Tuesday, June 24, 2025
Home मराठी सासू-सुनेच्या भांडणाच्या कंटाळवाण्या मालिकांना छेद देत नवीन विषय घेऊन आल्या ‘या’ मराठी मालिका

सासू-सुनेच्या भांडणाच्या कंटाळवाण्या मालिकांना छेद देत नवीन विषय घेऊन आल्या ‘या’ मराठी मालिका

सासू सुनेच्या त्याच त्याच कंटाळवाण्या साचात आपण अनेक मालिका पाहिल्या आहेत. हा त्याच्याविरुद्ध कट रचतो तो यांच्याविरुद्ध कट रचत असतो, पण या सगळ्या बाहेर जाऊन टेलिव्हिजनवर काही नवीन विषय घेऊन देखील मालिका आल्या आहेत. म्हणजे त्यांची केवळ कहाणी प्रेक्षकांना भावली नाही, तर एक वेगळा दृष्टीकोन देखील मिळाला. खरंतर मालिका या समाजातील विविध घटकांना प्रेक्षकांच्या समोर आणत असतात आणि तसे वागण्याचा एक दृष्टिकोन देतात. परंतु नेहमीचेच घरगुती सासू सुनेचे भांडण, कटकारस्थान या पलीकडे जाऊन काही नवीन विषय घेऊन देखील मालिका आल्या आहेत. या लेखात आपण त्याच मालिकांबद्दल जाणून घेऊया.

दिल दोस्ती दुनियादारी
सहा मित्रांचा प्रवास असलेली ही मालिका. मीनल, ऍना, रेश्मा, सुजय, कैवल्य आणि आशुतोष हे सहा मित्र फक्त एक फ्लॅटच शेअर करत नाहीत, तर एकमेकांसोबत त्यांचे आयुष्यही शेअर करतात. हे सर्वजण आपापल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले असतात. आपल्या कुटुंबापासून दूर येऊन ते एका कुटुंबाप्रमाणे राहतात. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतो. कितीही वाईट परिस्थिती असली, तरीही ते नेहमी एकमेकांच्या पाठिशी उभे असतात. त्यांचे जीवन रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नसते. अशी ही बॅचलर मुलांची लाईफ सांगणारी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका होती. ही मालिका चांगलीच गाजली होती. ९ मार्च, २०१५पासून ते २० फेब्रुवारी, २०१६पर्यंत चाललेल्या या मालिकेत अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, पियुष चिपळुणकर, स्वानंदी टीकेकर, सुव्रत जोशी यांसारख्या तरुण कलाकारांच्या भूमिका होत्या.

देवमाणूस
मागील वर्षात एका मालिकेने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ कदाचित मराठीमधील ही अशी पहिलीच मालिका असेल ज्यातील मुख्य भूमिका नकारात्मक होती. आतापर्यंत क्राईम मालिकांमध्ये या मालिकेनं टीआरपीच्या यादीत भरारी घेतली होती. मालिकेत किरण गायकवाड हा मुख्य आणि खलनायकाच्या भूमिकेत होता. या मालिकेच्या प्रोमोपासूनच सगळ्यांनी मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. एक आगळी वेगळी कहाणी, मालिकेतील पात्र, डायलॉग, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खास करून भावल्या. तसेच किरण गायकवाड नकारात्मक भूमिकेत असूनही कोणी त्याचा राग- राग केला नाही, तर त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुकच होत होते. ३१ ऑगस्ट, २०२०पासून ते १५ ऑगस्ट, २०२१ पर्यंत चाललेल्या या मालिकेने ३०२ एपिसोड पूर्ण केलेल्या ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेम हे
‘प्रेम हे..’ ही मर्यादित भागांची मालिका आहे, ज्यामध्ये शालेय जीवनापासून ते वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळ्या प्रेमकथा होत्या. या मालिकेत प्रेमाची भावना जरी सारखी, असली तरी व्यक्तीच्या वयानुसार यातील कथा बदलत होत्या. पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या एका तरुण जोडप्यांपासून ते वृद्ध जोडप्यापर्यंतच्या प्रेम कथा ‘प्रेम हे’ या मालिकेत दाखवल्या होत्या. झी युवावरील ही मालिकाही प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. यातील प्रेम कहाण्यांतून तरुणाईला त्यांच्या मनाचं ऐकण्यास आणि प्रेमावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केले जायचे. या मालिकेचं शीर्षगीतही खूपच सुंदर होतं. हे गीत गायिका केतकी माटेगावकरने गायलं होतं. या मालिकेचा पहिला एपिसोड २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी टेलिकास्ट करण्यात आला होती. यामध्ये प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. त्यात प्रथमेश परब, स्पृहा जोशी, वैभव तत्ववादी, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान, यांसारख्या कलाकार होते.

लक्ष्य
गुन्हेगारी विश्वाबद्दल सर्वसामान्यांना कायम कुतूहल असते. त्यामुळेच त्या विषयांवरील कथा, कादंबरी असं साहित्य वाचकप्रिय ठरतं. साहित्याप्रमाणेच या विषयावरील सिनेमे आणि मालिकाही खूप लोकप्रिय होतात. पण मधल्या काळात अशा कार्यक्रमांची संख्या तशी फारशी दिसली नाही. मात्र, गुन्ह्याशी संबंधित थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झपाट्याने वाढणारे गुन्हे पाहता गुन्ह्यांवर आधारित मालिकांनाही त्यांच्या मांडणीमध्ये अनेक बदल करावे लागले. गुन्हा कसा घडला, का घडला, कशाप्रकारे गुन्ह्यांचा तपास केला जातो, गुन्हे टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? हे सर्व लक्ष्य या मराठी मालिकेत दाखवण्यात आले होते. या मालिकेचे आतापर्यंत दोन सिझन आलेत. पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड २५ ऑगस्ट, २०११, तर शेवटचा एपिसोड १७ सप्टेंबर, २०१६ रोजी टेलिकास्ट करण्यात आला होता. त्यानंतर या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचा पहिला एपिसोड ७ मार्च, २०२१ टेलिकास्ट करण्यात आला होता. त्यानंतर २५ एप्रिल, २०२१ रोजी या मालिकेचा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर या मालिकेने ब्रेक घेत पुन्हा ४ जुलै, २०२१पासून पुनरागमन केले. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये १२२६ एपिसोड होते, तर दुसरा सिझन सुरू असून त्यातील ३७ एपिसोड टेलिकास्ट करण्यात आलेत. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये कमलेश सावंत, अशोक समर्थ, श्वेता शिंदे, आदिती सारंगधर, परी तेलंग, यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

रात्रीस खेळ चाले
यादीतील शेवटची मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ ही एका भटक्या मृत आत्म्याची मालिका आहे. आतापर्यंत या मालिकेचे ३ सिझन झाले आहेत. या मालिकेमधील शेवंता आणि अण्णा नाईक यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाचं ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळते. ही मालिका दररोज रात्री ११ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या मालिकेने टीआरपीमध्येही चांगली कामगिरी केलीये. या मालिकेतील सर्व मालिकांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी टेलिकास्ट करण्यात आला होता. या मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईक यांच्या, शकुंतला नरे इंदुमती अण्णा नाईकच्या, तर अपूर्वा नेमळेकर शेवंताच्या भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही  वाचा-

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘लोकलमध्ये माझ्यावर अत्याचार झाला होता’ मुंबई मेट्रो सुरू करण्याबाबत बोलताना रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा