Friday, April 26, 2024

‘दादासाहेब फाळके यांच्या राज्यातच मराठी चित्रपटांचे हाल’, म्हणत अभिनेता अक्षय वाघमारेने शेअर केली प्राइम टाइमवर पोस्ट

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘शेर शिवराज’ हा सिनेमा २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. श्री शिवराज अष्टकामधील चौथे पुष्प असलेल्या या सिनेमाची जोरदार चर्चा होती. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतही अतिशय महत्वाची मानली जाणारी घटना म्हणजे अफजल खानाचा वध. यावरच हा सिनेमा आधारित आहे. सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. असे असूनही या चित्रपटाला प्राईम टाईम न मिळाल्याने कलाकारांसोबतच प्रेक्षकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. यातच अभिनेता अक्षय वाघमारे याने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यावर भाष्य केले आहे. अक्षयने ‘निषेध’ असा एक फोटो शेअर करत त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की,

“नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्वाची आहे
मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम

मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटा साठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही .

याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे पण पुढे काहीच साध्य झाले नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला . फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा , नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स . सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का ?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही ? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील .

मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत .

जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे .

आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार ???

बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही … मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे

प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ..”

सध्या अक्षयच्या या पोस्टवर कलाकार, नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. तत्पूर्वी याआधी देखील मराठी चित्रपटांना प्राइम टाईम मिळत नसल्यामुळे अनेकदा आवाज उठवला गेला होता. दरम्यान अक्षय वाघमारेने शेर शिवराज सिनेमात स्वराज्याचे पायदळप्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांची भूमिका साकारली त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. अक्षयची अजून एक ओळख म्हणजे तो अरुण गवळी यांचा जावई देखील आहे. अनेक चित्रपटांमधून त्याने भूमिका साकारल्या असून बिग बॉस मराठीमध्ये देखील त्याने सहभाग घेतला होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा