प्रसिद्धी, मान-सन्मान, करिअर अशा अनेक अंगाने राजकारण हे क्षेत्र नेहमीच माणसाला खुणावत असते. मात्र, या क्षेत्रात जाणे आणि तिथे स्वतःला टिकवणे हे वाटते तितकेसे सोपेही नाही. किंबहुना प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय या क्षेत्रात टिकणे मुश्किलच. याचाच प्रत्यय चंदेरी दुनियेतील अनेकांना आल्याचे दिसून येते.
आपल्या देशात अनेक कलाकारांनी मनोरंजन क्षेत्रानंतर किंवा मनोरंजन क्षेत्रासह राजकारणात जाऊन आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, यात सर्वजण काही लंबी रेस का घोडा ठरलेले दिसत नाही. काहींनी अगदी अल्पावधीतच राजकारणाला रामराम ठोकला आहे. आजच्या या लेखात आपण अशाच कलाकारांची माहिती घेणार आहोत.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीच दिवसांपूर्वी राजकारणात येण्याची घोषणा केली होती. ३ डिसेंबरला रजनीकांत यांनी ते नवा पक्ष तयार करून २०२१ सालच्या निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. ३१ डिसेंबरला ते त्याच्या नव्या पक्षाची घोषणा करणार होते. मात्र ७०वर्षाच्या रजनीकांत यांना नुकतेच प्रकृती अस्वास्थामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
आता जरी रजनीकांत यांची प्रकृती नीट असली तरी त्यांनी त्याचे राजकारणात येण्याचे स्वप्न आता पूर्ण करणार नसल्याचे जाहीर केले आहे. केवळ २६ दिवसात त्यांचे राजकारणात येण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. फक्त रजनीकांत नाही तर अनेक कलाकारांनी राजकारणाची वाट धरली मात्र त्यांना काही काळातच पुन्हा चित्रपटांकडे वळावे लागले. पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.
राजेश खन्ना :
हिंदी सिनेसृष्टीतील पाहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करियरमध्ये राजकारणात एन्ट्री घेतली. १९९२ साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीतला जागेसाठी निवडणूक लढवली. ती निवडणूक त्यांनी जिंकली सुद्धा, चार वर्ष राजकारणात सक्रिय राहून त्यांनी पुन्हा चित्रपटांकडे त्यांचा मोर्चा वळवला.
अमिताभ बच्चन :
१९८४ साली महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत राजकारणात प्रवेश केला. अमिताभ यांनी इलाहाबाद मधून निवडणूक लढवत त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र दोनच वर्षात त्यांचे राजकारणातून मन उडाले आणि त्यांनी पुन्हा अभिनयाची वाट धरली.
शेखर सुमन :
२००९ साली शेखर सुमनने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी पटना मधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधांत निवडणूक लढवली.. शेखर सुमन यांना ह्या निवणुकीतून हार पत्करावी लागली होती. सुमन यांनी तीन वर्षातच राजकारणाला राम राम ठोकला.
अर्शी खान :
बिग बॉसच्या १४ व्या पर्वात सहभाग घेतल्यापासून अर्शी खान चांगली चर्चेत आली. तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये तिने काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. प्रोफेशनली कमिटमेंट्स मुले राजकारणात जास्त चांगले काम करता येत नसल्याने राजीनामा दिल्याचे तिने सांगितले.
धर्मेद्र :
हिटमॅन आणि हँडसम अभिनेता अशी ओळख असणारे धर्मेंद्र यांनी देखील २००४ साली त्यांनी राजस्थानच्या बिकानेर मधून लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाले. मात्र धर्मेंद्र यांच्यावर तिथल्या लोकांनी अनेक आरोप केले. धर्मेंद्र निवडणूक जिंकूनही कधी तिथे गेले नाही. ते हरवले असल्याचे पोस्टरही लोकांनी लावले होते. कदाचित याच कारणांमुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.