विनोद हा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा जणू गाभा आहे. एखादा चित्रपट, मालिका, किंवा अगदी नाटक पाहताना एखादा कॉमेडी सीन आला, तर आपण अगदी खळखळून हसतो. गंभीर चित्रपट चालू असला आणि मध्येच एखादा कॉमेडी सीन आला, तरी आपल्याला हलके वाटते. विनोद हा आपल्या आयुष्यातील दुःखाची पोकळी भरून काढणारा घटक आहे आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी कलाकार सातत्याने प्रयत्न करत असतात. मराठी सिने सृष्टीत अनेक विनोदी कलाकार होऊन गेलेत, काही आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनावर छाप पाडली आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीत असा एक अभिनेता आहे जो केवळ रंगमंचावर आला तरी प्रेक्षक हसू लागतात. असं म्हणतात की, आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी ज्याला संवादाची गरज भासत नाही तोच खरा कलाकार. असाच एक मराठी मातीतला रांगडा कलाकार म्हणजे भालचंद्र कदम. नाव जरा वेगळं वाटत असेल. पण भालचंद्र कदम म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका, आवडता अभिनेता आणि विनोदवीर भाऊ कदम. भाऊ कदम गुरुवारी (३ मार्च) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया भाऊ कदमपासून महाराष्ट्राचा लाडका भाऊ कदम कसा घडला.
भाऊ कदमचा जन्म ३ मार्च १९७० साली मुंबई येथे झाला. ज्ञानेश्वर विद्यालय मुंबईमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्याचे वडील भारत पेट्रोलियम पंपावर काम करत होते. तसेच आई एक गृहिणी होती. कोवळ्या वयातील जेव्हा तारुण्यात पदार्पण केले. तेव्हाच त्याच्या डोक्यावरचे वडील नावाचे छत्र हरपले. कॉलेजमध्ये मजा-मस्ती करून बागडण्याच्या वयात त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. स्वभावात एक खुमासदारपणा आणि एक विनोद बुद्धी असल्याने तो जाईल तिथे छाप पाडत होता. तिथूनच त्याने छोटी मोठी कामे करण्याचं सुरुवात केली.
सुरुवातीला भाऊने अनेक नाटकात छोटी-छोटी पात्र साकारण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या मनात एक न्यूनगंड होता की, त्याचा रंग सावळा असल्याने त्याला काम मिळणार नाही. त्याने ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात काम केले. परंतु त्यावेळी त्याला केवळ १५० रुपये एवढे मानधन मिळाले. रोल अगदी छोटा असल्याने तो जास्त पैशांची अपेक्षा देखील करू शकत नव्हता. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडून अनेक ठिकाणी नोकरी केली. त्याने डोंबिवली परिसरात त्याची पान सुपारीची गाडी सुरू केली. अनेक ठिकाणी त्यांनी ही गाडी चालवली.
एकदा त्यांची ओळख दिग्दर्शक विजय निकम यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी भाऊला नाटकात काम करण्याची प्रवृत्त केलं. इथूनच त्याच्या आयुष्याला एक वळण मिळाले आणि त्याने पुन्हा एकदा अभिनय पदार्पण केले. त्याला ‘फु बाई फू’ या शोमधून ऑफर आली. परंतु त्याने ही ऑफर नाकारली होती. कारण त्याला भीती वाटत होती की, त्याला काम करायला जमेल की नाही. नंतर त्याला पुन्हा एकदा ‘फू बाई फू २: मधून ऑफर आली. परंतु आत्मविश्वास कमी असल्याने त्याने पुन्हा एकदा ऑफर नाकारली. परंतु तिसऱ्या पर्वात त्याला पुन्हा एकदा ऑफर आली आणि त्याने यावेळी आत्मविश्वासाने या शोला होकार दिला.
यानंतर त्याची गाडी सुसाट सुटली. त्याच्या अभिनयाने आख्ख्या महाराष्ट्रावर छाप पाडली. त्याला कधी वाटले देखील नव्हते की, तो सहज होणाऱ्या अभिनयाने देखील तो सगळ्यांचे मन जिंकून घेईल. या शोमध्ये त्याच्यासोबत कुशल बद्रिके, भारत गणेश पुरे, निलेश साबळे आणि सागर कारंडे असे अव्वल कलाकार होते.
त्यानंतर २०१४ साली मराठी सिनेमांचे प्रोमोशन करण्यासाठी झी मराठीने मराठी कॉमेडी शो सुरु करण्याचे ठरवले. आणि त्या शोचे नाव होते ‘चला हवा येऊ द्या.’ तेव्हा मराठी कलाकारांचे निवड करताना सर्वात पहिले नाव हे भाऊ कदम यांचे घेतले केले. भाऊ कदम यांनी या शोमध्ये अनेक कॉमेडी पात्र केली, आणि लोकांना खळ-खळून हसवले. मग नंतर या शोने टीआरपीचा उच्चांक गाठला. आणि अनेक रेकोर्ड तोडले.
भाऊ कदम या शोला जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेनचा वापर करावा लागत असे. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना खूप अडचणी येत असत. मग त्यांनी एक सेकंदहॅंड गाडी घेतली आणि मग त्यांनी हळू ळू खूप प्रगती केली. त्यांना त्यांच्या अभिनयामुळे अनेक कॉमेडी अवार्ड्स मिळाले. अशा वेळी एक साधारण व्यक्तीला आपण एक स्टार बनू असे वाटले नव्हते ते आज महाराष्ट्राचे सुपरस्टार झाला. हाच गाडीवर पानसुपारी विकणारा व्यक्ती आज महाराष्ट्रच्या घराघरात पोहचला आहे.
हेही वाचा :