Sunday, June 22, 2025
Home कॅलेंडर खरं की खोटं? रणबीर-अलियाच्या लग्नाच्या बातम्यांबद्दल कपूर खानदानातील ‘या’ सदस्यानेच केला मोठा खुलासा

खरं की खोटं? रणबीर-अलियाच्या लग्नाच्या बातम्यांबद्दल कपूर खानदानातील ‘या’ सदस्यानेच केला मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. कोणते कलाकार कधी विवाहबंधनात अडकतील याचा काहीही नेम नाही. गेल्या दोन महिन्यातच पाहिलं असेल आपण एकामागोमाग एक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटोच थेट सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. ना आधी काही पूर्व कल्पना… ना सूचना… हे कलाकार गुपचूप लग्न करून मोकळे सुद्धा झाले होते. म्हणूनच मीडिया सुद्धा आता हुशार झालीये. जे कपल येत्या काही काळात लग्न करू शकतात अशा सर्वांच्या मागे आपले प्रतिनिधी लावले आहेत. जेणेकरून वेळेवर बातम्या मिळतील आणि यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले.

नुकताच अभिनेता रणबीर कपूर, त्याची आई नितु कपूर आणि प्रेयसी आलीया भट्ट हिच्यासोबत मुंबई विमानतळावर दिसला. झालं नवीन बातम्या सगळीकडे पसरू लागल्या. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे रणबीर आणि आलियाच्या साखरपुड्याची बातमी! आता ही बातमी किती खरी आणि किती खोटी हेच आपण पाहणार आहोत.

मंगळवार पासूनच मुंबईत चर्चा होऊ लागली की अभिनेता रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि प्रेयसी, अभिनेत्री आलिया भट्ट सोबत जे रणथंभोरला रवाना झाले आहेत. ते तिथून नव्या वर्षात साखरपुडा करूनच परततील. परंतु, ही व्हायरल बातमी आणखीन जास्त पसरण्याआधी रणबीरचे काका अभिनेता रणधीर कपूर यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रणबीर आणि आलिया फक्त नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी तिथे गेले आहेत. दोघांच्याही साखरपुड्याच्या बातमीत काहीही सत्यता नाहीये.

मंगळवारी रणबीर, आलिया आणि नीतू कपूर मुंबई विमानतळावर एकत्र दिसले आणि त्यानंतर ते राजस्थानच्या जयपूर विमानतळावरही दिसले. यानंतर हे तिघेही रणथंभोरमधील अमन या हॉटेलमध्ये थांबल्याचं समोर आलं आहे. एकीकडे नवीन वर्ष साजरं करण्यासाठी लोक गोवा आणि मालदीवमध्ये जात असताना, रणबीरने आलियाबरोबर राजस्थानला जाण्याचं निवडलं. यामुळे मुंबईमध्ये इंडस्ट्रीतील लोकांना संशय आला. याचदरम्यान, रणबीर आणि आलिया यांचा रणथंभोरमध्ये साखरपुडा होणार असल्याची चर्चा कुणीतरी सुरू केली. याला कारणही स्वतः रणबीरच आहे. यापूर्वी रणबीर कपूरने आपल्या एका व्हिडिओ मुलाखतीत सांगितलं होतं की जर कोरोनाकाळ नसता तर त्या दोघांनीही लग्न केलं असतं.

आता रणबीर कपूरच्या काकांनी रणधीर कपूर यांनी या सर्व गोष्टी निराधार असल्याचं सांगून फेटाळून लावल्या आहेत. येथे उल्लेखनीय बाब अशी की रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी आपला मोठा भाऊ रणधीर कपूर यांची आज्ञा कधीही टाळली नाही इतकंच काय तर कारकिर्दीतील सर्व प्रमुख निर्णय केवळ मोठ्या भावाच्या संमतीनेच घेतले होते. यावरून प्रथमदर्शनी असंच दिसतं की रणबीर कपूरच्या लग्नाचं नियोजन, आयोजन स्वतः रणधीर कपूर करतील. रणधीर कपूर यांनीच माध्यमांना एक सवाल केला आहे जर राजस्थानमध्ये रणवीर आणि आलियाचा साखरपुडा असता तर संपूर्ण कपूर कुटुंब तिथे हजर राहिलं नसतं का? पण असं काहीही नाहीये.

रणधीर यांनी बुधवारी सांगितलं की हे सर्व लोक काही दिवसांच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाला साजरं करण्यासाठी तिथे गेले आहेत. यात अजून काहीही नाही. आलिया आणि रणबीरच्या साखरपुड्याच्या बातम्यांना आणखी जोर आला कारण ते सर्व ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, तिथे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध विवाहित जोडपं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा सुट्टीसाठी पोहोचले आहेत.

नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात रणवीर सिंग देखील रणबीर सोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र सुट्टी घालवत असताना हे दोघेही लवकरच येऊ घातलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच सुरु झालं होतं.

हे देखील वाचा