भारतीय सिने इंडस्ट्रीला ११० वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हापासून आतापर्यंत चिक्कार ऐतिहासिक सिनेमे बनले आहेत. आताच्या पिढीतल्या लोकांना विचारलं की, सर्वात भारी ऐतिहासिक अन् राजे रजवाडे वगैरे असणारा सिनेमा कोणता, तर ते लगेच संजय लीला भन्साळीच्या पद्मावत, बाजीराव मस्तानी, रामलीला आणि एसएस राजामौलींच्या बाहुबली सीरिजचे नाव सर्वांच्या तोंडात येईल. पण मंडळी या सर्व सिनेमांना पुरून उरणारा आणि सिनेमाच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक, सर्वोत्तम सिनेमांमध्ये १९६० च्या दशकातील एका सिनेमाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तो सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून सर्वांच्या मनात बसलेला ‘मुघल-ए-आझम.’ हा सिनेमा रिलीझ होऊन ६१ वर्षे लोटली आहेत, पण आजही जेव्हाही टीव्हीवर हा सिनेमा दिसतो, तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. हातातलं कामबिम सोडून थेट टीव्हीपुढं जाऊन बसतात. कलाकारांच्या जिवंत अभिनयापासून ते सेटपर्यंत सर्वच भव्य-दिव्य होतं. या सिनेमाला बनवण्यासाठी तब्बल १६ वर्षांचा काळ लागला होता. असं काय होतं या सिनेमात?, सिनेमा बनवायला किती खर्च आलेला?, कलाकारांची निवड कशी झालेली? चला या सर्व गोष्टी या लेखातून जाणून घेऊया…
सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं के आसिफ यांनी. आसिफ यांचा जन्मच ‘मुघल-ए-आझम’ सिनेमा बनवण्यासाठी झाला होता, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ५ ऑगस्ट, १९६० रोजी रिलीझ झालेल्या या सिनेमाची गणना त्या काळातील सर्वोत्तम सिनेमात होते. आसिफ यांनी या सिनेमासाठी आपला आतापर्यंत साठवलेला सर्व पैसा आणि आपल्या आयुष्यातील १६ वर्षे खर्च केले होते. ‘मुंबई टॉकीज’मध्ये जेव्हा ‘मुगल-ए-आझम’ सिनेमाची शूटिंग १९४४ साली सुरू झाली होती, पण पुढच्या तीन वर्षात लगेच भारत आणि पाकिस्तानची वाटणी होऊ लागली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक इकडून तिकडं गेले आणि तिकडून इकडं आले. इकडून तिकडं जाणाऱ्या लोकांमध्ये सिनेमाचे प्रोड्युसर सिराजही होते. त्यामुळं सिनेमाची शूटिंग तिथंच थांबली.
यानंतर थांबलेली शूटिंग पुन्हा एकदा १९५२ साली नवीन प्रोड्युसरसोबत आणि नव्या कलाकारांसोबत सुरू झाली. आधीच्या कलाकारांमध्ये अभिनेते सप्रू चंद्रमोहन आणि नर्गिस यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र, नंतर जी स्टार कास्ट निवडली, त्यामध्ये पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी भूमिका वठवल्या होत्या.
मंडळी तुम्हाला माहितीये का? सिनेमाच्या इतिहासात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ‘मुघल-ए-आझम’ सिनेमासाठी मधुबाला ही पहिली पसंत नव्हतीच. या सिनेमासाठी आसिफ यांनी सर्वात आधी मधुबालाला नाही, तर इतर कोणत्यातरी अभिनेत्रीला निवडलं होतं. होय, त्यांनी अनारकलीच्या रोलसाठी शहनाजला निवडलं होतं. शहनाज थिएटर करायची आणि तिच्या एका नाटकादरम्यान आसिफ यांची नजर तिच्यावर पडली होती. तिला पाहून आसिफ यांना वाटलं की, बास आपल्याला तर अनारकली भेटलीच. शहनाजबद्दल असं म्हटलं जातं की, ती खूपच सुंदर होती आणि सुंदरतेसोबतच तिचा आवाजही खूप सुरेल होता.
आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी आधी या रोलसाठी त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री नुतनला अप्रोच केलं होतं, पण नुतनने या रोलसाठी नकार दिला. मात्र, त्यांनी या रोलसाठी आसिफ यांना मधुबालाला कास्ट करण्यास सांगितलं. तसेच मधुबाला स्वत: त्यांना भेटायला गेली होती आणि तिला या सिनेमात काम करायचंय असं म्हणाली होती. मात्र, मधुबालाचे वडील आणि आसिफ यांच्यात काहीतरी खटके उडाले होते. हाईट म्हणजे मधुबालानेच आसिफ यांना तिच्या वडिलांच्या अटी मान्य करण्यास सांगितलं होतं आणि तेव्हा कुठे मधुबाला अनारकली म्हणून समोर आली.
चर्चा ‘मुघल-ए-आझम’ची करतोय आणि गाण्याचा विषय नाही निघणार असं तर मुळीच होणार नाही. या सिनेमासाठी आसिफ यांनी ७२ गाणे लिहून घेतले होते. सिनेमातलं एक गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे, ते म्हणजे, ‘प्यार किया तो डरना क्या.’ या गाण्याचा किस्सा तर लय वेगळाय. सिनेमाचे संगीत दिग्दर्शक होते नौशाद अली. त्या काळातील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक. नौशाद यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याला तब्बल १०५ वेळा रिजेक्ट केलं होतं. हे तर सोडाच या गाण्यातील शीशमहलचे सेट वेळेवर न बनल्यामुळे सिनेमाची शूटिंग दोन वर्षांपर्यंत थांबवली होती.
‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यात मधुबाला दोन वेळा दिसली होती. मधुबाला ही शानदार अभिनेत्री होती यात प्रश्नच नाही, पण डान्समध्ये ती जरा कमजोर होती. या गाण्यात तिला डान्स करायचा होता आणि आसिफ यांना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. प्रसिद्ध मूर्तीकार बी. आर. खेडकर यांनी आसिफ यांना सल्ला दिला होता की, त्यांनी मधुबालाच्या डान्स स्टेप्स कोणत्यातरी प्रोफेशनल डान्सरकडून करवून घ्याव्या. त्यानंतर प्रसिद्ध डान्सर लक्ष्मी नारायण यांना मुखवटा घालून डान्स करवून घेतला होता.
गाण्यातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, दिलीप कुमार यांनी सोन्याचे बूट घातले होते तसेच एका सीनसाठी खरोखरचे मोतीही जमा केले होते. या दोन्ही कारणांमुळे सिनेमाची शूटिंग खूप काळ थांबवून ठेवली होती. आसिफ यांचा असा विश्वास होता की, हे बूट घालून दिलीप यांच्या चेहऱ्यावर जी चमक येईल, तिला कशाचीही तोड नसेल.
आता एवढा मोठा सिनेमा आहे म्हणल्यावर त्याचं बजेटही काय साधं-सुधं नसणार. बरोबर ना. तुम्हाला माहितीये का? हा सिनेमा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाचे शूटिंग ज्या पद्धतीनं झालं, त्यावरून तर अंदाज बांधला जाऊ शकतो. या सिनेमात परिधान केलेले सर्व कपडे दिल्लीत शिवलेले होते आणि या कपड्यांवरची नक्षी ही सुरतमध्ये कोरण्यात आली होती. दागिने हैदराबादमध्ये बनलेले, तर मुकूट कोल्हापुरात बनवले होते. याशिवाय हत्यारं राजस्थानात आणि चपला आग्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या. एवढेच नाही, तर या सिनेमात २००० उंट, ४००० घोडे वापरण्यात आले होते.
मंडळी ब्लॅक अँड व्हाईट ‘मुघल-ए-आझम’ हा सिनेमा ज्याकाळी बनला होता, त्यावेळी सिनेमे बनवण्यासाठी जेमतेम १० ते १५ लाख रुपये खर्च यायचा, पण आता एवढा सगळा थाटमाट होता त्यामुळे ‘मुघल-ए-आझम’ हा सिनेमा तब्बल १.५ कोटी रुपयांमध्ये बनून तयार झाला होता. आसिफ यांना कसलीही तडजोड करायची नव्हती. त्यामुळेच त्यांनी पूर्ण परफेक्शनसोबत हा सिनेमा बनवला. ५ ऑगस्ट, १९६० रोजी हा सिनेमा देशभरातील १५० चित्रपटगृहात रिलीझ झाला, ज्याने बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत एक सर्वाधिक काळानंतर रिलीझ झालेला विक्रमच रचला. पहिल्या आठवड्यात सिनेमाने ३६ लाख रुपयांची कमाई केली होती, तर एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१९च्या मानाने या सिनेमाने तब्बल १६४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
आणखी एक रंजक माहिती अशी की, हा सिनेमा ३ भाषेत शूट करण्यात आला होता. हिंदी, तमिळ आणि इंग्रजी. हा बॉलिवूडचा पहिला तीन भाषेत बनवलेला सिनेमा होता, पण हिंदी व्हर्जन सोडले, तर तमिळ व्हर्जन बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉपच ठरले होते, आणि तमिळच फ्लॉप झालाय म्हणल्यावर इंग्रजी व्हर्जनला प्रतिसाद मिळेल की, नाही याची भीती होती. त्यामुळे निर्मात्यांनी इंग्रजी व्हर्जनची आयडिया ड्रॉप करून टाकली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद
घाणेरडा शर्ट आणि फाटलेली जीन्स घालून रस्त्यावर सिगारेट विकणारा पोरगा कसा बनला सुपरस्टार?