Saturday, April 20, 2024

‘होय, सामना संपल्यानंतर भारत जिंकला आहे…’, अभिनेता सोनू सूदकडून विराट कोहलीचे कौतुक

भारत आणि पाकिस्तान संघातील क्रिकेटचा कोणताही सामना असो, त्यासाठी जगभरातील सर्वच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. पुन्हा एकदा हाच उत्साह टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाहायला मिळाला. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान संघ आमने- सामने होते. सर्वांना अशी खात्री होती की, भारतीय संघच हा सामना खिशात घालेल. कारण, यापूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत सामने जिंकले होते. मात्र, यावेळी भलतंच घडलं. क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच पाहायला मिळाले की, भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला. मात्र, यावेळी कर्णधार विराट कोहलीने जे केले त्याने सर्वांचे मन जिंकले. यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीच्या हावभावाने जिंकली सर्वांची मने
भारतीय संघाला पाकिस्तानकडून या सामन्यात १० विकेट्सनी पराभूत व्हावे लागले. यादरम्यान सामना हातातून निसटताना पाहून विराट भलताच चिंतीत होता. मात्र, पराभवानंतर विराट पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीवर खुश असल्याचे दिसले. सामना संपल्यानंतर मैदानात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देणारा हा विराट कोहलीच होता. दोन्ही देशांमध्ये नेहमी तणावाचे वातावरण असते. मात्र, यावेळचा हा क्षण कोणत्याही सुखद धक्क्यापेक्षा कमी नव्हता. विराटने बाबरची पाठ थोपटली आणि रिझवानला मिठी मारली. (T20 World Cup Actor Sonu Sood Happy Virat Kohli Cricket Sportmanship Hugging Pakistani Cricketers Babar Azam Mohammad Rizwan)

सोनू सूदकडून कौतुक
हे दृश्य काही सेकंदापुरतेच होते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सुखद क्षणांमध्ये कैद झाले. यादरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच सर्वजण विराट कोहलीचीही प्रशंसा करत आहेत. अशातच अभिनेता सोनू सूदनेही त्याच्यावर कौतुकाची थाप मारली आहे. सोनूने सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, “होय, भारत जिंकला आहे, सामना संपल्यानंतर. विराट कोहलीची ती एक मिठी सर्व ट्रॉफींप्रमाणे होती. विसरलात? पराभूत होऊन जिंकणाऱ्यालाच बाजीगर म्हणतात.”

यापूर्वी सोनूने पाकिस्तानविरुद्ध सामना गमावल्यानंतर एक ट्वीट केले होते. त्याने विराट रिझवानला मिठी मारतानाचा फोटो शेअर करत म्हटले होते की, “होय. भारत जिंकला.”

स्टेडिअममध्ये पोहोचले भारतीय कलाकार
पाकिस्तान संघाने सुरुवातीपासूनच भारतावर दबाव बनवला होता. या सामन्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अक्षय कुमार, मौनी रॉय आणि उर्वशी रौतेला यांचा समावेश होता. दुसरीकडे प्रीति झिंटा आपल्या पतीसोबत सामन्यासाठी पोहोचली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारत- पाकिस्तान सामन्यासाठी ‘या’ कलाकारांनी लावली होती हजेरी; फोटो जोरदार व्हायरल

-‘हळू हळू कपडे छोटे होत आहे’, म्हणत नेटकऱ्यांनी कपड्यांवरून केले मीरा राजपूतला ट्रोल

-उर्फीने दाखवली आपल्या बॉयफ्रेंडची पहिली झलक; व्हिडिओ पाहून तुटेल चाहत्यांचे मन

हे देखील वाचा