Saturday, July 6, 2024

निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट ‘येरे येरे पावसा’ १७ जूनला चित्रपटगृहांत

पुणे : कधी सुखावणारा तर कधी दु:खाच्या काठावर नेऊन सोडणारा पाऊस आपल्या आयुष्याला व्यापून राहिलेला असतो कायम. पाऊस नित्यनेमाचाच.. तरीही भेटतो प्रत्येक वेळी नव्याने एक नवीन न उलगडणारं कोडं होऊन. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग घेऊन ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. काय आहे या चित्रपटाची विशेष कथा चला जाणून घेऊ. 

आपण एखाद्या मित्राची वाट बघत असतो, पण ठरल्यावेळी तो येत नाही. तो उद्या येईल असं आपण आपल्या मनाला समजावतो पण तो दुस-या दिवशीही येत नाही.आपली निराशा होते. त्याला आपण जवळजवळ विसरतो. पण आतल्या आत मनाची घालमेल होतच राहते. मग बहुतेक तो उशिरा येईल किंवा येणारच नाही अशी मनाची अटकळ करतो आणि मग एके दिवशी अचानक अगदी ध्यानीमनी नसताना तो येतो. बेधुंद होऊन अशा मित्रासारखाच पहिला पाऊस येतो तेव्हा आपण त्या आनंदाने सुखावून जातो. एका छोटयाशा दुर्गम खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट.

छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये मोहोर उमटविली आहे. १४ देशातल्या ३१ चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने २२ नामांकन आणि १६ पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा