रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे.
अमेय विनोद खोपकर सादर करत असलेलं हे नाटक, एव्हीके पिक्चर्स आणि सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलं आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली असून स्वाती खोपकर, दिनेश खंडागळे आणि निनाद नं बत्तीन या नाटकाचे निर्माते आहेत. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, ”रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक ”प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.’
निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणतात, ”चांगल्या आशयाला वेळेची मर्यादा नसते. हे नाटक आधी गाजलं कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि आजही तो तितकाच जिवंत आहे. नव्या पिढीसाठी आणि जुन्या रसिकांसाठी आम्ही हे नाटक नव्या उर्जेसह सादर करत आहोत. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रंगभूमीचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा.”
निर्माते दिनेश खंडागळे म्हणतात, ”अशा दर्जेदार नाटकाची निर्मिती करत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. चांगल्या आशयाच्या प्रकल्पातूनच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करावं, असं नेहमी वाटत होतं आणि ते या नाटकाच्या निमित्ताने साध्य झालं. या नाटकाची संपूर्ण टीम अतिशय उत्तम आहे. नाटकाला आधीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, त्यामुळे अशा लोकप्रिय नाटकाचा भाग होता येत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”
एकूणच, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि मादक पदार्थ व दारूपासून दूर राहा, तरुणांना रजनीकांत यांचा सल्ला


