Monday, July 1, 2024

कपिल शर्माच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रमोशन का नाही झाले? अनुपम खेर यांनी सांगितले सत्य

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी विवेक यांनी काही ट्वीट केले होते. ज्यानंतर कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याचा शो वादात सापडला होता. विवेक यांनी आरोप केला होता की, कपिलच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ‘द कपिल शर्मा शो’वर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली होती. पण आता ‘द काश्मीर फाइल्स’चे अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सत्य उघड केले आहे.

अनुपम खेर यांनी सांगितले सत्य
खरं तर, नुकतीच अनुपम खेर यांनी माध्यमांना मुलाखत दिली. यादरम्यान त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये का गेले नाही हे सांगितले. मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांना विचारण्यात आले की, द कपिल शर्मा शो हा कॉमेडी शो आहे. तुम्हाला वाटते की, हा इतका खोलवर बोलण्याचा मुद्दा आहे? याला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले की, “खरे सांगायचे तर मला शोमध्ये बोलावण्यात आले होते. मी माझ्या मॅनेजरला सांगितले की, हा चित्रपट खूप गंभीर आहे. मी तिथे जाऊ शकत नाही. दोन महिन्यांपूर्वी मला यायला सांगितल्यावर हा प्रकार घडला. मी या शोमध्ये अनेकदा गेलो आहे आणि हा एक मजेदार शो आहे. कपिलच्या मनात आपल्याबद्दल किंवा चित्रपटाबद्दल द्वेष आहे, असे मला वाटत नाही.”

कपिल शर्माने दिली प्रतिक्रिया
अनुपम खेर यांच्या या मुलाखतीवर कपिल शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, “माझ्यावरील सर्व आरोप खोडून काढल्याबद्दल अनुपम खेर पाजी आणि त्या सर्व मित्रांचेही आभार. ज्यांनी मला सत्य न कळता इतके प्रेम दिले. आनंदी रहा, हसत रहा.”

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही वेळापूर्वी ट्विटरवर विवेक अग्निहोत्रींना टॅग करणाऱ्या एका युजरने विचारले होते की, “विवेक सर, कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन व्हायला हवे. तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाचेही प्रमोशन करा. मिथुन दा, अनुपम खेर यांना एकत्र बघायचे आहे. धन्यवाद!” या ट्वीटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्रींनी लिहिले की, “कपिलच्या शोमध्ये कोणाला बोलवायचे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलिवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते की, “वो राजा हैं हम रंक.”

‘शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला’
याआधीही विवेक अग्निहोत्रींनी एका ट्वीटमध्ये सांगितले होते की, ते स्वत: कपिल शर्माच्या शोचा खूप मोठे चाहते आहेत. पण त्यांना शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यांनी लिहिले होते की, “मी देखील त्याचा चाहता आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आमच्या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नसल्यामुळे त्याने आम्हाला त्याच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. बॉलिवूडमधील बिगर स्टार दिग्दर्शक, लेखक, चांगले अभिनेते यांना कोणी विचारत नाही.”

हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा