Friday, July 5, 2024

‘भोजपुरी इंडस्ट्रीतील लोक मला सुशांत सिंग राजपूत बनवतील…’, फेसबुकवर लाईव्ह येत खेसारी लाल यादवचे भावुक वक्तव्य

सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वादविवादांचा सामना करावा लागतो. काहीजण सोशल मीडियाचा वापर करून आपले दु:ख इतरांपुढे मांडत असतात. असेच काहीसे भोजपूरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडले आहे. अभिनेता खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री काजल राघवानी यांच्यात स्टारडमवरून वाद झाला, त्यामुळे खेसारी लाल यादवने फेसबुकवर लाईव्ह येत आपल्याविरुद्ध कट रचणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. यादरम्यान भावुक होत त्याला अश्रू अनावर झाले. सोबतच त्याने प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतचाही उल्लेख केला.

खेसारी लाल यादवने नाव न घेता सेलिब्रिटींवर निशाना साधला. त्याने म्हटले की, “तुम्ही कितीही मोठे अभिनेता, अभिनेत्री, निर्माता किंवा गायक असाल, तुम्ही तुमचं काम करा.”

फेसबुक लाईव्हदरम्यान भोजपुरी सुपरस्टार खेसारी लालने म्हटले की, “मला वाटते, भोजपुरी इंडस्ट्रीतील लोक मला दुसरा सुशांत सिंग राजपूत बनवतील. मी घाबरून आत्महत्या करावी, असे त्यांना वाटते. सुशांतला बॉलिवूडमधून जितके प्रेम मिळाले होते, तसेच काहीसे प्रेम मला भोजपूरी इंडस्ट्रीवाले देत आहेत.”

यादरम्यान त्याने असेही म्हटले की, तो कमजोर नाही, तो याचा सामना नक्की करेल. तोदेखील सुशांतप्रमाणे बिहारचाच आहे, परंतु चाहते त्याच्यासोबत आहेत. अशामध्ये भोजपुरी इंडस्ट्रीतील लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात, याचा त्याला फरक पडत नाही.

खेसारी लाल यादवने पुढे म्हटले की, “मी २०११ मध्ये या इंडस्ट्रीत आलो, तेव्हापासून या लोकांना माझा त्रास होत आहे. कदाचित माझे चित्रपट हिट होतात. मी समाजसेवा करतो, यामुळेच मी त्यांच्या नजरेत खटकतोय. त्यांना वाटतंय की मी सुशांत सिंग राजपूतप्रमाणे चुकीचे पाऊल उचलेल, परंतु मी बिलकूल तसं करणार नाही. विरोध करणाऱ्यांकडे खूप पैसा आहे, परंतु ते त्या पैशांनी केवळ वस्तू विकत घेऊ शकतात, सन्मान नाही.”

“माझी बरोबरी करण्यासाठी काही लोकांना सात जन्म घ्यावे लागतील. माझ्या इतकं काम करून दाखवा. आज त्रास मला झालाय, परंतु मला राग नाही आला. आपल्या कामाने मोठं व्हायला शिका. माझ्या मागे का लागला आहात, मला आत्महत्या करायला भाग पाडायचे आहे का?”

यानंतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.

खरं तर काजल राघवानीने म्हटले होते की, खेसारी लाल नाही तर पवन सिंगमुळे तिला स्टारडम मिळाले आहे. तिच्या या वक्तव्यावर खेसारी लालने काजलवर तोशेरे ओढत म्हटले की, “संघर्ष चित्रपटात माझे काही नव्हते, परंतु जर त्यानंतर कोणता चित्रपट हिट होत असेल, तर मलाही चांगले वाटते. खेसारीनंतर कोणताही चित्रपट हिट झाला असता, तर मला खूप चांगले वाटले असते.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसते स्टार नाहीत सुपरस्टार आहेत ‘हे’ भोजपुरी कलाकार, एकेवेळी जेवणाला महाग असलेले हे अभिनेते राहतात करोडोंच्या घरात
-खेसारी लाल यादव-अनीषाची चाहत्यांना होळीची भेट, जबरदस्त गाणं रिलीझ करत मिळवल्यात २ कोटी हिट्स

हे देखील वाचा