Wednesday, July 3, 2024

“कलाकाराने कसे असायला पाहिजे हे…” जयंत सावरकरांच्या आठवणींना उजाळा देताना ‘या’ कलाकाराने केले त्यांचे कौतुक

अनेक दशकांपासून मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या अण्णांचे अर्थात अभिनेते जयंत सावरकरांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी सगळ्यांनाच आपलेसे केले होते. कॅमेऱ्यासमोर आणि रंगमंचावर सहज वावर असणाऱ्या अण्णांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अगदी शेवट शेवट पर्यंत त्यांनी अभिनय केला. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील त्यांच्यात असणारा सळसळता उत्साह भल्याभल्यांना मात देणारा होता.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी, किस्से सांगत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता आई कुठे काय करते मध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी
यांनी देखील एक खास पोस्ट शेअर करत अण्णांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यातल्या कलाकाराचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी अण्णांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले, ““असं जगता आलं पाहिजे”
अण्णांसारखा ( जयंत सावरकरांसारखा ) ,
माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णां आपल्याला शिकवून गेले,
आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, वर्षानुवर्ष, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे,
१९८४ सालापासून ची आमची ओळख,
गोविंद सराया यांच्या “वक्ते से पहिले” मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले, त्यानंतर १९९४-९५ मध्ये मनोहर सररवणकरांच्या “दैव जाणिले कुणी” या दूरदर्शन च्या टेलीफिल्म आम्ही बापलेकाची भूमिका केली त्यानंतर एकदम २०२२-२३ मध्ये “आई कुठे काय करते” मध्ये काम केलं.
म्हणजे तब्बल ३८ वर्षा मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो ,
आता वयाच्या ८६-८७ वर्षाचे अण्णा “आई कुठे काय करते” च्या सेटवर , यायचे अगदी “वेळेवर” call time च्या अर्धा तास आधी. अगदी छान तयार होऊन , एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानस जॅकेट आणि Hat असायची,
मग वेळ न घालवता मेकअप करून, costume घालून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे,
मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागून घ्यायचे,
मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे, बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बरं एक दोन पानं नाही तर १७ ते १८ पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा suggestions असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे, एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे,
माझी आणि अण्णांची एकच मेकअप रूम होती,
त्यामुळे अण्णांच्या जुन्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची, ते Encyclopedia होते, अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना detail मध्ये आठवायच्या,
बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची, इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh ,active ,energetic असायचे, हसत मुख ,
Set वर एका professional कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.
अण्णां नी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की
ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी, सौभाग्य मिळालं आहे ते खरंच भाग्यवान आहेत,
मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो, आत्ता आण्णा शरीराणे नाहीत पण
यांचा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे, मिश्किल स्वभाव , आयुष्यं कसं छान जगाव.
आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत.”

मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना अण्णांचा सहवास लाभल्यामुळे नशीबवान म्हटले आहे. दरम्यान जयंत सावरकर यांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कथा नव्या संसाराची’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ अशा सरस नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या. तर, ‘वाहिनीची माया,’ ‘पैसा पैसा’, ‘आराम हराम है’ आदी चित्रपट आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते?’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

हे देखील वाचा