Wednesday, July 3, 2024

सुपरस्टारचा मुलगा बापाच्या सिनेमाच्या सेटवर मजुरी करत होता तर नवखा व्यक्ती नायक झाला होता

बॉलिवूडचे ‘शो मॅन’ म्हटले जाणारे रणवीर राज कपूर, ज्यांना आपण प्रेमाने राज कपूर म्हणूनच ओळखतो. आपल्या ६ भावंडांमध्ये ते सगळ्यात मोठे होते. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर एका वेगळ्याच विचाराचे होते. त्यांना असे कायम वाटायचे की, आपल्या मुलांना कमी वयातच ऐशोआरामाचे जीवन मिळायला नकोय. त्यांचे हे विचार ऐकून राज कपूर एकदा भरपावसात घरचे वाहन असताना, चालत शाळेत गेले होते. हे बघून त्यांच्या आईने त्यांना आवाज द्यायचे ठरवले. पण, पृथ्वीराज साहेबांनीं सांगितले की, जाऊदेत त्याला, बघ एक दिवस असा येईल की, तो मोठ मोठया गाड्यांचा मालक होईल .

लोक राज कपूर यांचे भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या अभिनयाचे-चित्रपटांचे वेडे आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटांद्वारे परदेशी प्रेक्षकांवरही खोलवर छाप सोडली होती. अनेक चित्रपटांमधून जबरदस्त भूमिका केलेले राज कपूर हे चित्रपट कारकिर्दीत यशाच्या सर्वोत्तम शिखरावर विराजमान झाले होते.

राज कपूर हे चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी वडिलांच्या सांगण्यावरून एक मजूर म्हणून काम करायचे. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांना कायम वाटायचे की, आपल्या मुलाने शून्यापासून सुरवात करावी . राज कपूर हे बॉम्बे टॉकीजमध्ये मजूर म्हणून काम करायचे, ज्यामुळे त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात अगदी शून्यापासून झाली होती. त्यावेळी राज कपूर हे सेटवर साफसफाई करणे, सामान या जागेहून त्या जागी ठेवण्यासह सेटवर बरीच कामे करायचे. सुपरस्टार यांचा मुलगा असूनही, त्यांनी कोणतेही काम करण्यास मागेपुढे पाहिले नाही. ते आपल्या सहकारी मजुरांसमवेतच खायचे. ‘ज्वार भाटा’ हा चित्रपट ज्यावेळी बनत होता, त्यावेळी राज कपूर ‘ज्वार भाटा’ चित्रपटाच्या सेटवर मजूर म्हणून काम करायचे.

राज कपूर यांचे खास मित्र प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, त्यावेळी ‘ज्वार भाटा’ चित्रपटात नायक म्हणून काम करत होते, हे विचार राज कपूर यांना खूप अस्वस्थ करायचे.  ज्याचा चित्रपटाशी काही संबंध नाही तो चित्रपटाचा नायक व ज्याचे घरदार चित्रपट क्षेत्रात काम करतेय, तो त्याच चित्रपटाच्या सेटवर मजुरी करतोय, हे पाहणाऱ्यालाही विचित्र वाटत असे.

एक दिवस राज कपूर यांना त्यांच्या या परिस्थितीवर इतका राग आला की, त्यांनी चित्रपटाच्या सेटवर हातात असलेला हातोडाच फेकून मारला. यामुळे झाले काय तर सेटचा काही भागच तुटला. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही कुणीही त्याना काहीही बोलले नाही.

त्या दिवशी राज कपूर यांना समजले की, जर दुसरे कोणी हे कृत्य केले असते तर त्याला क्षमा केली गेली नसती. ते सुपरस्टार पृथ्वीराज यांचा मुलगा असल्याने, त्यांना कोणी काहीही बोलले नाही. त्यानंतर राज कपूर यांनी पुन्हा असे कृत्य कधीची केले नाही आणि अधिक परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध केले.

हे देखील वाचा