आपल्याकडे घटस्फोटाशिवाय एक व्यक्ती कायद्याने दुसरं लग्न करू शकत नाही. बॉलिवूडमध्ये सर्रास अभिनेत्यांची दोन दोन लग्न पाहायला मिळतात. दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची अडचण येत असेल तर तिला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करून नवा संसार अनेक अभिनेत्यांनी थाटला आहे. कधी कधी तर कित्येक अभिनेत्यांनी पहिल्या पत्नीला सोबत ठेवूनच दुसरं लग्न केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बॉलिवूडमध्ये या गोष्टी म्हणजे एकदम सामान्य आहेत. परंतु सामान्य माणसाच्या आयुष्यात या गोष्टी मात्र असामान्य आहेत. चला तर मग पाहुयात असे कोणते अभिनेते आहेत ज्यांनी हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला, काही त्यात यशस्वी झाले तर काही ठरले अपयशी!
गोविंदा
नुकताच गोविंदाने त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्याच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. बॉलिवूडच्या अनेक टॉप अभिनेत्रींसोबत त्याने मुख्य भुमीका साकारल्या. अशात कुठे कधी काही घडलं नसतं तरच नवल! त्यावेळी हद कर दी आपने या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. या सिनेमाच्या सेटवर गोविंदा आणि राणी यांच्यातील जवळीक वाढू लागली.
परिणामी गोविंदा अनेक दिग्दर्शकांना तिचं नाव सजेस्ट करू लागला. ही बाब त्याची पत्नी सुनीताला कळाली. तिने ताबडतोब गोविंदाला घर सोडून माहेरी जाण्याची धमकी दिली. हे ऐकून गोविंदाला त्याची चूक लक्षात आली. त्याने राणीसोबत पुन्हा अंतर वाढवलं आणि पत्नी सुनीतासोबत सुखी सांसारिक आयुष्य जगू लागला. यानंतर देखील गोविंदा आणि राणी यांनी चलो ईश्क लडाये, प्यार दिवाना होता है, किल दिल सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. गोविंदा आणि सुनीता यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. सध्या गोविंदा हा सिनेसृष्टीत फारसा सक्रिय दिसत नाही.
बोनी कपूर
चित्रपट निर्माता बोनी कपूर यांचं पहिलं लग्न १९८३ मध्ये मोना शौरी यांच्याशी झालं होतं परंतु असे असूनही नंतरच्या काळात ते श्रीदेवीकडे सतत आकर्षित होत राहिले. यानंतर बोनी आणि श्रीदेवी यांच्यात प्रेम जुळलं आणि दोघांनीही १९९६ मध्ये लग्न केलं. श्री देवीशी लग्न झाल्यानंतर मोना यांनी १९९६ मध्येच घटस्फोट दिला. २०१२ मध्ये मोना यांचं निधन झालं.
श्री देवी आणि बोनी कपूर यांना दोन्ही कन्याचं झाल्या. जान्हवी आणि खुशी कपूर. २०१८ मध्ये दुबईतील एका हॉटेलच्या बाथटब मध्ये बुडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आपल्याला ठाऊक आहे का की श्री देवी या बोनी कपूर यांच्याशी लग्नाआधीपासूनच गरोदर होत्या. लग्नानंतर लगेचच काही महिन्यांमध्ये जान्हवी कपूर हीचा जन्म झाला होता. बोनी कपूर यांची दोन मुलं म्हणजेच अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हे संमिश्र यशासोबत बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.
आदित्य पांचोली
अभिनेता आदित्य पंचोली याचे अभिनेत्री कंगनासोबतचे विवाहबाह्य संबंध हे काही काळ चर्चेत होते. आदित्य पांचोलीपेक्षा २३ वर्षे लहान कंगना जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. पुढील काही वर्षे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले परंतु त्यानंतर कंगनाने आदित्यवर छळ केल्याचा आरोप केला आणि ती त्याच्यापासून वेगळी झाली.
या घडल्या प्रकारानंतर आदित्य त्याची पत्नी झरीना वहाब आणि मुलं सूरज पांचोली आणि सना पांचोली यांच्याकडे परत आला. आदित्यने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिकाच आतापर्यंत जास्त रंगवल्या आहेत. तर काही वर्षांपूर्वी आदीत्यचा मुलगा सूरज याला सलमान खान याने हिरो या सिनेमातून लॉंच केलं होतं. परंतु वडीलांप्रमाणे सूरज प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडायला साफ अपयशी ठरला.
शत्रुघ्न सिन्हा
सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना आज कोण ओळखत नाही. आजही त्यांचं नाव काढलं की खामोश हा संवाद कानामध्ये गुंजारम करू लागतो. शत्रुघ्न यांनी १९८० मध्ये पूनम यांच्याशी विवाह केला. पूनम आणि शत्रुघ्न यांना तीन मुलं झाली. सोनाक्षी, आणि नंतर दोन जुळे झाले ज्यांची नावं आहेत लव आणि कुश! तीन मुलांचा पिता असलेले शत्रुघ्न त्यावेळी अभिनेत्री रीना रॉय यांच्या प्रेमात होते.
माध्यमांमधील वृत्तानुसार, शत्रुघ्न यांच्या सोबतच्या नात्याबाबत रीना खूप गंभीर होत्या परंतु शत्रुघ्न हे रीना यांना लग्नाबद्दल शाश्वती देण्यास कचरत होते. आधीच विवाहित असल्यामुळे त्यांना रीना यांच्यासोबत असलेल्या नात्याला कोणतंही नाव द्यायचं नव्हतं किंबहुना पत्नी पूनम यांना त्यांना सोडायचं नव्हतं. याच एकमेव कारणापायी शत्रुघ्न यांनी रीना रॉय यांच्यासोबत असलेली जवळीक कमी करत अंतर वाढवलं. सध्या शत्रुघ्न हे राजकारणात सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. शत्रुघ्न यांची लेक सोनाक्षी ही देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपली यशस्वी कारकीर्द अनुभवत आहे.
मिथुन चक्रवर्ती
बॉलिवूडचे डिस्को डान्सर, डान्स इंडिया डान्स या रिऍलिटी शो चे ग्रँड मास्टर मिथुन दा यांना आज वेगळ्या अशा ओळखीची गरजच नाही. मिथुन चक्रवर्ती हे एक उत्तम अभिनेते तर आहेतच परंतु एक उत्तम डान्सर देखील आहेत. अजूनही निरनिराळ्या सिनेमांमधून ते आपल्या भेटीला कायम येत असतात. परंतु आपल्याला ठाऊक आहे का,हेच मिथुन दा विवाहित असूनही एकेकाळी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
मिथुन दा यांचा विवाह १९७९ मध्ये योगिता बाली यांच्याशी झाला होता. योगिता बाली या दिवंगत अभिनेते, महान संगीतकार, गीतकार, गायक किशोर कुमार यांच्या पत्नी होत्या. १९७८ मध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्या सोबत घटस्फोट घेतला होता. यानंतर नव्वदीच्या काळात जेव्हा श्रीदेवी सिनेसृष्टीत आल्या त्यावेळी मिथुन दा हे त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
पत्नी योगिता यांच्याबद्दल त्यांच्या मनात विचारदेखील येत नव्हता. माध्यमांमधील तेव्हाच्या काही वृत्तांनुसार की मिथुन दा आणि श्री देवी यांनी लपून छपून लग्न देखील केलं होतं जे ऐकून योगिता यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु सद्यस्थिती पाहता मिथुन आणि श्रीदेवी यांच्या छुप्या लग्नाची बातमी एक अफवा होती असच म्हणावं लागेल. मिथुन दा आणि योगिता यांना महाक्षय, नमाशी, उष्मेय ही तीन मुलं तर दिशानी ही एक कन्या आहे. दिशानी ही मिथुन दा यांची दत्तक पुत्री आहे. मिथुन दा यांचा मोठा मुलगा महाक्षय चक्रवर्ती हा हॉंटेड ३डी या २०११मध्ये आलेल्या भयपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.