Wednesday, July 3, 2024

दयनीय अंत झालेल्या परवीन बाबी होत्या पहिल्या भारतीय अभिनेत्री, ज्यांनी मिळवले टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान

बॉलिवूड विश्वात आजवर अश्या बऱ्याच कमी अभिनेत्री होऊन गेल्या की, ज्यांनी चित्रपट नायिकेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. त्यातलीच एक स्मार्ट अभिनेत्री म्हणजेच परवीन बाबी. परवीन बाबी यांनी आपल्या सिने कारकीर्दीत अनेक चित्रपट सुपरहिट केले आणि आपल्या मोहक अदांनी रसिकांना घायाळ केले. त्यांनी आपल्या उत्कृट कामगिरीने लोकांच्या मनावर अभिराज्य गाजवले. हिच अभिनेत्री आज आपल्याला सोडून गेलेली बरेच वर्ष उलटले आहेत. आज (४ एप्रिल) रोजी परवीन बाबी यांची ६८ वी जयंती आहे. परवीन यांचा जन्म ४ एप्रिल १९५४ रोजी गुजरात इथे झाला. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया प्रवास …

परवीन बाबी (parveen babi) यांचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी गुजरातमधील जूनागड येथे झाला. जुनागडमधील कुलीन कुटुंबातील त्या एकुलती एक मुलगी होत्या, ज्या गुजरातमधील पठाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पश्तून’ समाजाच्या ‘बाबी’ वंशाची होत्या. त्यांच्या पालकांच्या विवाहाला चौदा वर्ष झाल्यानंतर परवीनचा जन्म झाला. त्यांचे वडील, वली मोहम्मद खान बाबी, जुनागडचे दिवाण होते आणि त्यांची आई जमाल बख्ते बाबी होती. १९५९ मध्ये तिने वडिलांना गमावले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण ‘माउंट कार्मेल हायस्कूल, अहमदाबाद’ येथून केले आणि नंतर ‘सेंट. झेविअर्स कॉलेज, अहमदाबाद’ इथे तिने इंग्रजी साहित्यात ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ मिळवले.

परवीन यांनी १९७२ मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरवात केली. त्या काळातले प्रसिद्ध निर्माता निर्देशक बी. आर. इशारा यांची नजर परवीन बाबींवर पडली, तेव्हा ते परवीन बाबीला बघतच राहिले. त्यावेळी त्यांनी मिनी स्कर्ट घातलेला होता आणि हातात सिगारेट होती. ही अदाकारी बघून बी. आर. इशारा यांनी तिला चित्रपटासाठी विचारले आणि त्यांनी लगेचच होकार दिला. अगदी कमी वेळातच १९७३ ला ‘चरित्र’ या चित्रपटातून आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनयाचा ठसा उमटवायला सुरुवात केली. मॉडेलिंगमुळे सगळं जग परवीन बाबीसाठी वेड होतं आणि ती डॅनी डेन्झोंगपासाठी. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.

नंतर खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती, अमिताभ बच्चनसोबतच्या  मजबूर (१९७४) या चित्रपटातून. त्यानंतर या दोघांचे अनेक चित्रपट हिट झाले. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत, त्या एक मोहक फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जात असे, त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. परवीन बाबी या वेगवेगळ्या पोशाखांसाठी आणि विविध भूमिकांसाठी ओळखल्या जातात.

दीवार (१९७५) या अ‍ॅक्शन क्राइम-ड्रामा चित्रपटात अनिता नावाच्या भूमिकेसाठी अभिनय केला होता. ज्यांनी तिला जबरदस्त फॅन फॉलोविंग मिळवून दिली आणि तिला मुख्य अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिले. १९७० च्या दशकात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात त्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांच्या मुख्य भूमिका म्हणजे – अमर अकबर अँथनी (१९७७) मधील जेनी, सुहागमधील अनु (१९७९), काला पत्थर (१९७९) मधील अनिता, बर्निंग ट्रेनमध्ये शीतल. (१९८०), शानमधील सुनीता (१९८०), शालिनी / कालियामधील राणी (१९८१), आणि निमा हमाल (१९८२).

हेमा मालिनी, रेखा, शबाना आझमी, स्मिता पाटील, झीनत अमान, रीना रॉय आणि राखी यांच्यासह परवीन त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आठ चित्रपटात काम केले. सर्व हिट किंवा सुपरहिट झाले. शशी कपूरच्या बरोबर ‘नमक हलाल’ (१९८२), फिरोज खान बरोबर काला सोना’ (१९५५), संजय खान बरोबर चांदी सोना’ (१९७७)  आणि धर्मेंद्र बरोबर ‘जानी दोस्त’ (१९८३) सारख्या अन्य हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले.

बाबीचे व्यक्तिमत्त्व पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक म्हणून बघीतले गेले, बॉलिवूड निर्मात्यांना त्यांना ठराविक भारतीय नारी आणि गाव की गोरी भूमिका देणे अवघड होते. त्यांनी प्रामुख्याने पाश्चिमात्य आणि ग्लॅमरस भूमिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्या काळातील अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्या दिसल्या होत्या. त्यांचे मुख्य सह-कलाकार अमिताभ बच्चन, शशी कपूर, फिरोज खान, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना हे होते, जे १९७० आणि १९८० च्या दशकातील सर्व प्रमुख स्टार होते.

Photo Courtesy : YouTube/ScreenGrab/Shemaroo Filmi Gaane

परवीन बाबी या त्या काळातील उत्कृष्ठ इंग्लिश बोलणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्या पहिली भारतीय अभिनेत्री होत्या, ज्यांना १९७९ मध्ये टाईम मॅगझीनच्या फ्रंट पेजवर जागा मिळाली. परवीन बाबी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला बोल्ड आणि ग्लॅमरस कसं राहायचा हे शिकवून दिलं. नंतर त्या काळातील मॉडेल आणि ऍक्टर कबीर बेदी आणि महेश भट्ट सोबतचे नाते  खूप गाजले.

परवीन बाबी १९८३ ला काही काळासाठी चित्रपटांतून दूर झाल्या. त्या कॅलिफोर्निया अमेरिकेत जाऊन इंटिरियर डिझायनर म्हणून काम करू लागल्या. त्याचं खरं कारण होतं त्यांच्या मनाची अशांतता, आयुष्यातला एकटेपण. काही लोक सांगतात, त्या अंडरवर्ल्डला त्रासल्या होत्या, त्यामुळे त्या अमेरिकेला निघून गेल्या होत्या. पण तिकडे जाऊन त्यांचे मानसिक संतुलन अजून बिघडायला लागले.

एकदा जॉन एफ. कॅनडी  इंटरनॅशनल एअरपोर्टववरून त्या बाहेर जात होत्या, तेव्हा त्यांना त्यांची ओळख विचारली, पण परवीन बाबी त्यांची ओळख सांगण्यास असमर्थ ठरल्या. याच कारणामुळे त्यांच्या हाताला बेड्या लावून, अश्या खोलीत ठेवले जिकडे आधीपासूनच मानसिक रुग्ण होते, तेव्हा भारतीय दूतावासाने त्यांना मदत केली आणि यातून त्यांची सुटका केली. पण तोपर्यंत हे सिद्ध झालं होतं की, त्यांना मानसिक आजार झालेला आहे. पण त्यांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. ६ वर्षानंतर १९८९ ला ती भारतात परतल्या. इरादा (१९९१) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. सन २००५ मध्ये किडनी निकामी झाल्याने त्यांचा एकाकी मृत्यू झाला.

 

हे देखील वाचा