Friday, April 19, 2024

बहुचर्चित ‘इंशाल्लाह’ डब्यात का गेला? खुद्द संजय लीला भन्साळी यांनीच केला यावर खुलासा

संजय लीला भन्साळी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. दोघांच्या मैत्रीची बरीच चर्चा झाली आहे. ‘खामोशी’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत या जोडीने पडद्यावरही कमाल केली आहे. पण नंतर अनेक वर्ष उलटली… ही मैत्री पडद्यावर दिसली नाही. तेव्हापासून सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. दोघांचा ‘इंशाल्लाह’ हा चित्रपट बनण्याआधीच डब्यात गेला. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या यशाने खूश असलेल्या भन्साळींना सलमानसोबत पडद्यावर पुन्हा एकत्र यायचे आहे. पण ते असंही म्हणतात की, सलमान खान आता पूर्वीसारखा राहिला नाही, तो बदलला आहे.

‘इंशाल्लाह’मध्ये होती सलमान-आलियाची जोडी

‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) प्रदर्शित होण्याआधीच संजय लीला भन्साळी यांच्या ‘इंशाल्लाह’चीही खूप चर्चा होत आहे. या चित्रपटात आलिया भट्टला (Alia Bhatt) कास्ट करण्यात आले होते. सोबत सलमान खान होता. पडद्यावर पहिल्यांदाच सलमान आणि आलियाची जोडी होणार होती. पण नंतर हा चित्रपट अडगळीत पडला. म्हणजेच तो निर्मित झाला नाही. सलमान खान (Salman Khan) आणि भन्साळी यांच्यातील क्रिएटिव्ह फरक हे यामागे मोठे कारण असल्याचे समजते. त्यानंतर आलिया भट्टला भन्साळींनी ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये कास्ट केले होते. आता प्रथमच भन्साळींनी ‘इंशाल्लाह’ आणि सलमान खानसोबतच्या चित्रपटावर मौन सोडले आहे.

‘सलमान माझा खूप जवळचा मित्र’

माध्यमांशी केलेल्या संभाषणात संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एकदा सलमान खान आपला खूप जवळचा मित्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “सलमान माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे. ‘पद्मावत’नंतरही आम्ही यासाठी प्रयत्न केले. पण माणूस म्हणून आपण सगळेच काळाबरोबर बदलत असतो. सलमानही बदलला आहे. त्यांच्या मते मीही बदललो आहे.”

‘मी नेहमीच सलमानचा आदर करेन’

भन्साळी म्हणाले की, सलमान खानसोबतचे त्यांचे नाते आजही चांगले आहे. दोघांमध्येही संभाषण होत असल्याचे ते सांगतात. असे नाही की, दोघांमध्ये संवाद नाही आणि दोघेही अनोळखी लोकांसारखे आहेत. भन्साळी म्हणाले की, “माझ्या मनात सलमानबद्दल खूप आदर आहे. ‘खामोशी’ या चित्रपटात त्याने माझ्यासाठी काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये त्याने माझ्यासाठी काम केले होते. ‘सावरिया’च्या वेळीही तो माझ्या पाठीशी उभा राहिला. आज मी जो काही आहे, त्यात सलमानचा मोठा वाटा आहे. यासाठी मी त्याचा नेहमीच आदर करीन. होय, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे. भविष्यात त्याने माझ्यासोबत काम करायचा की, नाही हे त्याने ठरवायचे आहे.”

‘बाजीराव’मध्येही सलमान होता पहिली पसंती 

भन्साळी यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी आलियाला सांगितले की ‘इंशाल्लाह’ बंद झाला आहे आणि बनणार नाही, तेव्हा ती खूपच तुटली. २०१५ मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान संजय लीला भन्साळी यांनी खुलासा केला होता की, या चित्रपटासाठी रणवीर सिंगऐवजी सलमान खान आपली पहिली पसंती आहे. मात्र, त्यानंतर काही कारणांमुळे हे प्रकरण पुढे आले नाही.

हेही वाचा – 

हे देखील वाचा