Saturday, April 20, 2024

नाटकांचा राजा समजल्या जाणाऱ्या भरत जाधवने चित्रपट पाहताना केला होता प्रियसीकडे प्रेमाचा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि विनोदी स्वभावाने आख्या महाराष्ट्राला त्याच्या प्रेमात पाडले आहे. तो अष्टपैलू कलाकार म्हणजे भरत जाधव (Bharat jadhav) होय. त्याने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकात काम करून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अत्यंत साधा परंतु लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अशातच मंगळवारी (12 डिसेंबर) रोजी तो त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी.

भरत जाधवचा जन्म 12 डिसेंबर 1973 साली मुंबई येथे झाला. त्याचे मूळ गाव कोल्हापूर हे आहे. त्याच्या आईचे नाव शांता जाधव तर वडिलांचे नाव गणपत जाधव हे आहे. त्याला एक बहीण आणि दोन भाऊ असून, बहिणीचे नाव छाया हे आहे. तसेच भावांची नावे किरण आणि राजू ही आहेत. लहान असल्यापासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्याने नाटकात कामं केली आहेत. त्याने 1985 साली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ डान्स ट्रोपमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याला ‘साहेब बीवी आणि मी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने 1999 साली ‘वास्तव : द रियॅलिटी’ या चित्रपटात काम केले. (bharat jadhav celebrate his birthday, lets know about his life)

भरत जाधवच्या या कामगिरीनंतर त्याला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याने ‘खतरनाक’, ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या चित्रपटात काम केले. तसेच ‘हाऊसफुल’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘पछाडलेला’, ‘सरीवर सरी’, ‘नाना मामा’, ‘माझा नवरा माझी बायको’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘गलगले निघाले’, ‘साडे माडे तीन’, ‘गोंद्या मारतय तंगड’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ , ‘क्षणभर विश्रांती’, ‘रिंगा रिंगा’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘डावपेच’, ‘खो खो’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘आप्पा आणि बाप्पा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याचे ‘जत्रा’ या चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ हे गाणे सुपरहिट झाले होते. या गाण्यात त्याच्यासोबत क्रांती रेडकर होती.

यासोबतच त्याने अनेक नाटकात देखील काम केले आहे. त्याने ‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘ऑल द बेस्ट. ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘अधांतर’, ‘पुन्हा सही रे सही’ यांसारख्या नाटकात काम केले आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी तो सोडत नाही. त्यामुळेच त्याच्याकडे सगळे आकर्षित होतात. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये 85 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने 5 मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच 8500 पेक्षाही जास्तवेळा नाटकांचे शो केले आहेत. त्याने काही दिवसांपूर्वी ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत काम केले आहे.

भरत जाधवच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या पत्नीचे नाव सरिता जाधव हे आहे. सरिता आणि भरतचा प्रेमविवाह आहे. त्या दोघांची पहिली भेट सरिताच्या ऑफिसमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांचे प्रेम खुलत गेले. त्यांनी ‘खिलाडी’ हा चित्रपट पहिल्यांदा एकत्र पाहिला होता त्यावेळी त्याने पहिल्यांदा त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी विवाह केला. त्यांना सुरभी आणि आरंभ नावाची दोन मुले आहेत.

भरत जाधव यांनी 2013 मध्ये स्वतःची कंपनी ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ सुरू केली. राज ठाकरे, निखिल वागळे, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, जयवंत वाडकर, प्राची चेउलकर, किरण शांताराम, आणि अंजन श्रीवास्तव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. त्यांनी मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव,सोनाली कुलकर्णी, अशा अनेक सुपरस्टारबरोबर चित्रपट निर्माण केले आहेत.

हेही वाचा-
परमसुंदरी..! सई ताम्हणकरचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पाहा फोटो

…आणि म्हणून सुपरस्टार भरत जाधवच्या करोडों रुपयांच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे टॅक्सीचा फोटो

हे देखील वाचा