Saturday, July 27, 2024

कर्करोग जनजागृती दिन: फक्त सुशांतसिंग नव्हे, कॅन्सरशी लढणाऱ्या पडद्यावरील ‘या’ भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात

हिंदी सिनेमातील कलाकारांनी वेगवेगळी भूमिका निभावून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या आजारी व्यक्तींच्याही भूमिका पडद्यावर उत्तमरीत्या साकारल्या आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीझ झालेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने कॅन्सर (कर्करोग) पीडित व्यक्तीची भूमिका साकारली आहे. इतकेच नव्हे, तर त्याच्यासोबतच शाहरुख खान, राजेश खन्ना यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी कॅन्सर सारख्या आजारी व्यक्तींची भूमिका साकारून कॅन्सरने पीडित असणाऱ्या लोकांचं दुःख समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि शाबासकी देखील मिळाली आहे.

आता तुम्ही म्हणाल की, हे कॅन्सरबाबत का सांगितलं जातंय? याचं कारण असं की, आज (4 फेब्रुवारी) ‘जागतिक कर्करोग दिन’ आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी साकारलेल्या पीडित व्यक्तीच्या भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत.

राजेश खन्ना- सफर (1970)
सर्वोत्कृष्ट अभिनयाबाबत जेव्हा बोललं जातं, तेव्हा ‘राजेश खन्ना’ यांचं नावं घ्यायला कोणीच विसरत नाही. राजेश खन्ना यांनी 1970 मध्ये रिलीज झालेल्या ‘सफर’ या सिनेमात कॅन्सर पीडित व्यक्तीचं पात्र निभावलं होत. या सिनेमात त्यांनी ‘अविनाश’ नावाच्या पीडित व्यक्तीची भूमिका साकारली होती. यामध्ये अविनाश शर्मिला टागोर म्हणजे डॉक्टर नीला हिच्यावर प्रेम करत असतो. परंतु अविनाशने कधीही नीलाला लग्नासाठी विचारले नाही. सगळ्यांना असे वाटले की कदाचित अविनाशची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, म्हणून तो असे वागत असेल पण नंतर जाऊन सगळ्यांना समजले की अविनाशला लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे.

राजेश खन्ना- आनंद (1971)
‘सफर’ या सिनेमानंतर राजेश खन्ना यांनी पुढच्याच वर्षी ‘आनंद’ या सिनेमात कॅन्सर पीडित व्यक्तीचं काम केलं. या सिनेमात राजेश खन्ना यांनी आनंद सहगल या पीडिताच पात्र निभावलं आहे. आनंद याला माहिती होते की तो 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जिवंत नाही राहू शकत, तरीदेखील तो खूप खुश राहायचा. सोबतच त्याच्या आजूबाजूच्या माणसांना देखील खुश ठेवायचा. या सिनेमात भास्कर बॅनर्जी नावाचं एक पात्र होत. जे की अमिताभ बच्चन यांनी निभावलं होतं. भास्कर देखील आनंदच्या व्यक्तिमत्त्वामुळे खूपच प्रभावित झाले आणि ते दोघेही खूप चांगले मित्र बनले. ‘आनंद’ हा सिनेमा राजेश खन्ना यांच्या सिनेमाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. त्यांना या सिनेमा साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

आदित्य पांचोली- याद रखेगी दुनिया (1992)
सन 1989 मध्ये तेलुगु भाषेमध्ये गीतांजली नावाचा एक ब्लॉकबस्टर सिनेमा येऊन गेला. त्यानंतर 3 वर्षांनी 1992 मध्ये दीपक आनंद यांनी याच सिनेमाचा रिमेक करून त्याला ‘याद रखेगी दुनिया’ हे नाव दिले. जेव्हा हाच सिनेमा हिंदी मध्ये बनवला गेला, तेव्हा आदित्य पांचोली आणि रुखसार रेहमान हे मुख्य भूमिकेत दिसले. आदित्य पांचोली यांनी या सिनेमात ‘विक्की आनंद’ यांचं पात्र निभावलं होतं. तो एका अपघातात जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये जातो. त्यानंतरच त्याला कॅन्सर असल्याचं समजतं. त्यानंतर तो सगळं सोडून डोंगरामध्ये राहायला जातो, आणि तिथे त्याची भेट नयना नावाच्या एक हसमुख मुलीसोबत होते. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण नंतर जाऊन असं समजतं की नयनाला देखील तोच आजार आहे ज्या आजारातून विक्की जात आहे.

शाहरुख खान- कल हो ना हो (2003)
हिंदी सिनेसृष्टीत बादशाह शाहरुख खान याने सुद्धा निखिल आडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या सिनेमात एका कॅन्सर पीडितचं काम केलं आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत सैफ अली खान आणि प्रीति झंटा हे देखील प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाची कहाणी मुख्यतः प्रीति झंटाच पात्र ‌’नैना कपूर’ हिच्यावर आधारित आहे. ती तिच्या घराशेजारी राहणाऱ्या अमनवर प्रेम करत असते. परंतु अमनला कॅन्सर असल्याने तो तिला जास्त त्याच्याजवळ येऊ देत नसत. शाहरुख खानच हे पात्र खूपच गाजलं होतं. त्याला या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे.

अमिताभ बच्चन- वक्त: द रेस अगेन्स्ट टाईम (2005)
सन 2005 मध्ये रिलीझ झालेला ‘वक्त- द रेस अगेन्स्ट टाईम’ हा चित्रपट अमृतलाल सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी कॅन्सर पीडिताचं पात्र निभावलं होत. यामध्ये अमिताभ आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी घराबाहेर काढतात. त्यांच्या मुलाची भूमिका अक्षय कुमार यांनी निभावली आहे. त्यांना नंतर जाऊन समजले की, ते एक कॅन्सर पीडित आहेत आणि जास्त दिवस या दुनियेत राहणार नाही.

मनीषा कोईराला- तुलसी: मातृदेवोभव: ( 2008)
तुलसी – मातृदेवोभव: हा सिनेमा सन 2008 मध्ये रिलीझ झाला होता. त्यामध्ये मनीषा कोईरालाने कॅन्सर पीडित महिलेचं पात्र निभावलं होतं. त्यात तीचं नाव ‘तुलसी’ हे आहे. या सिनेमात तुलसीचं लग्न सूरज नावाच्या एका दारुड्या मुलाबरोबर झालेलं असतं. ही भूमिका इरफान खानने साकारली होती. काही दिवसांनी सूरजचा मृत्यू झाला. त्या दोघांना 4 मुले होती. सूरजच्या मृत्यू नंतर त्या 4 मुलांची जबाबदारी तुळशीवर येते. पण ती मरण्याच्या आधी तिला तिच्या सगळ्या मुलांना एका चांगल्या परिवारात द्यायचं असतं. या सिनेमाचं दिग्दर्शन अजय कुमार यांनी केलंय. हिंदी सोबतच हा सिनेमा तेलुगु, कन्नड आणि मराठी भाषेत देखील चित्रित झालय.

जॉन अब्राहम- आशाएँ (2010)
नागेश कुकणुर यांनी सन 2010 मध्ये जॉन अब्राहम, सोनल सहगल, प्रतीक्षा लोणकर, गिरीश कर्नाड आणि फरिदा जलाल या दिग्गज कलाकारांना घेऊन ‘आशाएँ’ हा चित्रपट बनवला आहे. जॉन अब्राहमने कॅन्सर रुग्णाची भूमिका पार पाडली आहे. तो नफिसा नावाच्या मुलीचा प्रेमात पडतो ते दोघे लग्न करायचा निर्णय देखील घेतात, पण नंतर त्याला कळते की त्याला कॅन्सर झाला आहे.

अनुष्का शर्मा- ऐ दिलं हैं मुश्किल (2016)
‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणवीर कपूर हे मुख्य भूमिकेत होती.या चित्रपटात अनुष्काने अलिजा खान हीच पात्र निभावलं आहे जिला कॅन्सर असतो. ही गोष्ट रणबीर कपूरला खूप उशिरा समजते, तरी देखील तो तिला खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.

सैफ अली खान- कालाकांडी (2017)
अक्षत वर्मा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘कालाकांडी’ हा एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटात सैफ अली खान, अक्षय ओबेरॉय, इशा तलवार या कलाकारांनी उत्तम भूमिका पार पाडली आहे. या चित्रपटात सैफ अली खान याने रिलीन हे पात्र निभावलं आहे. त्याला नंतर जाऊन कळलं की त्याला पोटाचा कॅन्सर आहे. परंतु त्यांनी अस ठरवलं की उरलेला 1 महिना तो दिलखुलास पणे जगणार आणि त्याने त्या एक महिन्याचा पूर्ण आनंद घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटातील ‘अशा’ गाण्यामुळे कायदेशीर अडचणीत सापडले होते कमल हासन, अभिनेत्यावर गुन्हा दाखल

रियल लाईफ हिरो! ‘विक्रम’च्या जबरदस्त कमाईतून कमल हासन करणार ‘ही’ कामे, जाणून तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा