बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही आजकाल तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या अनेक वक्तव्यामुळे खूप चर्चेत असते. देशातील कोणत्याही प्रश्नावर ती तिचे मत व्यक्त करताना दिसते. त्यामुळे तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतेच तिचा आगामी ‘इमरजन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ती करणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाची कहाणी भारतातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. कंगनाने या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने या चित्रपटाच्या तयारीची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आधी ‘रिवॉल्वर राणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर हे करणार होते. परंतु बुधवारी कंगनाने सांगितले की, तिच्या शिवाय या चित्रपटाला कोणीचं न्याय देऊ शकत नाही. तिने स्वदेशी सोशल मीडिया ऍप ‘कू’ वर लिहिले की, “पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवून खूप आनंद होत आहे. ‘इमरजन्सी’वर एका वर्षापेक्षा अधिक काळ काम केल्यानंतर मला हे समजले की, माझ्यापेक्षा इतर कोणीही या चित्रपटाचे योग्य दिग्दर्शन करू शकत नाही. लेखक रितेश शाहसोबत या प्रोजेक्टवर मी काम करत आहे. यासाठी अभिनयासोबत जोडलेल्या इतर गोष्टींचा मला त्याग करावा लागला, तरीही मी यासाठी तयार आहे.”
या वर्षाच्या सुरुवातीला कंगनाने सांगितले होते की, ‘इमरजन्सी’ या चित्रपटाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींचे दोन मोठे निर्णय ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि इमरजन्सी प्रामुख्याने दाखवल्या जाणार आहेत. कंगना रणौतने याआधी २०१९ मध्ये आलेला ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. इमरजन्सी या चित्रपटासोबतच ती ‘थलायवी’, ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स : दी लिजेंड ऑफ जिद्द’ यात काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-