कुठल्याही स्टारसाठी असा जबरदस्त चाहतावर्ग क्वचितच पाहायला मिळतो. जिथे तो जातो, तिथे चाहत्यांची गर्दी उसळते आणि वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण होतो. असा सुपरस्टार म्हणजे थलापथी विजय. (Thalapathy Vijay)रविवारी रात्री चेन्नई विमानतळावरही असाच प्रकार पाहायला मिळाला, जेव्हा मलेशियाहून परतलेल्या विजयला पाहण्यासाठी हजारो चाहते एकत्र जमले आणि काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मलेशियातील कार्यक्रमावरून परतताच विजय विमानतळावर दाखल झाला आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना जमाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत विजयचा तोल गेला आणि तो घसरून खाली पडला. सुदैवाने, या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तमिलगा वेट्री कजगम (TVK) पक्षाचे अध्यक्ष आणि लोकप्रिय अभिनेता असलेला विजय, मलेशियातील ‘जन नायकन’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमानंतर चेन्नईत परतला होता.
विमानतळाबाहेर पडताच चाहते मोठ्या संख्येने पुढे सरसावले. अचानक गर्दी बेशिस्त झाल्याने त्याच्या वाहनाजवळ गोंधळ उडाला आणि त्याच वेळी विजयचा तोल गेला. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्याला आधार दिला आणि सुरक्षितपणे त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवले.
घटना काही सेकंदांतच आटोक्यात आली. पोलिसांनी गर्दी मागे ढकलत परिसर रिकामा केला. विजय पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. काही वृत्तवाहिन्यांनी असा दावा केला की त्याच्या ताफ्यातील एका वाहनाला किरकोळ अपघात झाला, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
याआधी २७ डिसेंबर रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथील बुकित जलील स्टेडियममध्ये ‘जन नायकन’ चित्रपटाचा भव्य ऑडिओ लाँच सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाला सुमारे १ लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला आहे.या मंचावर विजयने आपल्या चाहत्यांशी भावनिक संवाद साधत भविष्यातील वाटचालीबाबत मोठे विधान केले. त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले की तो आता चित्रपटांपेक्षा सार्वजनिक जीवन आणि राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
आपल्या भाषणात विजय म्हणाला, “मी जेव्हा चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा मला वाटले होते की मी वाळूचे एक छोटे घर उभारत आहे, पण माझ्या चाहत्यांनी त्याला राजवाडा आणि किल्ला बनवले.”तो पुढे म्हणाला की प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर यामुळेच तो आज या टप्प्यावर पोहोचला असून, त्याच भावनेतून तो सिनेसृष्टीला निरोप देत आहे.विमानतळावरील ही घटना क्षणिक असली तरी, थलापथी विजयच्या लोकप्रियतेचा आणि चाहत्यांच्या अफाट प्रेमाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘ना आरआरआर’ ना ‘बाहुबली, नाही,धुरंधर’, हा आहे भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट










