Monday, July 1, 2024

“…चित्रपटात आशयघनता कुठे आहे?…” बाईपण भारी देवा सिनेमाबद्दल मराठी दिग्दर्शकाच्या पोस्टने वेधले लक्ष

संपूर्ण देशभरात सध्या एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. नाही नाही हिंदी, दाक्षिणात्य नाही तर मराठी सिनेमाबद्दल चर्चा आहे. हो सध्या सगळीकडे फक्त ‘बाईपण भारी देवा’ याच सिनेमाचा बोलबाला आहे. भल्याभल्या हिंदी, इंग्लिश, दाक्षिणात्य चित्रपटांना पछाडून केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. ‘वेड’ सिनेमाचे अनेक रेकॉर्ड या सिनेमाने मोडले आहे. कोटींपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या या सिनेमामुळे मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा भरारी आली आहे. यामुळेच अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सध्या सिनेमाचे, कलाकारांचे आणि दिग्दर्शकाचे कौतुक करताना दिसत आहे.

अशातच मराठी मनोरंजनविश्वातील दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट विजू माने यांनी जरी शेअर केली असली तरी त्यांच्या या पोस्टमधून इतर कलाकार, दिग्दर्शक आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्याच भावना त्यांनी एक प्रतिनिधी म्हणून मांडल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

विजू माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार… सध्या तिकीट बारी वर “बाई पण भारी देवा” हा ‘भारीच’ जमून आलेल्या सिनेमा ‘भारी’ गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. ‘उत्तम सिनेमा’ हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी सिने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम सिनेमे बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे. आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम सिनेमा करण्याची शक्यता आहे. मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित सिनेमांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात सिनेमा बनवताना कोणीही ‘चला आज वाईट सिनेमा बनवूया’ असं म्हणून सिनेमा बनवत नाही. पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी केवळ ‘मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा सिनेमा केला’ असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी सिनेमांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी. आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटर मध्ये टाळ्या शिट्ट्या नाच करत सिनेमा एन्जॉय करण्याची ‘सवय’ लावायला हवी. आता यातही ‘प्रेक्षकानुनय केलेला सिनेमा’ ‘त्यात काय एवढं?’ ‘मला बाई फार नाही आवडला’ ‘आशयघनता कुठे आहे?’ “सिनेमात डेप्थ नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच.
But nothing succeeds like success.
‘बाई पण भारी देवा’ च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं .”

विजू माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या मतासोबत सहमती दर्शवली आहे. सोबतच त्यांचे अनुभव देखील सांगितले आहे. सध्या या पोस्टची सगळीकडेच चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान बाईपण भारी देवा हा सिनेमा पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला. मात्र आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमात रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, दीपा परब, दीप्ती नवलकर, वंदना गुप्ते आदी प्रतिभावान अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

अधिक वाचा- 

ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती! ”स्वामीसुत” भूमिकेचा शेवट झाल्यानंतर मराठी अभिनेत्याने केलेली पोस्ट ‘ती’ व्हायरल

प्रियांकावर आली होती तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवण्याची वेळ, जाणून घ्या काय होतं कारण?

हे देखील वाचा