Thursday, April 25, 2024

प्रेम! संजीव कुमारांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ‘ही’ अभिनेत्री, अभिनेत्याचे निधन होताच गेली होती नैराश्यात

फक्त आजच्याच काळात कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या येतात असे नाही. बॉलिवूडमध्ये अगदी जुन्या काळापासूनच वेगवेगळ्या कलाकारांच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती समोर येते. दिलीप कुमार, मधुबाला यांच्यापासून किंबहुना याही आधीपासून कलाकार त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. याला इतर कलाकार काही अपवाद नाही. 70 ते 80 च्या दशकातील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही होताना आपण पाहतो, वाचतो, ऐकतो. आज आपण एका अशाच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या प्रेमालाच संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्या अभिनेत्री आहेत सुलक्षणा पंडित. बुधवारी (दि. 12 जुलै) सुलक्षणा पंडित आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल खास गोष्टी…

सत्तर/ऐंशीच्या दशकात सुलक्षणा पंडित नावाच्या दिग्गज अभिनेत्री आणि गायिका होऊन गेल्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि सुमधूर आवाजाने सर्व प्रेक्षकांना भूरळ घातली. सुलक्षणा यांचे डोळे त्याकाळी खूपच चर्चेचा विषय होते. मोठे आणि पाणीदार डोळे असलेल्या सुलक्षणा यांच्या सौंदर्याच्या बातम्या त्याकाळी खूप प्रसिद्ध होत्या. 12 जुलै, 1954साली छत्तीसगडच्या रायगड येथे सुलक्षणा यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 9व्या वर्षीच गाणे गायला सुरुवात केली. काही काळाने आणि नशिबामुळे त्या चित्रपटसृष्टीपर्यंत आल्या आणि 1967साली त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले. यादरम्यान त्यांना अभिनयाच्या देखील ऑफर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी गाण्यासोबतच अभिनय करायचे देखील ठरवले. 1975 साली आलेल्या ‘उलझन’ या सिनेमातून त्यांनी मोठ्यापडद्यावर पदार्पण केले. या सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेते संजीव कपूर होते.

संजीव यांना सुलक्षणा याच सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटल्या होत्या. गंभीर स्वभावाच्या संजीव यांच्यावर बघताचक्षणी त्या भाळल्या. त्यावेळी संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि हे सुलक्षणा यांना माहित असूनही त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. संजीव यांना हेमाजींसोबत लग्न करायचे होते, त्यासाठी त्यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज देखील केले. मात्र, हेमाजींनी ते प्रपोजल अमान्य केले. कारण त्यांचे धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होते. हेमाजींनी नकार दिल्यानंतर संजीव यांना खूप वाईट वाटले. सुलक्षणा आणि संजीव यांची मैत्री खूप खास आणि जवळची होती. संजीव सुलक्षणा यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करायचे.

जेव्हा संजीव यांना हेमा यांनी नकार दिला, त्यानंतर काही काळाने सुलक्षणा यांनी त्यांच्याकडे प्रेमाची कबुली देत त्यांना लग्नासाठी विचारले. मात्र, संजीव यांनी त्यांना नकार दिला. या नकारानंतर सुलक्षणा यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. त्यांनी हळहळू सिनेमे करणे बंद केले आणि बाहेरच्या जगाशी त्यांनी त्यांचा संपर्क तोडून टाकला.

पुढे सुलक्षणा त्यांच्या आईसोबत मुंबईत राहू लागल्या. मात्र, असे असूनही सुलक्षणा सामान्य होत नव्हत्या. त्या संपूर्णपणे नैराश्यात गेल्या. 1985 साली जेव्हा संजीव कुमार यांचे निधन झाले, तेव्हा तर त्या पूर्णपणे कोलमडल्या. त्यांना संजीव यांच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले आणि त्या कोणाला ओळखण्यास सक्षम नव्हत्या. जेव्हा त्या हळूहळू सामान्य होऊ लागल्या, तेव्हा त्यांनी 1999 साली एका मुलाखतीमध्ये त्यांच्या तब्येतीविषयी सांगितले होते.

त्या म्हणाल्या होत्या, “संजीव यांच्या मृत्यूनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी जवळपास स्वतःला संपवलेच होते. मात्र, देवाच्या इच्छेपुढे माझे काही चालले नाही आणि मी वाचले. आज मी माझे जीवन तर जगात आहे, मात्र अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरली नाहीये. मी दिवसदिवसभर माझ्या रूममध्ये असते आणि जुन्या नव्या मूवी बघते. गाणे ऐकते. यामुळे मला माझे जीवन जगायला प्रेरणा मिळते.” आज सुलक्षणा त्यांच्या बहिणीसोबत विजेता पंडितसोबत राहतात.

अधिक  वाचा- 
शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर; अभिनेता समीर खांडेकर म्हणाला…
स्पीड भोवला: मनोरंजनविश्वातील ‘या’ सुपरस्टारला भरावा लागला भुर्दंड

हे देखील वाचा