Saturday, July 27, 2024

कैलाश खेर आहेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यापेक्षाही जास्त श्रीमंत, कधीकाळी चप्पलही घ्यायला नसायचे पैसे

भारतीय संगीत क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्या कामगिरीबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. असेच आपल्या गायकीने चाहत्यांवर प्रभाव पाडणाऱ्या गायकांमध्ये समावेश होतो, तो म्हणजे कैलाश खेर यांचा. कैलाश हे भारतीय पार्श्वगायक आणि म्युझिक कंपोजर आहेत. ते शुक्रवारी (दि. 07 जुलै) आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज इतका मोठा पल्ला गाठल्यानंतर त्यांच्या भूतकाळात डोकावले, तर दिसते की, त्यांचं आयुष्य किती संघर्षमयीन राहिलं आहे. या लेखातून आपण त्यांच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे 7 जुलै, 1973 रोजी जन्मलेल्या कैलाश खेर (Kailash Kher) यांना लहानपणीपासूनच संगीताची गोडी होती. सुरांचे जादूगार बनलेल्या कैलाश यांना पंडित कुमार गंधर्व, पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी आणि कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. मेरठमध्ये जन्मलेले कैलाश हे काश्मिरी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील मेहर सिंग खेर हे भारतीय लोक गायक होते. लहानपणापासूनच त्यांना संगीताची गोडी होती. असे म्हटले जाते की, वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच कैलाश खेर यांनी संगीतातील आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती.

जेव्हा त्यांनी गायनात आपली कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांना कुटुंबाकडून ती साथ मिळाली नाही. मात्र, त्यांची जिद्द अशी होती की, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षीच घर सोडले होते. घर सोडल्यानंतर कैलाश हे संगीताबाबत अधिक माहिती जाणून घेऊ लागले आणि त्यातील नवनवीन गोष्टी शिकू लागले. कैलाश यांची जेव्हा दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होऊ लागली, तेव्हा ते लहान मुलांना संगीत शिकवून पैसे कमवू लागले. त्यांनी लाख अडचणींसोबत दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2001 साली त्यांनी स्वप्नांची मायानगरी असलेल्या मुंबईकडे धाव घेतली.

मुंबईत भटकल्यानंतर केलाश खेर यांना मिळाले काम
तब्बल 300हून अधिक गाणी कैलाश खेर मुंबईत आले तर होतेच, पण त्यांच्याकडे काम नव्हते आणि पैसे तर नव्हतेच नव्हते. त्यामुळे नवीन चप्पल घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांच्याकडे जे काही होते, ते होते संगीताचे ज्ञान आणि त्यावरील विश्वास. कामाच्या शोधात भटकल्यानंतर त्यांना सर्वात पहिले काम एका जाहिरातीसाठी जिंगल्स गाण्याची संधी संगीत दिग्दर्शक राम संपत यांनी दिली होती. या जिंगल्समध्ये त्यांच्या आवाजाने जादू केली आणि त्यांच्याकडे जिंगल्सची रांगच लागली. त्यांना पहिल्या जिंगल्ससाठी फक्त 5000 रुपये मिळाले होते.

‘रब्बा इश्क न होवे’मधून मिळाला बॉलिवूडचा मार्ग
कैलाश खेर यांना आता मुंबईत थांबण्यासाठीचे कारण मिळाले होते. यानंतर ते सतत प्रयत्न करताना दिसले. त्यानंतर एके दिवशी ‘अंदाज’ या सिनेमात त्यांना ‘सुफियाना’ गाणे गाण्याची संधी मिळाली. कैलाश खेर यांनी ‘रब्बा इश्क न होवे’ हे गाणे इतक्या समर्पकतेने गायले की, जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा या गाण्याने अक्षरश: धमालच केली. यानंतर ‘अल्लाह के बंदे’ या गाण्यामुळे तर त्यांना अफाट यश मिळाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. त्यांना परत गाण्याचीही आणि पैशाचीही कसलीच कमतरता भासली नाही.

किती आहे कैलाश खेर यांची संपत्ती?
माध्यमातील वृत्तानुसार, कैलाश खेर यांची संपत्ती (Kailash Kher Net Worth) आताच्या हिशोबाने जवळपास 276 कोटी रुपये आहे. तसेच, ते वर्षाला 20 ते 50 लाख रुपयांची कमाई करतात. कैलाश यांना सुरुवातीला त्यांच्या कामासाठी फक्त 5000 रुपये मिळाले होते. मात्र, हे रुपये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.

कैलाश खेर यांचे पुरस्कार
जिंगल्स गायल्यानंतर कैलाश खेर यांनी संघर्ष करून बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवली. त्यांना 2017मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये स्टार स्क्रीन पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, जीआयएमए पुरस्कार, भारतीय टीव्ही अकादमी पुरस्कार आणि भारतीय टीव्ही पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे. (happy birthday kailash kher know more about singer)

अधिक वाचा-
मोठ्या नुकसानीमुळे कैलाश खेर निघालेले जीव द्यायला, पण साधू-संतांच्या सहवासाने पुन्हा पकडली यशाची एक्सप्रेस
‘ये जवानी है दिवानी’मधील ‘लारा’ दुस-यांदा बनली आई, पोस्ट शेअर करून दिले नव्या बाळाची अपडेट

हे देखील वाचा