Saturday, July 27, 2024

हिंदी कार्यक्रमामुळे विनोदवीर सागर कारंडे आणि भारत गणेशपुुरे ठोकणार ‘चला हवा येऊ द्या’ ला रामराम, काय आहे सत्य?

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कार्यक्रमाची विनोदी मांडणी आणि कथानक यामुळे हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सागर कारंडे (Sagar Karande) आणि भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या अभिनयाने आणि विनोदाच्या जादूने सर्वांनाच खळखळून हसायला लावले आहे. मात्र या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांचा हिरमोड करणारी बातमी सध्या समोर येत असून चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे बाहेर पडणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. काय आहे या बातमीमागचे सत्य, चला जाणून घेऊ. 

चला हवा येऊ द्या हा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, आणि कुशल बद्रिके या विनोदविरांनी आजपर्यंत या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कार्यक्रमात सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांच्या कॉमेडीचे असंख्य चाहते आहेत. मात्र आता या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली असून सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र अद्याप याबद्दल दोघांनीही अधिकृत घोषणा केली नाही.

सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे लवकरच सोनी टिव्हीवरील इंडियाज लाफ्टर चॅंम्पियन या कार्यक्रमात झळकणार आहेत.  त्यामुळेच ते  चला हवा येऊ द्या कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रसारित होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात झळकणार असले तरी दोन्ही कार्यक्रमांच्या शूटिंगच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने ते चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडणार नसल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळेच याबद्दलची कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे देखील वाचा