Wednesday, July 3, 2024

बारावी निकाल :अपयशाच टेंशन घेवूच नका, ‘हे’ दिग्गजही परिक्षेत नापास झालेत पण सिनेजगतात टॉपर आहेत

बारावी परिक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याची बातमी समोर आली आणि सगळ्याच पोरांच टेंन्शन वाढल. गेल्या कित्येक दिवसांपासून या परिक्षा निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या परिक्षेचा निकाल बुधवार ( ८ जून) रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. परिक्षेचा निकाल म्हणल की विद्यार्थ्यांची चिंता आणि टेंशन आपोआपच वाढलेल असत. पास होणार की नापास होणार, निकाल काय लागणार, किती मार्क्स पडणार अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांना टेंशन येत असते. परंतु आपल्या परिक्षेचा निकाल काही आपले उद्याचे भविष्य ठरवु शकत नाही किंवा मार्क कमी पडले म्हणून निराश व्हायच नसत हेच सिने जगतातील यशस्वी मंडळींनी दाखवून दिले आहे. मराठी तसेच हिंदी  चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते, कलाकार आहेत ज्यांना बारावी पर्यंतही पास होता आले नव्हते, पण त्यांनी मनोरंजन जगतात यशाचे शिखर गाठले आहे. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.

नागराज मंजुळे – मराठी चित्रपट जगतात नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांनी यशाचे नवनवे विक्रम केले आहेत. नागराज मंजुळे यांचे सगळेच चित्रपट, चित्रपटांच्या कथांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांच्या याच यशस्वी चित्रपटांमुळे त्यांना मराठी सिनेजगतातील राजामौली म्हणून ओळखले जाते.सैराट, फॅंन्ड्री, झुंड अशा एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमधून नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शनाची जादू दाखवली आहे. पण नागराज मंजुळे यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये मी दहावीत दोनदा नापास झालो होतो असा उल्लेख केला होता. त्यामुळे कोणतेही अपयश अंतिम नसते हेच सिद्ध  होते.

छाया कदम – नागराज मंजुळे यांच्याच चित्रपटातून छाया कदम यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. सहजसुंदर अभिनय, आव्हानात्नक भूमिकांसाठी त्या लोकप्रिय आहेत. सैराट, फॅंन्ड्री या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली होती. पण छाया कदम यांचाही शिक्षणाचा आलेख कोराच आहे. त्यासुद्धा बारावीत नापास झाल्या होत्या असा खुलासा त्यांनी केला होता. छाया कदम फक्त अभिनयातच नव्हेतर खेळातही पारंगत आहेत. त्यांनी कबड्डी खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता.

कंगणा राणौत – बॉलिवूडची पंगा क्विन कंगणा राणौत देशभरात आपल्या अभिनयासाठी आणि विवादांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्येही तिने  स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच कंगणाच्या नावाची चर्चा सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. कंगणासुद्धा १२ वी नापास आहे. पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात तिने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.

अर्जुन कपूर –  बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता अशी ओळख असलेला अर्जुन कपूर सुद्धा १२ वी नापास आहे. अर्जुन कपूरला वाचनामध्ये विशेष रस नव्हता. म्हणूनच जेव्हा तो बारावीच्या परीक्षेत नापास झाला तेव्हा त्याने अभ्यास सोडला. पण हिंदी चित्रपट जगतात आपल्या दमदार अभिनयाने त्याने यशाचे शिखर गाठले आहे.

अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार फक्त दहावी पास आहे. कपिल शर्माच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने स्वतः हा खुलासा केला होता. पण शिक्षणात आलेले हे अपयश त्याच्या यशाच्या आड आलेल नाही म्हणूनच हिंदी चित्रपट जगतात तो आपल्या दमदार अभिनयाने अधिराज्य गाजवताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा