सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. राजू श्रीवास्तव यांना व्हॉट्सऍप कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. राजू श्रीवास्तव हे सध्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथे राहतात. त्यांनी लगेचच या धमकीच्या फोन बद्दल कानपुर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
हा धमकीचा फोन फक्त त्यांनाच नाही तर त्यांचे सहयोगी अजित सक्सेना आणि गरवित नांगर यांनादेखील जीवघेण्या धमक्यांचे फोन आले. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनीदेखील लगेच एक अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.
सात वर्षांपूर्वी देखील राजू श्रीवास्तव यांना असाच एक जीवघेनण्या धमकीचा कॉल आला होता. त्यावेळी त्यांनी फोन करणार्याविरोधात महाराष्ट्रात एफआयआर दाखल केला होता. आता पुन्हा एकदा असंच झाल्याने त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
प्रथमदर्शनी असं म्हटलं जात आहे की, ज्या नंबरवरून त्यांना हा धमकीचा फोन आला आहे तो नंबर पाकिस्तानमधील कराची शहरातील आहे. या धमकी देणाऱ्या कॉलबद्दल माहिती देताना राजू श्रीवास्तव म्हणाले की, त्यांच्या मुलांना मारलं जाईल आणि त्यांची अवस्था लखनऊच्या कमलेश तिवारी याच्यासारखीच केली जाईल असं फोनवर सांगितलं जात आहे.
राजू श्रीवास्तव हे सध्या उत्तरप्रदेशमधील कानपुर येथे राहत असून ते उत्तरपदेश चित्रपट विकास परिषदेचे प्रमुख आहेत. याशिवाय ते अजूनही सुप्रसिद्ध विनोदवीर असून देशभर त्यांचे कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे होत असतात.
त्यांनी सुरुवातीला बॉलिवूड सिनेमांमध्ये लहान लहान भूमिका देखील साकारल्या आहेत. परंतु त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती म्हणजे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो ने! त्यांनी या शोमध्ये आपल्या स्टॅंड अप कोमेडीवर काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी बिग बॉस पर्व ३ मध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला आहे.