हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजेडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं आज निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहजीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. दिलीपकुमार यांना बॉलिवूडमध्ये ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जायचे. गेल्या अनेक वर्षांपासून दिलीपकुमार आजारी होते. तब्येत बिघडली की, त्यांना इस्पितळात दाखल केले जायचे. प्रार्थना आणि उपचारांना प्रतिसाद दिल्यानंतर ते बरे होऊन परतही येत होते. पण मंगळवार आजचा दिवस याला अपवाद ठरला.
दिलीपकुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला खान अशी दिलीपकुमार यांची ओळख होती. १९४४ साली ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यांनी कधीचं मागे वळून पहिले नाही. दिलीप साहेबांनी जे स्थान सिनेसृष्टीत निर्माण केले ते दुसरे कोणीच करू शकत नाही आणि त्यांची जागा देखील कोणी घेऊ शकणार नाही.
दिलीपकुमार जसे यशस्वी होत गेले तसे त्यांच्या अफेयरच्या बातम्या यायला लागल्या. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबद्दल सर्वानाच माहित आहे. मात्र मधुबाला यांच्याशिवाय त्यांचे नाव कामिनी कौशल आणि वैजयंतीमाला यांच्यासोबत देखील जोडले गेले. मात्र १९६६ साली त्यांनी अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी निकाह करत सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ज्यावेळी त्यांनी लग्न केले, तेव्हा दिलीप साहेब ४४ तर सायराबानू २२ वर्षांच्या होत्या. त्या दिलीपकुमारांपेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. पुढे दिलीप साहेबांनी १९८१ साली हैदराबादच्या असमा जहाँगीर यांच्यासोबत दुसरा निकाह केला. पण अवघ्या दोनच वर्षातच त्यांचे दुसरे लग्न मोडले. मात्र सायरा बानू यांनी दिलीपकुमारांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. प्रत्येकवेळी त्या सावली सारख्या साहेबांसोबत असायच्या. या दोघांनाही मूल नव्हते.
विशेष म्हणजे सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमारांनाच मिळाला होता. सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांनाच मिळाले आहेत. हा एक रेकॉर्ड त्यांनी बनवला आहे. १९९७ साली त्यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. दिलीप कुमार यांनी पाच दशके आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ६५ चित्रपट दिलीपकुमारांच्या नावावर आहेत. ‘अंदाज’, ‘आन’, ‘दाग’, ‘देवदास’, ‘आझाद’, ‘मुगल-ए-आझम’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’, ‘शक्ति’, ‘विधाता’,’मजदूर’,’दुनिया’,’मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-