Monday, July 1, 2024

अभिनयात फ्लॉप ठरल्यानंतर ‘या’ कलाकारांनी सुरु केले दुसऱ्या क्षेत्रात करिअर

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्यांनी वेगवेगळे सिनेमे केले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले, नाव कमावले पण तरीही एक यशस्वी कलाकार ही ओळख काही मिळाली नाही. अभिनयात फ्लॉप ठरल्यानंतर अनेक कलाकारांनी याच इंडस्ट्रीमध्ये राहून वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर पुढे नेले. कोणी दिग्दर्शनात गेले, कोणी निर्माता झाले, कोणी लिखाणात गेले असेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयात राहूनही वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावले, तर काहींनी अभिनयाला रामराम ठोकत वेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.

कुणाल खेमू :
बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलेल्या कुणालने मोठे झाल्यावर मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये काम करत नवीन कारकीर्द सुरु केली. त्याने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका तर काही सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या, मात्र त्याला यश मिळाले नाही. आता कुणाल दिग्दर्शनात पदार्पण करत असून, तो प्रतीक गांधींसोबत एका नवीन सिनेमाची सुरुवात करणार आहे.

पूजा भट्ट :
९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री म्हणून पूजा भट्टची ओळख होती. पूजाने अनेक हिट सिनेमे दिले, तरीही तिने दिग्दर्शनात पदार्पण केले. पूजाने जॉन अब्राहमसोबत ‘पाप’ सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकले. तिने पाप, जिस्म, जिस्म २ आदी सिनेमांचे दिग्दर्शन केले.

Photo Courtesy: Instagram/poojab1972

जुगल हंसराज :
‘मोहब्बते’ सिनेमातील अभिनेता जुगल हंसराजला या सिनेमानंतर खूप लोकप्रियता मिळाली. मात्र सिनेमे मिळाले नाही आणि हळूहळू तो इंडस्ट्रीमधून गायब झाला. त्याने एनिमेटेड सिनेमा ‘रोडसाइड रोमियो’ तयार केला.

अरबाज खान :
सलमान खानचा भाऊ असलेल्या अरबाजने अनेक सिनेमांमध्ये काम केले, मात्र त्याला यशस्वी अभिनेता ही ओळख मिळाली नाही. मग त्याने ‘दबंग’ सिनेमा तयार करत निर्मिती पदार्पण केले, आणि त्याला मोठे यश मिळाले. तरीही अरबाज अभिनय करताना दिसतो.

आशुतोष गोवारीकर :
हे नाव जरी उच्चारले तरी ऐतिहासिक आणि भव्य दिव्य सिनेमे डोळ्यासमोर येतात, मात्र आशुतोष यांनी देखील आधी अभिनयातच सुरुवात केली होती. अनेक सहाय्यक भूमिका साकारल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि इथे त्यांना तुफान यश मिळाले.

सुभाष घई :
शोमॅन ही ओळख असलेल्या सुभाष घई यांनी तकदीर आणि आराधना सिनेमात काम केले, मात्र त्यांना समजले की, अभिनय त्यांचे करिअर घडवू शकत नाही. म्हणून त्यांनी दिग्दर्शनात एन्ट्री केली. त्यांनी राम-लखन, कर्मा, यादे, परदेस, कर्ज, त्रिमूर्ती, खलनायक आदी हिट सिनेमे दिले.

अभिषेक कपूर :
अभिषेक कपूरने त्याचे करिअर अभिनयातच सुरु केले होते. ‘उफ ये मोहब्बत’ हा त्याचा पहिला सिनेमा होता. मात्र त्याला तिथे यश न मिळाल्याने त्याने दिग्दर्शन सुरु केले. अभिषेकने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यात ‘चंडीगढ़ करे आशिकी’, ‘रॉक ऑन’ आदी सिनेमांचा समावेश आहे.

राकेश रोशन :
राकेश रोशन यांनी जुन्या काळात अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र त्यांना ओळख दिग्दर्शनामुळेच मिळाली. करण अर्जुन, कोई मिल गया, कहो न प्यार, क्रिश आदी सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही सुपरस्टार झालो…” बाईपण भारी देवा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वंदना गुप्तेंनी व्यक्त केल्या भावना
‘टॅलेंटमुळे काम मिळालंय, सोशल मीडिया…’, अभिनय करिअरच्या संघर्षावर ‘आनंदी’चे परखड मत

हे देखील वाचा