कोणताही कलाकार हा तेव्हाच हिट होतो, जेव्हा त्याचे सिनेमे हिट होतात. आपल्याला आपल्या आवडत्या कलाकाराचा अभिनय आवडतो, त्याचे पडद्यावरील वागणे, बोलणे आवडते. मात्र, हे त्याचे कधीच नसते. या सर्व गोष्टींमागे एकमेव व्यक्ती असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक. आपण कोणताही सिनेमा बघत असलो, तरीही त्यामागची नजर आणि सिनेमाचे व्हिजन हे दिग्दर्शकाचेच असते. त्यामुळे अभिनयासाठी जेव्हा कलाकरांना प्रेक्षक शाबासकी देतात, तेव्हा तो अभिनय कलाकारांकडून करून घेण्यासाठी दिग्दर्शकाला डबल शाबासकी मिळाली पाहिजे.
या सिनेमांच्या इतिहासामध्ये असे अनेक मोठे दिग्दर्शक होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या डोक्यात आणि नजरेत असलेला चित्रपट हुबेहूब पडद्यावर साकारला. कलाकरांना मोठे करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा दिग्दर्शकाचा असतो. एक दिग्दर्शक त्याची गोठ कलाकारांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत असताना अनेक चांगल्या- वाईट गोष्टींचा सामना करतो आणि त्याची कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करतो. प्रत्येक दशकामध्ये असे मोजके दिग्दर्शक आले, ज्यांनी चित्रपटांना पाहण्याची एक वेगळी नजर लोकांना दिली. त्यांना प्रवाहाच्या वेगळे सिनेमे दाखवले. असेच एक मोठे आणि हटके व्हिजन असणारे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक म्हणजे प्रकाश मेहरा.
अतिशय गुंतागुंतीच्या किंवा पठडीबाहेरील कथा सहज पडद्यावर उतरवण्याचे कसब प्रकाश यांना अवगत होते. रोमँटिक चित्रपटाच्या गर्दीत प्रकाश मेहरा यांनी ऍक्शन सिनेमे करत त्यांचे वेगळेपण दाखवून दिले. अमिताभ बच्चन यांना ‘महानायक’ आणि ‘दि अमिताभ बच्चन’ बनवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा प्रकाश मेहरा यांचा आहे. मंगळवारी (१३ जुलै) प्रकाश मेहरा यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
प्रकाश मेहरा यांचा जन्म १३ जुलै, १९३९ मध्ये उत्तरप्रदेशमधील बिजनोर येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांबद्दल खूप आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी १९५० साली मुंबईला येत त्यांनी येथे प्रॉडक्शन कंट्रोलर ही नोकरी करण्यास सुरुवात केली. जवळपास १८ वर्षांनी म्हणजेच १९६८ साली त्यांनी शशी कपूर यांना घेऊन ‘हसीना मान जायेगी’ हा सिनेमा करत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण केले. जेव्हा अमिताभ यांची या क्षेत्रात एन्ट्री झाली, तेव्हा राजेश खन्ना आधीच येथे सुपरस्टार होते. त्यांनी ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे सिनेमे केले. मात्र, त्यानंतर अमिताभ यांचे १० सिनेमे फ्लॉप झाले, आणि हताश होऊन अमिताभ यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचक्षणी त्यांचा तारणहार म्हणून प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना अभिनेते ‘प्राण’ यांच्या सांगण्यावरून ‘जंजीर’ हा सिनेमा ऑफर केला. या सिनेमाने अमिताभ यांना यशाची चव चाखायला दिली. ‘जंजीर’ हा सिनेमा आजही हिंदी सिनेमातील यशस्वी सिनेमांमध्ये सामील होतो.
ज्या काळात रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, त्याकाळात प्रकाश मेहरा आणि अमिताभ यांनी ऍक्शन सिनेमे करत सर्वाना एक वेगळा पर्याय दिला. ‘जंजीर’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘जादूगार’ हे सिनेमे करत अमिताभ यांना ‘एँग्री यंग मॅन’चा किताब मिळवून दिला. प्रकाश मेहरा हे असे दिग्दर्शक होते, जे सेटवरील उपस्थित सर्व लोकांवर मनापासून विश्वास ठेवायचे आणि त्याचेच फळ यांना सिनेमाच्या यशाने मिळायचे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??










