Monday, July 8, 2024

‘द्वेषाचा सामना करावा लागतोय’, ‘शमशेरा’ फ्लॉप झाल्याने व्यथित झाला अभिनेता संजय दत्त

अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आतापर्यंत केवळ 37 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे. चित्रपटाच्या निराशाजनक कामगिरीनंतर शमशेरामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता संजय दत्तही खुपच निराश झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेता संजय दत्तने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. संजयने या पोस्टच्यामधून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये संजय दत्तने “चित्रपट बनवणे ही एक आवड आहे. शमशेरा हा घाम गाळून  बनलेला चित्रपट आहे. ते एक स्वप्न होतं जे आम्ही पडद्यावर आणलं. चित्रपट मनोरंजनासाठी बनवले जातात. त्याला उशिरा का होईना प्रेक्षक मिळतात. परंतु  शमशेराला द्वेषाचा सामना करावा लागत आहे. काही लोक चित्रपट न पाहताही विरोध करत आहेत. लोक कठोर परिश्रमाचा आदर करत नाहीत हे खूपच भयानक आहे.” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये संजय दत्तने चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्राचे तोंड भरुन कौतुक केले आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की “करण चार दशकांच्या कारकिर्दीत मी काम केलेल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. प्रेक्षक दीर्घकाळ लक्षात ठेवतील अशी भूमिका साकारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे., करण कुटुंबासारखा आहे. यश किंवा अपयश ही वेगळी गोष्ट आहे, त्यांच्यासोबत काम करणे हा नेहमीच सन्मान असतो. मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे.”

विशेष म्हणजे या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत आहे. याआधी रणबीर शेवटचा राजकुमार हिरानीच्या ‘संजू’मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर 330 कोटींहून अधिक कमाई करणारा रणबीरच्या करिअरमधील हा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे.

हे देखील वाचा