Friday, April 19, 2024

जेव्हा सुचित्रा सेन ‘त्या’ एका गोष्टीसाठी थेट गुलजार थांबलेल्या हॉटेलमध्ये त्यांना घेण्यासाठी पोहचल्या

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्यासोबतच प्रभावी अभिनयाने लोकांची मने जिंकत बॉलिवूडमध्ये नाव कमावले. आज (६ एप्रिल) अशाच एका दिग्गज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. सुचित्रा सेन बॉलिवूड आणि बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे आणि मानाचे नाव. सुचित्रा यांनी त्यांच्या अभिनयाने बंगाली सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील भरपूर नाव कमावले. सुचित्रा यांनी १९७५ साली आलेल्या गुलजार यांच्या ‘आंधी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुचित्रा सेन आणि संजीव कपूर या सिनेमात काम करणार म्हटल्यावर या सिनेमाच्या स्क्रिप्टमधे मोठे बदल करण्यात आले. सुरुवातीला अतिशय बेसिक असणाऱ्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदल केल्यानंतर हा सिनेमा तयार झाला. गुलजार आणि सुचित्रा यांच्या एका भेटीचा किस्सा आजही खूपच प्रसिद्ध आहे.

सुचित्रा सेन आणि गुलजार यांच्यामध्ये खूपच चांगली आणि घनिष्ठ मैत्री होती. सुचित्रा त्यांच्या मित्राच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीची खूप काळजी घ्यायच्या. त्यांच्या अशाच एका न भेटलेल्या भेटीचा एक अनोखा किस्सा खूपच जगप्रसिद्ध आहे, आज सुचित्रा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्याबद्दल.

‘आंधी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुचित्रा यांना गुलजार यांच्या अनेक सवयींबद्दल माहिती मिळाली. त्यातलीच एक सवय म्हणजे गुलजार अनेकदा एक ग्लास भरून थंड दूध प्यायचे. सिनेमाच्या शुटिंगनंतर जेव्हा जेव्हा गुलजार कोलकाता येथे जायचे तेव्हा सुचित्रा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे आणि तिथून निघताना सुचित्रा नेहमी गुलजार यांना ग्लास भरून थंड दूध द्यायच्या. १९७७ साली जेव्हा गुलजार कोलकाताला गेले, तेव्हा ते एका हॉटेलमध्ये थांबले आणि सुचित्रा यांच्या घरी गेले नाही. जेव्हा ही बाब सुचित्रा यांना समजली तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटले.

पुढे सुचित्रा गुलजार ज्या हॉटेलमध्ये थांबले तिथे गेल्या आणि आपल्या सहाय्यकाला गुलजार यांना बोलावण्यास सांगितले त्या गाडीतच बसून राहिल्या. सुचित्रा आल्याचे समजताच गुलजार धावत आले आणि त्यांना भेटले. गुलजार यांना पाहून सुचित्रा म्हणाल्या, “तुम्ही कोलकातामध्ये आला आणि माझ्या घरी न येताच न थंड दूध पिताच कसे काय पुन्हा जाऊ शकता? सुचित्रा यांनी गुलजार यांना गाडीत बसण्यास सांगितले आणि त्या त्यांना घेऊन घेरी गेल्या. घरी गेल्यावर त्यांनी गुलजार यांना थंड दूध दिले आणि म्हणाल्या, “आता तुम्ही पुन्हा मुंबईला जाऊ शकता.” हे पाहून गुलजार स्तब्ध राहिले. सुचित्रा यांची हीच खासियत होती त्या जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपले समजायच्या तेव्हा त्या मनापासून त्यांचे नाते निभवायच्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा