प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी ‘नगमा’ यांनी गेल्याच महिन्यात आपला ५०वा वाढदिवस साजरा केला. नगमा ह्यांचा जन्म अतिशय प्रतिष्ठित घरात झाला. नगमा यांनी सलमान खानची अभिनेत्रीची भूमिका साकारत ‘बागी’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. नगमा ह्यांनी सुहाग, कुंवारा, चल मेरे भाई, ये तेरा घर हैं मेरा घर, अब तुम्हारे हवाले वतन साथीयो आदी अनेक हिट सिनेमे हिंदी सिनेसृष्टीला दिले.
नगमा ह्यांनी हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, भोजपुरी, पंजाबी आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. नंतर मात्र नगमा ह्यांनी चित्रपटांना रामराम ठोकत राजकारणात प्रवेश केला.
नगमाने यांनी २००४ साली त्यांच्या राजकारणाच्या पारीला सुरुवात केली. २००४ साली नगमा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नगमाचे नाव तेव्हाचा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीबरोबरही जोडले गेले होते. २००१मध्ये त्या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या मोठ्या चर्चा होत्या. गांगुलीने तेव्हा आंध्रप्रदेशात नगमाबरोबर लग्न केल्याची वृत्तही माध्यमांनी दिली होती. परंतू या वृत्ताचे तेव्हा दोघांनीही खंडन केले होते. जेव्हा जेव्हा भारतीय संघ पराभूत व्हायचा तेव्हा तेव्हा त्यावेळी याचे खापर नगमावर फोडले जायचे. शरथ कुमार, रवी किशन व मनोज तिवारींबरोबरही नगमाचे नाव पुढे जोडले गेले.
२०१४ साली त्यांना काँग्रेसने उत्तरप्रदेशच्या मेरठ मधून लोकसभेची उमेदवारी दिली. नगमा यांच्यासाठी मेरठमध्ये एका मोठ्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. जेव्हा नगमा मेरठमध्ये प्रचारासाठी पोहचल्या तेव्हा तिथला मोठा जनसमुदाय त्यांना बघण्यासाठी आला होता. नगमा या त्या ठिकाणी पोहचताच तिथली गर्दी अनावर झाली आणि मोठा गोंधळ सुरु झाला. मारामारी, खुर्च्यांची तोडफोड अशा अनेक घटना घडायला तिथे सुरुवात झाली. त्यातच एका माणसाने नगमा यांच्यासोबत गैरवर्तन केले त्यांनी त्याचवेळी त्या इसमाच्या जोरात कानाखाली मारत त्या सभेतून त्या निघून गेल्या, या घटनेचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
नगमा यांच्यासोबत झालेली ही काय पहिली घटना नाही. याआधी देखील एका कार्यक्रमात काँग्रेस विधायक गजराज सिंग यांनी त्यांच्यासोबाबत गैरवर्तणूक केली होती. मात्र नगमा यांनी या सर्व गोष्टींना अफवा सांगत त्यावर पडदा टाकला होता.
२०१४ साली त्यानी लढवलेल्या निवडणुकीत त्यांचा खूप वाईट पराभव झाला होता. एवढेच नाही तर त्यांचे डिपॉजिट देखील जप्त करण्यात आले होते. २०१५ साली काँग्रेसने त्यांची नियुक्ती अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिणीसपदी केली. नगमा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘माझी आई मुस्लिम आणि वडील हिंदू आहेत. आम्ही सर्वधर्मांचा आदर करतो. मला देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करायचे होते, म्हणूनच मी राजकारणात प्रवेश केला. ‘