Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड पुरंदर तालुक्यातील ‘या’ गावचे आहेत रजनीकांत, आजही सुपरस्टारच्या भेटीसाठी गावकरी पाहातायत वाट

पुरंदर तालुक्यातील ‘या’ गावचे आहेत रजनीकांत, आजही सुपरस्टारच्या भेटीसाठी गावकरी पाहातायत वाट

आयुष्यात प्रत्येकाला आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कामाच्या शोधात आपले घर, गाव सोडून इतर ठिकाणी जावे लागते. हे कुणालाही चुकले नाही, अगदी कलाकारांनासुद्धा. परंतु काही काळानंतर त्यांचा हाच निर्णय योग्यही ठरल्याचे दिसते. तिथूनच त्यांच्या पुढील पिढीसाठी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. परंतु आपले गाव सोडल्यानंतर जेव्हा जीवनात एक पल्ला गाठला जातो, तेव्हा काहींना आपल्या पूर्वजांचे गाव आठवते, त्यातील काहीजण गावाला भेटही देतात, तर काहींना देता येत नाही. असेच काहीसे ‘थलायवा’ म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते रजनीकांत यांच्याबाबतही आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर, 1950 रोजी बंगळुरू येथे झाला होता. परंतु त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या मूळ गावाला भेट दिलेली नाही. त्यांनी आपल्या गावाला भेट द्यावी अशी, त्यांच्या गावातील व्यक्तींचीही इच्छा आहे. मग आता सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, रजनीकांत यांचं मूळ गाव नेमकं आहे तरी कोणतं? जास्त विचार करून नका. आज या लेखातून आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

पुणे जिल्ह्यात आहे रजनीकांत यांच्या पूर्वजांचे गाव
तुम्हाला माहितीये का? रजनीकांत यांचं खरं नाव हे शिवाजीराव गायकवाड असं आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे रजनीकांत यांच्या पूर्वजांचे मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातच आहे. मग पुणे जिल्हा हा खूप मोठा आहे, तर त्यामध्ये कुठे असाही प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचं उत्तर म्हणजे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ‘मावडी कडेपठार’ हे त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आहे. जेजुरीपासून थोड्या अंतरावर असलेल्या मावडी गावाची लोकसंख्या जवळपास २,४०० च्या आसपास आहे. याच गावात गायकवाड कुटुंबियाची जवळपास ३० एक घरं आहेत. येथील काही लोक रजनीकांत यांची भावकी आहे, असे सांगतात.

कसा होता रजनीकांत यांच्या आजोबांचा प्रवास?
मावडी कडेपठार गावातील वयस्कर व्यक्ती आणि माध्यमांतील वृत्तांनुसार, रजनीकांत यांचे आजोबा रोजगाराच्या शोधात आपले हे गाव सोडून कर्नाटकच्या बसवना बेगेवाडी गावात गेले होते. परंतु तिथेही त्यांना हवं तसं काही मिळालं नाही अन् त्यांनी कामाच्या शोधात बंगळुरू गाठलं. तरीही त्यांची जमीन अजूनही तिथे आहे, परंतु कुटुंब मात्र तिथे राहत नाही.

भावकीतील लोकांना घेतली होती भेट
मावडी कडेपठार गावातील वयस्कर व्यक्ती सांगायचे की, जुन्या काळात गायकवाड कुटुंबीयांची एकत्र जागा होती. त्यावेळी तिथे घर बांधण्यासाठी गायकवाड कुटुंबातील काही लोकांनी कर्नाटकात जाऊन रजनीकांत यांच्या आजोबांची भेट घेतली होती. त्यादरम्यान बांधलेलं घरही आता पडल्याचे, गावातील सचिन गायकवाड सांगतात.

रजनीकांत यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न
आपल्या गावातील व्यक्ती आज इतक्या मोठ्या पदावर आहे, कलाकार आहे असं या गावातील लोकांच्या मनात आलं अन् त्यांनी रजनीकांत यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला. पर्यटकांसाठी महत्त्वाचं ठिकाण असलेल्या लोणावळा परिसरात रजनीकांत यांच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होती, त्यावेळी या गावातील लोक मोठ्या आनंदाने त्यांनी भेटण्यासाठी गेले होते. गावातील दीपक श्रीरंग गायकवाड यांनी थेट मुंबईत रजनीकांत यांची भेट घेत आपल्या पूर्वजांचे गाव असलेल्या मावडी कडेपठार गावाला भेट देण्याची विनंतीही केली होती.

काय आहे गावकऱ्यांची इच्छा?
रजनीकांत यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने लाखोच काय तर कोट्यवधी चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. अशामध्ये त्यांचे हे यश पाहून या गावातील लोकांच्या अंगावरही मुठभर मांस चढल्याचे दिसते. त्यांना रजनीकांत यांचा मोठा अभिमान वाटतो. सुपरस्टार रजनीकांतत यांनी आपल्या पूर्वजांच्या मावडी कडेपठार गावाला एकदा तरी भेट द्यावीच, अशी या गावातील गावकऱ्यांची तीव्र इच्छा आहे.

आजी आणि माजी सरपंचाची मतं
‘आमच्या गावातील, कुटुंबातील एक व्यक्ती आज सुपरस्टार आहे. ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. रजनीकांत सरांनी मिळवलेल्या यशाचा आनंद गावकऱ्यांना नेहमीच होतो. रजनीकांत सरांनी एकदातरी आपल्या पूर्वजांच्या मूळ गावाला भेट दिली पाहिजे. त्यांनी मावडी कडेपठार गावाला भेट दिली, तर नक्कीच गावाची प्रसिद्धी वाढेल,’ असे मावडी गावच्या माजी महिला सरपंच वैशाली खोमणे यांनी सांगितलं होतं.

सन २०१७ च्या शेवटी ज्यावेळी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती, तेव्हा मावडी कडेपठार गावातील लोकांनी पहाटे कडाक्याच्या थंडीत यशवंतराय मंदिरात रजनीकांत यांच्यासाठी पूजा केली होती. त्यावेळी काही लोकांना शिवाजी गायकवाड कोण आहे हे समजले नव्हते. त्यावेळी ते लोक हसले होते. गावाचे तत्कालीन सरपंच हनुमंत चाचर यांनी म्हटले होते की, “आमचा शिवाजीच तुमचा रजनीकांत आहे.” रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेतल्यानंतर गावातील लोक खूपच उत्साहित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेतली होती रजनीकांत यांनी भेट
सन २०१० मध्ये रजनीकांत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, “मी एक मराठी माणूस आहे. तसेच मी कर्नाटक आणि तमिळनाडूचाही आहे. यासोबतच मी एक भारतीय व्यक्ती आहे.” त्यादरम्यान त्यांनी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

रजनीकांत यांना ५१ वा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. याची माहिती गुरुवारी (१ एप्रिल) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती.

हा पुरस्कार त्यांना येत्या ३ मे रोजी देण्यात येणार आहे. (thalaiva rajinikanth village is still waiting for his superstar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट
रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

हे देखील वाचा