मराठी मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयासाठीच नव्हेतर त्यांनी उठवलेल्या अनेक सामाजिक प्रश्नांसाठी प्रसिद्ध आहेत. हे कलाकार विविध सामाजिक प्रश्नांवर, गंभीर मुद्यांवर आपले मत मांडत असतात. यामध्ये अभिनेता सुमित राघवनचे नावही प्रामुख्याने घेतले जाते. सुमित राघवन अनेकदा विविध सामाजिक प्रश्नांवर आपले मत मांडताना दिसून आला आहे. त्याने मुंबईमधील अतिक्रमणावर मुंबई महानगरपालिका आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) त्याच्या बेधडक आणि स्पष्ट भूमिकांसाठी चर्चेत असतो. सध्या सुमित राघवनचे एक ट्विट सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती अशी की गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या द्रुतगती मार्गांवर अनधिकृत दुकाने आणि विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मुद्यावर सुमित राघवनने मुंबई महानगरपालिकेची कानउघडणी केली आहे. या पोस्टमध्ये सुमित राघवने थेट आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री ऑफिसलाही टॅग केले आहे.
Shift the metro carsheds. But see to it that you don't shift the f¥©k€d up Dahisar toll naka or these illegal shops bang on the WEH. See to it that the mumbaikar shifts out of Mumbai so that you guys along with the encroachers can enjoy a peaceful life in this city.@mybmc https://t.co/MIMiZMjtQR pic.twitter.com/OCBwe6ki11
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) February 27, 2022
या पोस्टमध्ये सुमितने वांद्रे ते दहिसर मार्गावर असलेल्या अनधिकृत दुकांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच त्याने मेट्रो कारशेड तुम्ही हलवली, मात्र दहिसर टोलनाक्यावरील आणि पश्चिम मार्गावरील अनधिकृत दुकाने हलवण्यात आली नाहीत. मुंबईकर मुंबईच्या बाहेर जातील आणि तुम्हाला या अतिक्रमण करणाऱ्या लोकांसोबत आनंदाने राहाल, याची काळजी घ्या. अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये सुमितने पालकमंत्री आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय यांना टॅग केले आहे. अभिनेता सुमित राघवन याआधीही अनेकदा मुंबईमधील अशा महत्वाच्या विषयावर आपले मत मांडताना दिसून आला होता. त्याच्या या सध्याच्या ट्विटची सगळीकडे चर्चा सुरू आहे.