Thursday, April 25, 2024

साधीसुधी नव्हती बॉलिवूडमधली ‘ही’ भांडणं, सलमान आणि शाहरुखने खणाखण वाजवलेली कानाखाली

बॉलिवूडमध्ये कोणाची फ्रेंडशिप भारीये, कोणाचं कोणासोबत लफडं सुरूये, किंवा कोणाचं ब्रेकअप झालंय, कधी कुणाचं लग्न होतंय, हे सगळं पाहण्यात आपल्याला इंटरेस्ट तर असतोच असतो, पण त्याहून जास्त इंटरेस्ट कशात असेल, तर ते म्हणजे बॉलिवूड कलाकारांमधील भांडणाशी आणि बॉलिवूड म्हणलं की, यात दररोज कुणी ना कुणी एकमेकांसोबत भांडत असतं. आज आपण जाणून घेणार आहोत अशीच काही भांडणं.

ईशा देओल आणि अमृता राव
ईशा आणि अमृता दोघीही एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक, पण दोघींचं चांगलंच बिनसलेलं. ‘प्यारे मोहन’ या सिनेमात दोघी काम करत होत्या. तेव्हा त्यांच्यात काहीतरी खटकलं आणि रागाच्या भरात ईशाने अमृताला एक जोराची कानाखाली मारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या सेटवर अमृताने ईशावर एक वाईट कमेंट केली होती, जी ईशाला आवडली नाही. त्यामुळे ही मॅन धर्मेंद्र आणि ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनींच्या या मुलीने अमृता रावला कानाखाली मारली. नंतर एका मुलाखतीत ईशाने मान्य केलं होतं की, तिनं खरंच अमृताला चापट मारली. पॅकअपनंतर तिनं डायरेक्टर इंद्रकुमार आणि कॅमेरामनसमोर शिवी दिली होती, जी मला पचलीच नाही. त्यामुळे मी तिला चापट मारली होती. याचा मला मुळीच खेद नाही. कारण तिने कामच असं केलं होतं. मी हे माझ्या सेल्फ रिस्पेक्टमुळे केलं. ईशानं हेही सांगितलं की, अमृताला नंतर आपली चूक समजली आणि तिनं माफीही मागितली. अमृताही एका मुलाखतीत म्हणाली होती की, “तिला दोष देणं योग्य नाही. मला याबद्दल काही बोलायचं नाही. हे माझ्यासाठी क्लोज चॅप्टरसारखं आहे.”

सलमान खान आणि सुभाष घई
सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांना डेट करत होते, तेव्हाचा हा किस्सा आहे. त्यावेळी ऐश्वर्या ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘ताल’ या सिनेमात काम करत होती. पण ऐश्वर्याने सुभाष घईंच्या सिनेमात काम करावं हे सलमानला मान्य नव्हतं. त्यामुळे सुभाष घईंसोबत सलमानचं भांडण झालं. सलमान जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात करत होता, तेव्हा सुभाष घई शाहरुख खानच्या बंगल्याखाली आपल्या एका सिनेमाची शूटिंग करत होते. तिथं सलमानने अचानक एन्ट्री केली, आणि सुभाष घईंनी विचारल्यानंतर सलमानने सांगितलं की, त्याला त्यांच्यासोबत काम करायचंय. सलमानचा ऍटिट्यूड आणि बोलण्याच्या स्टाईलवरून सुभाष घई त्याला इगनोर करण्याच्या अंदाजात म्हणाले, हा का नाही. त्यानंतर आपल्याला काम मिळेल, असा विचार करून सलमान तिथून निघून गेला, पण तसं काही झालं नाही. सलमानला पुढं राजश्रीकडून मोठा ब्रेक मिळाला. यानंतर म्हणलं जातं की, सलमान आणि सुभाष यांच्यातील नाते बिघडू लागले. यामुळेच सलमानला वाटत नव्हतं की, ऐश्वर्यानं ताल सिनेमात काम केलं पाहिजे, पण करिअरला महत्त्व देणाऱ्या ऐश्वर्यानं सलमानचं एक नाही ऐकलं. त्यामुळे सलमानचा पारा खूपच चढला. असं म्हणलं जातं की, तावातावानं त्यावेळी सलमान त्या सिनेमाच्या सेटवर गेला आणि सुभाष घईंना खूप सुनावलं. काहीजण तर असंही म्हणतात की, सलमानला चापटही मारली होती, पण वडील सलीम खान यांनी सांगितल्यानंतर सलमाननं सुभाष यांची माफी मागितली. यानंतर त्यांच्यातील भांडण संपले.

करीना कपूर आणि बिपाशा बासू
करीना कपूर आणि बिपाशा बासू दोघीही हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार २००१ मध्ये ‘अजनबी’ सिनेमात दोघींनी एकत्र काम केले होते. यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला होता. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूरची डिझायनर तिला कसलीही कल्पना न देता तिची सहअभिनेत्री असलेल्या बिपाशा बासूची मदत करण्यासाठी गेली होती, ज्यामुळे करीनाचा पारा चांगलाच चढला होता. या कारणावरून करीनाने मोठा गोंधळ घातला होता. रिपोर्ट्सनुसार, करीनाने बिपाशाला तिच्या रंगावरून तिला ब्लॅक कॅटही म्हटले होते. यानंतर दोघींनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. करीना येत्या काळात अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. जसे की, ‘तख्त’, ‘लाल सिंग चड्ढा’ आणि बरेच, तर बिपाशाच्या खात्यात एकही सिनेमा नाहीये. ती शेवटची २०२१च्या ‘आदत डायरीज’मध्ये झळकली होती.

करिश्मा कपूर आणि रवीना टंडन 
करिश्मा कपूर आणि रवीना टंडनने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ९०चा काळ गाजवला होता. आजही त्यांचे सिनेम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. या दोघींमध्येही जोरदार भांडण झाले होते. दोघींनी ‘अंदाज अपना अपना’ सिनेमात एकत्र काम केले होते. ज्यामध्ये दोघींमध्ये असलेले प्रेमळ नाते प्रेक्षकांना आवडले होते. परंतु ‘आतिश’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये मोठा वाद झाला होता. हे भांडण थेट हातापाईवर आले होते. दोघीही एकमेकींना विगने मारत होत्या. असं सांगितलं जातं की, दोघीही अजय देवगणवरून एकमेकींशी भांडत होत्या. दोघी अजयला पसंत करायच्या. रिपोर्ट्सनुसार, रवीना आणि अजयने करिअरच्या सुरुवातीला अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळेच रवीना अजयच्या प्रेमात पडली होती. ती अजयसोबत सीरियस असल्याच्या चर्चाही होत्या. तिथंच माशी शिंकली. करिश्मा कपूरची तेव्हा इंडस्ट्रीत एन्ट्री झाली. तिनं ‘जिगर’ सिनेमात अजयसोबत काम केलं. या सिनेमानंतर अजयला करिश्मासोबत काम करायला आवडू लागलं होतं. या सिनेमानंतर अजयच्या आणि करिश्माच्या अफेअरच्याही चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर ही गोष्ट रवीनाला समजल्यानंतर तिची आगपाखड झाली. तेव्हापासूनच दोघीही एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत.

शाहरुख खान आणि शिरीश कुंदर
संजू बाबा म्हणजेच संजय दत्तच्या एका पार्टीत शाहरुख खान आणि फराह खानचा पती शिरीश कुंदरमध्ये खूप भांडण झाले होते. हे काही साधंसुधं भांडण नव्हतं. किंग खानने थेट फराहच्या नवऱ्याला चापटही मारली होती. खरं तर शिरीष कुंदरने पार्टीमध्ये शाहरुखच्या रावण चित्रपटावरून त्याला टोमणा मारला होता. यानंतर किंग खान भलताच पेटला होता. त्यामुळे खूप भांडणं झाली आणि शाहरुखने त्याच्यावर हात उचलला होता. या भांडणामुळे फराह आणि शाहरुख यांच्या नात्यातही दुरावा आला होता. मात्र, नंतर त्यांच्यात सर्वकाही ठीक झाले, परंतु शिरीष आणि शाहरुख यांच्यात मैत्री झाली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बंदी घातलेल्या ‘या’ जाहिरातींमध्ये मांडला होता अश्लीलतेचा बाजार, अरबाज अन् मलायकाच्या ऍडचाही समावेश

आख्ख्या जगाने पाहिला उघडा झालेला रणवीर, पण पत्नी दीपिकाला काय वाटतंय? एकच रंगलीय चर्चा

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘हेच जर महिलेने केले असते, तर तिचे घर जाळले असते’

हे देखील वाचा