Friday, April 19, 2024

लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल ४ वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे

‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या आवाजातच अशी जादू आहे की, कोणीही त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांना साल २००१ मध्ये देशाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्यात आला. विशेष म्हणजे, लता दीदी एक अशा व्यक्ती आहेत, ज्या हयात असतानाच हा मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक रफी यांची गाणी ऐकणे म्हणजे, पहाटेच्या वेळी कोकिळाचा आवाज ऐकण्याइतकेच चांगले. मजेने भरलेले गाणे असो किंवा दु:खी नगमे, भजन असो किंवा कव्वाली रफी साहेबांचा आवाज प्रत्येक प्रकारे मनाला स्पर्श करून जातो. रफी यांना ‘आवाज के जादूगर’ असं म्हटलं जायचं. लता आणि रफी यांनी एकत्रित अनेक सुपरहिट गाणे गायली आहेत, तर मंडळी आज आम्ही तुम्हाला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्यात झालेल्या विवादाबद्दल सांगणार आहोत, जो फारसा स्मरणात ठेवण्यासारखा दोघांसाठीही नव्हता. विशेष म्हणजे शुक्रवारी (२४ डिसेंबर) मोहम्मद रफी यांची जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया गायनातील दोन दिग्गज व्यक्तींमधील वादाबद्दल. चला तर मग सुरुवात करूया…

प्रयाग शुक्ला यांनी ‘मोहम्मद रफी स्वयं ईश्वर की आवाज’ या पुस्तकात लिहिले आहे की, लता दिदी म्हणाल्या होत्या, रफी यांच्या नावाचा उल्लेख होताच, त्या अशा दिवसांमध्ये जातात, जेव्हा एका गायकाला रॉयल्टी मिळाली पाहिजे की नाही, यावर असहमती दर्शवली जाते. गायक म्हणून ‘गानकोकिळे’चा दर्जा मिळवलेल्या लता दिदींना बर्‍याच बाबतीत असुरक्षित वाटत असते.

खरं तर, रॉयल्टी देण्याच्या मुद्द्यावरून लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात इतके मतभेद निर्माण झाले की, सुमारे चार वर्ष त्यांनी एकत्र गाणे गायले नाही. लता मंगेशकर यांचे म्हणणे होते की, गायकांना रॉयल्टी मिळायलाच हवी. तर मोहम्मद रफी यांनी आग्रह धरला होता, एकदा गाणे रेकॉर्ड झाल्यावर, गायकाचा त्या गाण्यावर काहीही अधिकार राहत नाही. बरेच लोक असे मानतात की कलाकारांच्या हक्कांच्या बाबतीत लतादिदी योग्य होत्या. तर बर्‍याच लोकांनी रफीला पाठिंबा दर्शविला होता. रफी तेव्हा गाण्याला ईश्वरसेवा मानत असे व एकदा गाणे गायले की परत त्यातून त्यांना रॉयल्टीच्या माध्यमातून पैसे नको होते.

लता या रॉयल्टी मिळण्याच्या बाजूने होत्या आणि निर्मात्यांपर्यंत त्यांनी हा विषय नेला. या विषयावर रफी त्यांना पाठिंबा देतील अशी त्यांना आशा होती. मात्र मोहम्मद रफी असे काहीतरी म्हणाले, जे कोणालाही अपेक्षित नव्हते. पुढे लता यांनी निर्णय घेतला की त्या यापुढे रफीबरोबर गाणार नाहीत, त्यावेळी रफी हे देशातील निःसंशयपणे सर्वोत्कृष्ट पुरुष गायक होते. यावर रफी यांनी उत्तर दिले, “जर त्यांना माझ्यासोबत गाण्यात रस नसेल, मग मला तरी कसा असेल.”

रफी आणि लता दोघेही ठिकठाक पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून गायण क्षेत्रात आले. जेव्हा देय रक्कम मोठी असायची, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे नव्हते. मोहम्मद रफीनुसार, त्यांच्यासाठी सहानुभूती आणि संवेदना याच मोठ्या गोष्टी होत्या. मात्र, जेव्हा दोन दिग्गजांनी एकमेकांसोबत गाणे थांबवले, तेव्हा ही परिस्थिती आणखी बिकट झाली. मोहम्मद रफींवरील या पुस्तकानुसार, जेव्हा लता यांची जागा गायिका सुमन कल्याणपूर घेऊ लागल्या, तेव्हा लताजी नाराज झाल्या आणि त्यांनी रफींशी करार करण्यासाठी शंकर-जयकिशनकडे संपर्क साधला. नंतर दोघांचे जवळपास चार वर्ष चाललेले हे भांडण संपले आणि या घटनेनंतर दोघांनी ‘पलको की छांव’ या चित्रपटात एकत्र गाणे गायले.

हा वाद तेव्हा पुन्हा चर्चेत आला, जेव्हा लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर सांगितले की, ‘रफी यांनी त्यांच्याजवळ लेखी दिलगिरी व्यक्त केली होती.’ रफी यांचा मुलगा शाहीद पुढे येऊन म्हणाला की, ‘रफी इतके शिक्षित नव्हते की ते असे पत्र लिहू शकतील. त्यांची गाणी वगळता त्यांनी कधीच काही वाचलेही नाही. असे माफी मागणारे कोणतेही पत्र लताकडे असल्यास त्यांनी ते दाखवावे, अन्यथा ते त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करतील.’

लता आणि रफी यांनी आतापर्यंत ‘लग जा गले’, ‘धीरे धीरे चल चाँद गगन में’, ‘छुप गए सारे नजारे’, ‘तुझे जीवन की डोर से’, ‘इतना तो याद हैं मुझे’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी गायली आहेत.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा