मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, आणि ती मालिका म्हणजे आई कुठे काय करते?. या मालिकेने सर्वच प्रेक्षकांवर आपले गारुड घातले आहे. आज या टॉपच्या मालिकेमुळे अनेक कलाकारांना नवीन आणि मोठी ओळख मिळाली. याच मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना देखील या मालिकेने नवीन ओळख मिळवून दिली. मिलिंद गवळी हे उत्तम अभिनेते असून, ते उत्तम लेखक देखील आहेत. ते नेहमीच त्यांच्या भावना सोशल मीडिया समर्पक शब्दात मांडत असतात. नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी अतिशय सुंदर पोस्ट लिहिली आहे. या सोबतच त्यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा सुंदर आठवणींच्या फोटोना कोलाज करत त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “दिपा आणि माझा आज लग्नाच्या वाढदिवस.
View this post on Instagram
तीन दशकाहून अधिक काळ अशा माणसाबरोबर संसार केला जो गावोगावी जाऊन डोंबाऱ्याच्या खेळा सारखा सिनेमा , सिरीयल चा खेळ करतो आहे , आणि बऱ्याच वेळेला महिने महिने काम करून सुद्धा घरी येताना संसार चालवण्यासाठी काहीच पैसे घरी घेऊन आलेलो नसायचो, बरेचसे प्रोड्युसर मला माझे ठरलेले पैसे सुद्धा द्यायचे नाहीत, आणि आपल्या हक्काचे पैसे मागायची आजही मला सवय नाही आहे, हा संसाराचा गाडा कसा पुढे ढकला असेल , हे खरतर दिपालाच ठाऊक, पण कधी एका शब्दांनी विचारलं नाही , कधी कुरकुर केले नाही, का कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही, ऊलट काटकसर करायची सवय च लाऊन घेतली, इतकी सवय लागली की आजही पार्टी करायची म्हटली तरी सुद्धा एखादी भेळ, किंवा पाणीपुरी खाल्ली ही समाधान मानते ती. अगदीच
आजही कधी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेवलोच
तरी एखादं दहा-पंधरा रुपयाचं चोकोबार आईस्क्रीम खाल्लं की मगच चैन वगरे केल्यासारखं वाटतं तिला.
आहे त्या परिस्थितीत खूप समाधानी राहायचं हे तिच्याकडून शिकण्यासारखा आहे.
कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं, आणि तो कलाकार जर यशस्वी नसेल तर, संसाराचा गाडा पुढे ढकलत राहणार फारच कठीण होत जातं…
काम नसायचं त्यावेळेला लोकं मुद्दामून अडूनाडून विचारायची की “काय मग आता घरीच आहेस का ?”, “शूटिंग वगैरे नाही का?” पण त्या काळातही दिपाने मला कधीही जाणव करून दिलं नाही, की मी एक flop Actor आहे , का माझ्याकडे काही काम नाही आहे किंवा मला कोणीही काम देत नाही आहे, बरं मला माझ्या आई-वडिलांनी राजेशाही पद्धतीने वाढवलं असल्यामुळे, स्वतः जाऊन काम मागायची मला सवयच नव्हती, त्यामुळे महिने महिने काहीही काम मिळायचं नाही, सातारा कोल्हापूरचे पिक्चर यायचे त्यात पैसे अगदीच कमी मिळायचे.
या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये घर सांभाळायचं, नातेवाईक सांभाळायचे, मिथीलाची तर संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फक्त दिपा नेच घेतली होती, positive विचार आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा .
आमच्या लग्नाचा वाढदिवस आला की मला जाणवतं की इतकी वर्ष या माऊलीने माझ्या बरोबर किती आनंदाने हा संसार केला, खूप खडतर प्रवास केला आणि आजही करते आहे , तिचे जितके आभार मानू इतके कमी आहेत.
दिपा तुला ही आपल्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या लिखाणाचे आणि बायकोबद्दल असलेल्या प्रेमाचे, आदराचे, तिच्या त्यागाचे आदी अनेक गोष्टींबद्दल असलेल्या कृज्ञतेचे कौतुक केले आहे.