझ्या सर्व सिनेमात तूच काम करायचं. याचसिनेमासोबत मनमोहन हे डिरेक्टरसोबतच प्रोड्युसरही बनले होते. त्यांनी ‘नसीब’, ‘देशप्रेमी’, ‘कूली’, ‘मर्द’ आणि ‘तूफान’ या सर्वांमध्ये फक्त आणि फक्त मुख्य अभिनेता म्हणून होते अमिताभ बच्चन.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा