Monday, June 9, 2025
Home नक्की वाचा इरफान नसता, तर ‘पुष्पा’ सिनेमाला ‘भंवर सिंग’ मिळालाच नसता; एका क्लिकवर घ्या जाणून

इरफान नसता, तर ‘पुष्पा’ सिनेमाला ‘भंवर सिंग’ मिळालाच नसता; एका क्लिकवर घ्या जाणून

डिसेंबर, २०२१ मध्ये रिलीझ झालेल्या पुष्पाचा फिव्हर अजूनही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. याच पुष्पा सिनेमामध्ये शेवटची १५ मिनिटे खूपच भारी पडली. सिनेमात सुरुवातीपासून ज्याप्रकारे आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत आपला दबदबा निर्माण करतो, ते पाहून त्याच्यापुढं कुणी टिकणारंच नाही, असं वाटत असतं, पण शेवटी काट्याने काटा काढणारा आपल्यासारखाच कुणीतरी त्याला भेटतो. तो व्यक्ती म्हणजेच भंवर सिंग शेखावत. तेही आयपीएसच्या रुपात. हेच ते पात्र, जे सिनेमात पुष्पालाही टक्कर देतंय. १५ मिनिटांच्या या पात्राने संपूर्ण सिनेमा हादरून सोडला. पुष्पाचा पहिला पार्ट हा याच पात्रावर संपलाय. त्यामुळे पुढील पार्ट याच पात्रावर बनणारंय.

आयपीएस भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याकडे पाहून म्हणता येईल की, तो दमदार परफॉर्मर आहे. पण इतका दमदार परफॉर्मर असूनही हा अभिनेता बॉलिवूड इंडस्ट्रीच्या नजरेपासून लपून तरी कसा बसला. आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय, तो आहे अभिनेता आहे फहाद फाजिल. आज या लेखातून आपण फहादसोबत असं काय झालं की, त्याला आपल्या पहिल्याच सिनेमानंतर भारत का सोडावा लागला होता, याबद्दल जाणून घेणार आहोत.

फहाद फाजिलचं पूर्ण नाव आहे अब्दुल हमीद मोहम्मद फहाद फाजिल. त्याच्या वडिलांचं नाव आहे फाजिल. ते मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते, लेखक, दिग्दर्शक आहेत. फहादने त्याचं शिक्षण अल्लपूजाच्या SDV सेंट्रल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तो पुढे उटीच्या लॉरेन्स स्कूलमध्ये गेला. फहादला २ बहिणी आणि एक छोटा भाऊ आहे. त्याचा भाऊही अभिनेता आहे.

फहादला सुरुवातीपासूनच अभिनेता बनायचं होतं. त्यामुळेच त्याने शालेय शिक्षण झाल्यानंतर अल्लपूजातूनच अभिनयाचा कोर्स केला. त्यानंतर त्याने अभिनय सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. फहादचे वडील निर्माते, लेखक, दिग्दर्शक असल्याने त्यांनीच आपल्या मुलाला २००२ साली त्यांच्या ‘कायेथम दुराथ’मधून लाँच केलं. पण मध्येच माशी शिंकली. हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. या सिनेमानं फहादचं करिअर पुढं जाण्यापासून रोखलंच, पण वडिलांच्या करिअरची गाडी गडबडली. त्यावेळी वडिलांचं करिअर वाचवण्यासाठी फहादला सगळीकडं असं सांगावं लागलं की, “मीच अपयश आहे. मलाच सिनेमाबद्दल काही माहिती नव्हतं. मी कोणत्याही ट्रेनिंगशिवाय या इंडस्ट्रीत आलो. माझ्या वडिलांची काहीच चुकी नाही.”

या सिनेमाचं अपयश फहादच्या गळ्याखाली उतरत नव्हतं. त्याला असं वाटू लागलं होतं की, ही इंडस्ट्री आपल्यासाठी नाहीचे. ऍक्टिंगचं काम तर आपल्याकडनं व्हायचंच नाही. याच कारणामुळं तो पहिल्याच सिनेमानंतर भारत सोडून यूएसला इंजिनीअरिंग करण्यासाठी निघून गेला. पण काहीही म्हणा, सिनेमाकडं थोडं का होईना लक्ष तर जातंच. यादरम्यान फहाद एका पाकिस्तानी किराणा दुकानात सामान घेण्यासाठी जायचा. त्यानं पाहिलं की, त्या दुकानात भारतीय सिनेमाच्या डीव्हीडीदेखील मिळतात. यूएसमध्ये फहादला सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळत नसायचा. त्यामुळे तो आपल्या मित्रासोबत त्या किराणा दुकानात जाऊन सिनेमाच्या डीव्हीडी घेऊन यायचा. त्यावेळी दुकानदाराने फहादला सांगितलं की, ही डीव्हीडी घ्या, खूप वेगळा सिनेमा आहे. तो सिनेमा होता, नसीरुद्दीन शाह दिग्दर्शित ‘युं होता तो क्या होता?’ अनेक कलाकारांचा यात समावेश होता. पण फहादला भावला तो, दिग्गज अभिनेता इरफान खानचा अभिनय.

फहाद इरफान खानचा अभिनय पाहून दंग झाला की, हा माणूस आपल्या अभिनयात स्वत:ला किती झोकून देतोय. त्याने आतापर्यंत पात्रात काम करणारे कलाकार पाहिले होते, सुपरस्टार पाहिले होते, पण अभिनयात खराखुरापणा आणणार अभिनेता त्याने पहिल्यांदा पाहिला होता इरफान खानमध्ये. मग काय… तेव्हापासूून फहादने इरफान खानचे सिनेमे पाहण्यास सुरुवात केली. त्याच्या सिनेमातूनच फहादने शिकायला सुरुवात केली. त्याचे अभिनय कौशल्य आपल्यातही यावे यासाठी तो प्रयत्न करू लागला. तेव्हा कुठे कमबॅक करण्याची फहादची हिम्मत झाली. त्याने इंजीनिअरिंग सोडली आणि पुन्हा भारताची वाट धरली. भारतात आल्यानंतर त्याने २००९ साली पुनरागमन केले, ते ‘केरला कॅफे’ या सिनेमातून. या सिनेमातील फहादच्या अभिनयाला समीक्षकांकडून दाद मिळाली. त्यानंतर काही सिनेमे केल्यानंतर त्याने २०११ साली ‘चप्पा कुरिश’ या सिनेमात काम केलं. या सिनेमातील त्याच्या भूमिकेलाही चांगलीच वाहवा मिळाली. विशेष म्हणजे, या सिनेमात त्याने एक किसींग सीन दिला होता. असं म्हटलं जातं की, हा किसींग सीन मल्याळम सिनेसृष्टीतला सर्वात लांब किसींग सीन होता. त्यावेळी यामुळे चांगलाच वाद झाला होता. पण आता या सीनकडं सिनेमाच्या हिशोबानं पाहिलं, तर योग्य वाटतो.

२०१२ साली फहादनं लैंगिक अत्याचार आणि बदल्यावर आधारित सिनेमात काम केलं. सिनेमाचं नाव आहे ‘२२ फिमेल कोट्टयम.’ या सिनेमातील फहादचं काम सर्वांना आवडलं. त्यानंतर आला ‘नॉर्थ २४ काठम’ हा सिनेमा. या सिनेमातील फहादच्या कामाचं कौतुक चाहत्यांनीही केलं, समीक्षकांनीही केलं आणि सिनेइंडस्ट्रीनंही केलं. त्याला राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आधीच्या फहाद आणि आताच्या फहादमध्ये जमीन आस्मानाचा बदल झाला होता. तो आपल्या कामासाठी खूप गंभीर झाला होता. प्रेक्षकांनाही त्याचा प्रत्येक रोल आवडू लागला होता. आपणही काही कमी नाही, हे फहादने २०१७ मध्ये दाखवून दिलं. कारण याचवर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सिनेमा होता ‘थोंडी मुथालुम द्रीक्षाक्षियुम.’ इथून फहादच्या गाडीनं जो वेग धरला, तो परत कधी कमी झालाच नाही. तो आपल्या प्रत्येक सिनेमात दमदार अभिनयाचं दर्शन घडवत होता. आणि मल्याळी सिनेमांनी तमिळ सिनेमांसाठी कधी वाट मोकळी केली, कळलंच नाही.

प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘पुष्पा’ या सिनेमात फहादची अवघ्या १५ मिनिटांचीच भूमिका होती. पण ती भूमिका पाहूनही प्रेक्षकांच्या मनात थरकाप उडाला की, आता कुणीतरी आलंय पुष्पाला टक्कर द्यायला.

तर अशाप्रकारे फहादने पहिल्या सिनेमानंतर भारत सोडून इरफान खानकडून प्रेरणा घेत पुन्हा दमदार पदार्पण केलं आणि आपणही काही कमी नाही हे जगाला दाखवून दिलं. आता फहाद पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमध्ये काय कमाल दाखवतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचलीये.

हेही पाहा- इरफान नसता, तर ‘पुष्पा’ सिनेमाला ‘भंवर सिंग’ मिळालाच नसता

लेखाचा शेवट करता करता फहादविषयी रंजक माहिती अशी की, फहादने २०१४ साली मल्याळम अभिनेत्री नाजरिया नजीमसोबत संसार थाटला होता. त्यांनी २०१४ सालीच ‘बेंगलोर डेज’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुढे त्यांच्यात प्रेमाची घंटी वाजली आणि दोघांनी लग्न केलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

लग्नानंतरही किसींग सीन देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री, यादीत ऐश्वर्याचाही समावेश

‘शूट आऊट ऍट वडाला’च्या डायरेक्टरने खाल्ली होती विवेक ओबेरॉयसोबत काम न करण्याची शपथ

मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल

हे देखील वाचा